Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
Radhakrishna Vikhe Patil : नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषि महोत्सवात राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil : नाशिक येथे स्वामी समर्थ केंद्राच्या (Swami Samarth Kendra) माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचा आज रविवारी (दि. 10) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हॉटेलमध्ये जे पनीर मिळते ते दुधापासून नव्हे तर व्हेजिटेबल ऑईलपासून तयार होते, असे वक्तव्य केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मी कृषी मंत्री असताना पहिला कृषि महोत्सव सुरू झाला. कृषि महोत्सव सुरू करण्याचे भाग्य मला लाभले. शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरू आहे. सलग 14 वर्षांपासून महोत्सव सुरू आहे. राज्यातील शेतकरी येथे उपस्थित आहेत. बदलते हवामान, ग्लोबल वार्मिंगचा फटका शेतीला बसतो, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा आपण देत आहोत. संवेदनशीलपणे काम हे सरकार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक गुंतवणूक शेतीत केली जात आहे असे त्यांनी म्हटले.
नाशिक मनपात किती पाण्याचा पुनर्वापर केला जातो?
राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, पाण्याची समस्या, पाण्याच्या नियोजनाचा प्रश्न, आपले 60 टक्के कालवे गळके आहेत, शेवटपर्यंत पाणी जात नाही. शेतकऱ्यांची मागणी आहे त्यानुसार पाणी द्यावे लागणार आहे. 65 टीएमसी पाणी पश्चिमेला वाहून जाते ते वळविण्याचे काम करायचे आहे. 50 ते 60 हजार कोटींचे काम आहे. शेतीला पाणी दिले पाहिजे.
नाशिक महापालिका पाणी वापरते, किती पाणी वाया जाते? किती पाण्याचा वापर होतो? किती पाणी पुनर्वापर केला जातो? याकडे आता लक्ष दिले जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
नाशिकमध्ये सर्वात जास्त बोगस कीटकनाशके बनतात
55 टक्के पाणी बिगर सिंचनाला वापरले जाते. याचा अर्थ शहरी भागाला जास्त पाणी जात आहे. शेती क्षेत्रात बदल स्वीकारले पाहिजे. अनेक तरुण पुढे येत आहेत, स्टार्टअप तयार होत आहेत. शेतीतील संशोधन वाढत जात आहे. रासायनिक खतांचा परिणाम नव्या पिढीवर होत आहे. सर्वात जास्त बोगस कीटकनाशके नाशिकमध्ये तयार होत आहे. यामुळे कर्करोगाचा आजार वाढतोय. जैविक खताचा वापर केला पाहिजे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...
पुढील दीड वर्षात दूध उत्पादनाचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अमूलचा समूह राज्यातून 35 ते 40 लाख लिटर दूध खरेदी करतो. लोक म्हणतात गुजरातचे दूध बंद करा. मात्र, अमूलचा समुह आपल्याकडून दूध विकत घेतो म्हणून दूध संकलन टिकून आहे. आता दुधापासून पनीर तयार होत नाही. हॉटेलमध्ये जे पनीर मिळते ते दुधापासून नव्हे तर व्हेजिटेबल ऑईलपासून तयार होते. दूधपासून बनलेले पनीर खरेदी करा, असे त्यांनी म्हटले.
कांदा उत्पादकांना हमीभाव दिला पाहिजे
आपल्याकडे कांद्याचा भाव कमी झाला की रास्तारोको, उसाला कमी भाव मिळाला की रास्तारोको करतात, मात्र इतर विषयाकडे लक्ष घालते पाहिजे. कांदा उत्पादकांना हमीभाव दिला पाहिजे. व्यापाऱ्यांकडील लूट थांबणार आहे. सर्वाधिक कष्ट करणारा शेतकरी वर्ग आहे. जिथे इच्छाशक्ती आहे तिथे काम करुन दाखविले पाहिजे. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

