आरोग्य विभागातील 12 हजार जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार, ठाण्यातील रुग्णांच्या मृत्यूनंतर प्रक्रियेला वेग
Arogya Vibhag Nokar Bharati : ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला वेग आला असून पुढील आठवड्यात त्याची जाहिरात निघण्याची शक्यता आहे.
![आरोग्य विभागातील 12 हजार जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार, ठाण्यातील रुग्णांच्या मृत्यूनंतर प्रक्रियेला वेग maharashtra arogya vibhag nokar bharati recruitment advertisement in next week health department marathi news आरोग्य विभागातील 12 हजार जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार, ठाण्यातील रुग्णांच्या मृत्यूनंतर प्रक्रियेला वेग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/4e9cacb30f153856b60ca2402db10e851667374448095290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: आरोग्य विभागाची नोकर भरती अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात जवळपास 12 हजार जागांसाठी जाहिरात निघणार आहे. ठाण्यातील रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्य सेवक भरतीला वेग आला असून पुढील आठवड्यात 11,903 जागांसाठी भरतीची जाहिरात निघणार आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या पदांसाठी ही जाहिरात असेल.
अनेक दिवसांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती, आता ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर या प्रक्रियेला वेग आल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते.
'क' आणि 'ड' श्रेणीतील 11,903 जागांसाठी पुढील आठवड्यात ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे.
गट क' संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर 'गट ड' संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळतंय.
ठाण्यातील रुग्णालयामध्ये 18 रुग्णांचा मृत्यू
ठाणे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवारी एका रात्रीत 18 जणांचा मृत्यू झाल्याने सर्व स्तरांतून टीका करण्यात येत होती. विरोधकांनीही यावरून प्रशासनाकडे उत्तर मागितलं होतं.
18 रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे केवळ 10 तासांत 18 जणांनी प्राण गमावले. या रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले, रुग्णालयाच्या प्रशासनाचं दुर्लक्ष झालं का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्यामुळे या 18 रुग्णांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण हे आता तपासानंतर समोर येणार आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)