Ahmednagar News : अगस्ती साखर कारखाना निवडणूक : पिचड पिता पुत्रांना धक्का, 28 वर्षांची सत्ता गमावली
Ahmednagar News : आधी आमदारकी, मग ग्रामपंचायत निवडणूक आणि आता अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत मधुकर पिचड गटाचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे पिचड यांनी साखर कारखान्यावरील तब्बल 28 वर्षांपासून असलेली सत्ता गमावली आहे

Ahmednagar News : अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना (Agasti Sahakari Sakhar Kharkhana) निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड (Madhukar Pichad) आणि माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील पिचड यांची सत्ता गेली असून विरोधकांचा दणदणीत विजय झाला आहे. आधी आमदारकी, मग ग्रामपंचायत निवडणूक आणि आता साखर कारखाना निवडणुकीत मधुकर पिचड गटाचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे पिचड यांनी साखर कारखान्यावरील तब्बल 28 वर्षांपासून असलेली सत्ता गमावली आहे
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले (Akole) तालुक्यातील सहकाराची कामधेनू असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी (25 सप्टेंबर) मतदान पार पडलं. मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई होती. तर विरोधकांनी त्यांना शह देण्यासाठी बाजी पणाला लावली होती. अखेर याच विरोधकांनी बाजी मारली आहे.
आधी आमदारकी, मग ग्रामपंचायत, आता साखर कारखाना निवडणुकीत पराभव
अनेक वर्षे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या मधुकरराव पिचड यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शह देण्यासाठी स्वतः शरद पवारांनी पुढाकार घेऊन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांच्या माध्यमातून वैभव पिचड यांचा पराभव केला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही चाळीस वर्षापासून पिचडांची सत्ता असलेल्या राजूर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. आता अकोले तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना पिचडांच्या ताब्यातून घेतली.
पिचड यांना शह देण्यासाठी सर्व विरोधकांनी शेतकरी समृद्धी मंडळाची स्थापना केली होती. सर्व शेतकरी आमच्या पाठीशी असून शेतकरी समृद्धी मंडळाचाच विजय होणार असा विश्वास एकेकाळी मधुकर पिचड यांचा उजवा हात समजले जाणारे आणि आज त्यांच्याच विरोधात असलेले सीताराम गायकर यांनी व्यक्त केला होता. विशेष म्हणजे अगस्ती साखर कारखाना निवडणुकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा सभा घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
