मराठी चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, निर्माते; वाचा आणि विचार करा

BLOG : जानेवारी महिन्यात 7 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले तर फेब्रुवारीच्या पहिल्या शुक्रवारी 2 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी काही चित्रपट खरोखरच चांगले होते, मात्र या 9 मराठी चित्रपटांपैकी किती चित्रपटांच्या समीक्षा इंग्रजी वर्तमानपत्रात आल्या किंवा त्यांनी या मराठी चित्रपटांची दखल घेतली? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे हीच इंग्रजी वर्तमानपत्रे दक्षिण भारतीय किंवा बंगाली चित्रपटाची योग्य दखल घेतात आणि त्या चित्रपटांच्या समीक्षाही छापतात. मग मुंबईतील इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये मराठी चित्रपटाची समीक्षा का येत नाही याचा मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी विचार केला आहे का?
मराठी चित्रपट उत्कृष्ट असतात, मराठी कलाकार अभिनयनिपुण असतात असे बॉलीवूडमधील निर्माते, दिग्दर्शक नेहमी म्हणत असतात. मराठी कलाकारांना बॉलीवूडमधील अनेक मोठ्या निर्माता-दिग्दर्शकांनी संधी दिलेली आहे. मात्र मराठी चित्रपटाचा विषय आला की लगेचच या तथाकथित बॉलीवूडकरांमधील व्यावसायिक जागा होतो आणि त्यांचे चित्रपट प्रदर्शित होणार असतील आणि त्याच शुक्रवारी मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर मराठी चित्रपटाला कमीत कमी शो कसे दिले जातील याकडे लक्ष देतात. शो ही अशा वेळचे असतात ज्यावेळी प्रेक्षक चित्रपट पाहायला जात नाही.
दहा वर्षांपूर्वी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये ‘प्राइम टाइम’ मिळावा या मागणीवर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आयनॉक्स, सिटी प्राइड, पीव्हीआर मल्टिप्लेक्सचे मालक यांच्यासह निर्माते महेश कोठारे, चंद्रकांत देसाई, मराठी चित्रपट महामंडळाचे विजय पाटकर उपस्थित होते. बैठकीत चार सदस्यांच्या एका समितीची नियुक्ती करण्यात आली. ही समिती कुठल्या सिनेमांना प्राइम टाइममध्ये कुठला वेळ दिला जावा, याचा निर्णय घेणार होती. या समितीत दोन निर्माते व दोन मल्टिप्लेक्स मालकांचा समावेश होता.
मराठी चित्रपट निर्मात्यांच्या मते दुपारी 12 ते 5 या वेळेत युवक सिनेमे पाहणे पसंत करतात, तर 3 ते 6 वेळेत महिला सिनेमा पाहण्यास पसंती देतात. 6 ते 9 या वेळेत कौटुंबिक चित्रपट पाहण्यावर भर असतो. आता कुठल्या वेळेत कोणते मराठी सिनेमे दाखवावे, याचा निर्णय समिती घेणार होती. त्या बैठकीनंतर बोलताना सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मराठी चित्रपट दुपारी 12 ते रात्री 9 या मुख्य वेळेतच हे चित्रपट दाखवले जातील अशी घोषणा केली होती.
मल्टिप्लेक्समध्ये वर्षाला मराठी चित्रपटांचे 124 शो दाखवण्याचा याआधीचा नियम होता. मात्र, प्राइम टाइमध्ये हे चित्रपट दाखवले जात नव्हते. सकाळी 8 ते दुपारी 12 किंवा रात्री 9 नंतरचा वेळ चित्रपटांना दिला जात होता, ही अवेळ असल्याने प्रेक्षक चित्रपटगृहाकडे फिरकत नाही. या समितीने नंतर कोणता निर्णय दिला, सरकारने त्यावर काय कारवाई केली हे कोणालाही ठाऊक नाही.
त्यामुळे आजही मराठी चित्रपट निर्मात्यांना मल्टिप्लेक्सवाल्यांकडे शोसाठी भीक मागावी लागते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इशारा द्यावा लागतो.
महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांची ही अत्यंत भीषण अशी अवस्था, मात्र मराठी चित्रपट निर्मात्यांना याचे काहीही पडलेले नाही. स्वतःचा चित्रपट असेल तेव्हा मात्र त्यांना मराठीवर अन्याय होत असल्याचे जाणवते आणि मग माध्यमांसमोर येऊन रडतात. त्याच वेळेस एकाच शुक्रवारी दोन निर्माते स्वतःचे मराठी चित्रपट एकाच वेळेस लावतात. मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत म्हणायचे आणि स्वतःच स्पर्धा निर्माण करायची हा कुठला व्यावसायिकपणा.
सुबोध भावेला संगीत मानापनाच्या प्रदर्शनाअगोदर याबाबत विचारले असता त्याने म्हटले आमची चूक झाली, चर्चा करायला हवी होती. नंतर याच सुबोध भावेने नाट्यगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना मांडली आणि ती पूर्णत्वासही नेली. पण मल्टिप्लेक्समधील आपला अधिकार सोडून नाट्यगृहांकडे का जायचे? दक्षिणेचे किंवा बंगाली चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित केल्याचे उदाहरण आहे का? महाराष्ट्रातच मराठी माणसाने मान खाली का घालावी.
दुसरा मुद्दा इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये मराठी चित्रपटाची समीक्षा. जानेवारी ते फेब्रुवारीचा पहिला शुक्रवार एकूण 9 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी किती चित्रपटांना इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आली किंवा समीक्षा छापण्यात आली? एकाही नाही. इंग्रजी वर्तमानपत्रे मुंबईत छापली जातात आणि मराठी माणूसही इंग्रजी वर्तमानपत्रे वाचत असतो. मग त्याला मराठी भाषेतील समीक्षा वाचण्याचा हक्क नाही का? हीच इंग्रजी वर्तमानपत्रे मराठी सोडून सगळ्या भाषेतील म्हणजे दक्षिण भारतीय, बंगाली, इंग्रजी चित्रपटांच्या तीन तीन कॉलम समीक्षा छापतात, त्यांना मराठी चित्रपटासाठी एक-दीड कॉलम देणेही योग्य वाटत नाही.
मी जेव्हा नई दुनिया, सहारा समय आणि दैनिक भास्कर या हिंदी वर्मतमानपत्रांमध्ये काम करीत होतो तेव्हा आवर्जून मराठी चित्रपट आणि नाटकांबाबत लिहित असे आणि ते छापलेही जात असे. मला आठवते मी जनसत्तामध्ये लिहित असताना अमोल पालेकर बनगरवाडी चित्रपट तयार करीत होते. त्यांनी या चित्रपटाच्या आउटडोअर शूटिंगला मराठी पत्रकारांबरोबरच इंग्रजी आणि हिंदी वर्तमानपत्रांच्या पत्रकारांनाही नेले होते आणि बनगरवाडीला चांगली प्रसिद्धीही मिळाली होती. मात्र आता ते दिवस राहिलेले नाहीत.
मुंबईतील इंग्रजी वर्तमानपत्रे मराठी चित्रपटाला दुय्यम समजतात. फक्त त्यांच्या फायद्याचे असेल तेव्हा पुरस्कार समारोहाचे आयोजन करतात आणि तेथे पुरस्कार मिळाल्यानंतर मराठी कलाकार, निर्माता, दिग्दर्शकांना आभाळाला हात लागले असे वाटते. मात्र यात त्यांचा मराठी चित्रपटांना पुढे नेण्याचा विचार नसतो तर जाहिरातीतून कोट्यवधी रुपये कमवण्याचा उद्देश असतो. पण मराठी चित्रपटसृष्टी या गोष्टीने हुरळून जाते. काही मराठी कलाकार पेज 3 पुरवणीत पैसे देऊन लेख छापून आणतात आणि जगभर दाखवत फिरतात आणि स्वतःचा उदोउदो करवून घेतात. त्यात धन्यता मानतात. मराठी वाहिन्या किंवा वर्तमानपत्रे पुरस्कार देतात तेव्हा त्यांनी मराठी चित्रपटांना योग्य ती प्रसिद्धीही दिलेली असते, त्यामुळे त्या पुरस्कार सोहळ्यांना जाणे कलाकारांचे कर्तव्यच आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
एकूणच जोपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीने मल्टिप्लेक्स किंवा इंग्रजी वर्तमानपत्रांना स्वतःची ताकद दाखवली पाहिजे. दुसऱ्याची रेषा छोटी करण्यापेक्षा आपली रेषा मोठी करण्याची गरज आहे. आता येथे काही जण म्हणतील हिंदी किंवा साऊथच्या चित्रपटांच्या निर्मिती खर्चाशी किंवा श्रीमंत निर्मात्यांशी मराठी निर्माता लढू शकत नाही. हिंदी, साऊथचे निर्माते मल्टिप्लेक्सला पैसे देतात, इंग्रजी वर्तमानपत्रांना पेड मुलाखती देतात तसे मराठी निर्माता करू शकत नाही. ठीक आहे, ते पैशाच्या जोरावर या सगळ्या गोष्टी करतात तर मराठी चित्रपटसृष्टीनेही कात टाकून हिंदी किंवा दक्षिणेच्या चित्रपटांप्रमाणे रूपडे का घेऊ नये? मोठ्या निर्मिती संस्था मराठीकडे का वळवू नयेत, आणि हे निर्माते मराठीकडे यावे यासाठी मराठी चित्रपटसृष्टी काय करत आहे? सगळ्यांनी एकदा या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. तरच मुंबईत मराठी चित्रपटांना पूर्वीप्रमाणे चांगले आणि यशस्वी दिवस येतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
