Rohit Sharma IND VS PAK : 'कोणालाही आश्चर्य वाटले नाही...', किंग कोहलीच्या शतकावर रोहितचे मोठे वक्तव्य; पांड्याचे बांधले कौतुकाचे पूल, म्हणाला....
Champions Trophy 2025 : आयसीसी स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक रोमांचक विजय मिळवला.

IND VS PAK Champions Trophy 2025 : आयसीसी स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक रोमांचक विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात त्याने पाकिस्तानी संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. या विजयासह, टीम इंडियाने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. विराट कोहलीने संस्मरणीय शतक झळकावून पाकिस्तानी संघाला स्पर्धेतून जवळजवळ बाहेर काढले. विराट कोहलीने शतक ठोकल्यानंतर रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले. रोहित म्हणाला, कोहलीने शतक ठोकले पण ड्रेसिंग रूमध्ये कोणालाही आश्चर्य वाटले नाही.
किंग कोहलीने चौकार मारत ठोकले शतक
किंग कोहलीने चौकार मारून आपले 51 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. यासोबत तो फॉर्ममध्ये परतला, ज्यामुळे विरोधी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. विजयासाठी 242 धावांचे लक्ष्य गाठताना भारताला 42 व्या षटकानंतर चार धावांची आवश्यकता होती. खुसदिल शाहच्या षटकात, विराटने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि नंतर अक्षर पटेलने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. आता भारताला जिंकण्यासाठी दोन धावांची गरज होती आणि विराटला शतक करण्यासाठी चार धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरमध्ये चौकार मारल्यानंतर कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. यासोबतच टीव्हीला चिकटून बसलेले लाखो भारतीय क्रिकेट चाहतेही आनंदाने उड्या मारू लागले.
'ड्रेसिंग रूमध्ये कोणालाही आश्चर्य वाटले नाही...'
कर्णधार रोहित शर्माही कोहलीच्या शतकावर आनंदी दिसत होता. तो म्हणाला की, ड्रेसिंग रूमध्ये कोणालाही आश्चर्य वाटले नाही. त्याला (विराट) देशाचे प्रतिनिधित्व करायला आवडते आणि तो वर्षानुवर्षे तेच काम करत आहे. त्यामुळे ड्रेसिंग रूममधील लोकांना आश्चर्य वाटत नाही."
रोहितने संपूर्ण संघाचे केले कौतुक
रोहितने संघातील इतर खेळाडूंचेही कौतुक केले. तो म्हणाला, या सामन्यात आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली ती अद्भुत होती. आम्हाला माहित होते की रात्री लाईटमध्ये फलंदाजी करणे थोडे चांगले असेल. आम्ही धावा काढण्यासाठी आमच्या अनुभवाचा वापर केला. याचे श्रेय अक्षर, कुलदीप आणि जडेजा सारख्या खेळाडूंना जाते. पण हार्दिक, शमी आणि हर्षित यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ते विसरून चालणार नाही. त्यांनी पण चांगली कामगिरी केली.
सामन्यात काय घडलं?
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानी संघ 49.4 षटकांत 241 धावांवर गारद झाला. त्याच्याकडून सौद शकीलने 62 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने 3 आणि हार्दिक पांड्याने 2 विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने तुफानी फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजीचा धुव्वा उडवून दिला. टीम इंडियाकडून सुपरस्टार विराट कोहलीने नाबाद 100 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 56 धावांचे योगदान दिले तर शुभमन गिलने 46 धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्माने 20 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 8 धावा केल्या आणि अक्षर पटेल 3 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 विकेट घेतल्या.




















