3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
एसटी कामगार संघटनांकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार संघटनांची बाजू ऐकून घेत अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्देश दिले आहेत.

मुंबई: सर्वसाधारणपणे सरकारी कार्यालयात नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तीन वर्षांनी बदली करण्यात येते. स्थानिक नेते, किंवा प्रशासकीय यंत्रणांमधील आपले हितसंबंध जपून अनेकदा काही अधिकारी गैरमार्गाने कामकाज करतात. त्यामुळे, अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी इतरत्र बदली केली जाते. मात्र, काही अधिकारी नेतेमंडळी व वरिष्ठांची मर्जी सांभाळत आपली बदली होऊ देत नाहीत. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी, एकाच तालुक्यात, जिल्ह्यात ते ठाण मांडून असतात. शासनाच्या विविध कार्यालयात असे अधिकारी व कर्मचारी पाहायला मिळतात. एसटी (ST) महामंडळही त्याला अपवाद नाही. त्यामुळेच, एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. आमदार गोपिचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी यासंदर्भात मागणी केली होती.
एसटी कामगार संघटनांकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार संघटनांची बाजू ऐकून घेत अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला आमदार गोपिचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या सह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले की, अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर सर्व सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी. या मागणीला दुजोरा देत मंत्री सरनाईक यांनी याबाबतचा आढावा घेऊन एसटी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश दिले.
एसटी कर्मचाऱ्याच्या आर्थिक प्रश्नांवर चर्चा
या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देता येईल, असा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सरनाईक यांनी शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्या संदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणे, नाशिक-पुणे महामार्गावरुन जाणाऱ्या बसेस संगमनेर बसस्थानकामध्ये थांबवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच, काही निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
