एक्स्प्लोर

दोन हजाराची मौत आणि बारा हजाराची अब्रू !!

भारत जागतिक महासत्ता झाला आहे, भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था होतेय, भारताचा विश्वात चौहीदिशांना डंका वाजतोय ही वाक्ये मागील काही वर्षात आपण सातत्याने ऐकत आहोत. पण छोट्या छोट्या वाड्या वस्त्यातील खेड्यातील नव्हे तर शहरांच्या बकाल भागातली वस्तूस्थिती काय सांगते याकडे किती गांभीर्याने पाहतो आणि त्यावर किती खोलात जाऊन विचार करतो हा आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे.

भारत जागतिक महासत्ता झाला आहे, भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था होतेय, भारताचा विश्वात चौहीदिशांना डंका वाजतोय ही वाक्ये मागील काही वर्षात आपण सातत्याने ऐकत आहोत. पण छोट्या छोट्या वाड्या वस्त्यातील खेड्यातील नव्हे तर शहरांच्या बकाल भागातली वस्तूस्थिती काय सांगते याकडे किती गांभीर्याने पाहतो आणि त्यावर किती खोलात जाऊन विचार करतो हा आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे. आपल्या सर्वांच्या अंगावर रेशमी जाकीट आहे पण त्याच्या आत कुठले वस्त्र नाही आणि खालीही कुठले वस्त्र नाही अशी आपली स्थिती आहे. आपल्या या अवस्थेकडे दुर्लक्ष करून आपली नैतिक विवस्त्रता झाकणारे बेगडी उपमाभिधानाची मखमली शेखी मिरवण्यात आपण मग्न झालो आहोत की आपण सगळेचजण आपआपल्या आत्मकोषात गुरफटून गेलो आहोत याचे आत्मपरीक्षण व्हायला हवे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. कालपरवा घडलेल्या दोन घटनांनी जीवाची आर्त घालमेल झाली. दिंडीगल हे तामिळनाडूमधलं बऱ्यापैकी मोठं असणारं शहर आहे. राजधानी चेन्नईपासून 420 किमी, तिरुचिरापल्ली पासून 100 किमी आणि मंदिरांचं शहर अशी ख्याती असणाऱ्या मदुराईपासून अवघ्या 62 किमी अंतरावर हे शहर आहे. दिंडीगल जिल्ह्याचे ते मुख्य शहर आहे. पांड्य, चोल्ल, पल्लव, विजयनगरचे साम्राज्य, मदुराई नायक साम्राज्य, अर्कोटचे नवाब आणि नंतर ब्रिटीश राज्य असा याचा इतिहास आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. इथली अनेक मंदिरे आणि मशिदी विख्यात आहेत. इथे महानगरपालिका अस्तित्वात आहे. दिंडीगल विधानसभेचे विद्यमान आमदार एआयएडीएमकेचे सी. श्रीनिवासन हे राज्याचे वनमंत्री आहेत. तमिळनाडूच्या जनगणनेनुसार तीन लक्षच्या आसपासची लोकसंख्या असणारे दक्षिण मध्य प्रांतातील हे शहर लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार बाराव्या क्रमांकाचे शहर आहे. या सर्व आकडेवारीवरून आणि त्रोटक माहितीवरून इतकी खात्री पटते की या शहरात प्रशासन व्यवस्था आणि यंत्रणा असावी. स्थानिक लोकसंस्था, विभागीय रचना आणि राज्य व शेवटी केंद्र अशा विविध प्रशासकीय यंत्रणा या शहरात आहेत. राज्याच्या आणि केंद्राच्या विविध योजनांचा भुलभुलैय्या इथेही सुरु असणार. त्यात अम्मा कँटीनपासून ते अन्न सुरक्षा योजनेपासून ते उज्वला योजना आणि अल्पउत्पन्नगटाचे विकसन अशा भूलथापा इथेही असणार. या तीन लाख लोकसंख्येच्या शहरात सात फेब्रुवारी रोजी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शूर्पणखा ते रावण आणि गोमाता ते  मंदिर मशीद या तर्कहीन दलदलीत जाणीवपूर्वक रुतून बसलेल्या मिडियाला साहजिकच अशा मुद्द्यांवर ढुंकून पाहावे असे वाटत नाही. यात त्यांचा तरी काय दोष ? कारण वाहिन्या आणि माध्यमे चालवायची म्हणजे सरकारचे तळवे चाटलेच पाहिजेत. याला काही अपवादही असू शकतात पण त्यांचे प्रमाण आणि परिणामकारकता अगदी नगण्य म्हटली पाहिजे. सात फेब्रुवारी 2017 रोजी दिंडीगलच्या सरकारी  इस्पितळाबाहेर एका चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह पालापाचोळा पडून असावा तसा पडून होता. आसपास आभाळ दाटून आलेलं, वारंही घूसमटून गेलेलं आणि सगळा आसमंत उदासीन वाटावा असं कुंद वातावरण भोवताली होतं अन त्या महिलेच्या कलेवराशेजारी दोन कुमारवयीन मुलं मूक रुदन करत होती. त्यातला जो मोठा होता त्याला तर अश्रूही फुटत नव्हते अन लहानग्याचे तर ते वयही नव्हते. आता पुढे काय करायचे आणि कसे करायचे दोघांना काहीच सुचत नव्हते. जवळ अक्षरशः फुटका पैसा नव्हता. दोन हजाराची मौत आणि बारा हजाराची अब्रू !! लहानग्याला आईच्या मृतदेहापाशी बसवून थोरल्याने आपल्या काळजावर दगड ठेवत इस्पितळाबाहेर भीक मागायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते आणि इकडे त्या चिमुरड्याचे चित्त त्या मृतस्त्रीच्या देहात गुरफटुन गेलेलं. ते दोघे सख्खे भाऊ होते आणि कॅन्सरशी लढताना जगण्याची लढाई हरलेली ती स्त्री त्यांची जन्मदात्री होती. विजया तिचं नाव. पंधरावर्षीय मोहनराज थोरला आणि तेरा वर्षीय वेलमुरुगन हा धाकटा. आपल्या आईचे अंतिम संस्कार करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते ; त्या दोन मुलांचा आक्रोश काहींनी बघ्याप्रमाणे पाहिला तर काहींच्या काळजाला पाझर फुटला आणि लोक आपल्या परीने त्यांना भीक देऊ लागले. लोकांनी दिलेली भीक पुरेशी नव्हती. त्याने कार्य होणे अशक्य होते. शेवटी ती मुले असहाय्य झाली. त्यांनी इतर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांपुढे हात पसरले. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली काही लोक त्यांना बघायला येऊ लागले तर काहींनी मदतीचे हात पुढे केले. दिंडीगलच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनीही काही रक्कम देऊन आपलं 'कर्तव्य' चोख बजावलं. अखेर विजयावर विद्युतदाहिनीत अंतिम संस्कार केले गेले. या वेळी केल्या जाणाऱ्या विधीची सर्व रक्कम त्या मुलांनी अदा केली आणि आपलं कर्तव्य पार पाडल्याचे दुःखद समाधान मिळवले. मोहनराज पाच वर्षाचा असतानाच त्याचे आजारी वडील निवर्तले. पत्नी विजयाच्या फाटक्या पदरात तीन पाखरांचं ओझं त्याने टाकलं. मोहनराज, वेलमुरुगन आणि कालेश्वरी ही तीन अपत्यं त्या माऊलीला वाढवायची होती. काळ मोठा कठीण होता आणि प्रसंग बाका होता. पण त्या मातेने हार मानली नाही. तिने आयुष्याची लढाई जमेल तितक्या नेटाने लढायची पक्की केली. रोजच्या रोजीरोटीची भ्रांत मिटवणे हे मुख्य ध्येय ठेवतानाच मुलांचे शिक्षणही सुरु ठेवणे याकडे तिने लक्ष दिले. पडेल ती कामे करत करंड्या, टोपली वीणायचे काम ती करू लागली. अहोरात्र कष्ट करुन तिने पोराबाळांसमोरचे ताट रिते राहू दिले नाही. पण याची किंमत तिला खूप लवकर आणि कठोरपणे चुकवावी लागली. तिच्या जगण्याच्या लढाईत कुण्या शेजाऱ्याने मदत केली नाही, की कुणा नातलगाला तिची दया आली नाही. गेंड्याचे कातडे डोळ्यावर ओढून बसलेल्या ढिम्म सरकार आणि प्रशासनाला अशी लाखो कुटुंबे म्हणजे शेणातल्या अळ्या किडे. मात्र तिच्या या संघर्षावर मृत्यूला दया आली. ती गंभीर आजारी पडली. दिवाळी झाली आणि विजयाच्या देहाने तिची साथ सोडण्याचे ठरवले. तिला वेदना होऊ लागल्या. मस्तकदाह होऊ लागला. कुठून तरी पैसे गोळा करून मोहनराज तिला मदुराईच्या राजाजी इस्पितळात घेऊन गेला. तिथं त्याला कळवलं गेलं की स्त्री रूग्णासमवेत पुरुषाला थांबता येणार नाही, सोबत कुणी तरी महिलाच लागेल. मोहनराजच्या पायाखालची माती सरकली. कुणी नातलग ओळख देत नव्हते की शेजारी जीव तोडून मदत करत नव्हते. करणार तरी कसे कारण ते ज्या वस्तीत राहत होते तिथली सारीच माणसं आभाळ फाटलेल्या गरिबीत जगत होती. त्यांचं  माणूसपण नावालाच होतं, जिणं तर किड्या-मुंग्याहून वाईट होतं. तरीही मोहनराजने काहींना शब्द टाकून पाहिला. लोकांनी त्याला असं काही सुनावलं की त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. दोन हजाराची मौत आणि बारा हजाराची अब्रू !! एकीकडे आईची तब्येत वेगाने खालावत होती आणि दुसरीकडे अडचणींचा डोंगर वेगाने वाढत गेला. अखेर एक महिला त्याच्या मदतीस तयार झाली पण तिने तीनशे रुपयाचा मोबदला दर  खेपेकरिता मागितला. आईसाठी काळीज कापून द्यायला तयार असलेला मोहनराज जिद्दीला पेटला. त्याने शाळा सोडली आणि दोनशे रुपयाच्या रोजंदारीवर बेकरीत काम धरलं. घर सांभाळत आणि भावंडांकडं लक्ष देत त्याने स्वतःला गाडून घेतलं.  पण दैव इथेही आडवं आलं. विजयाची प्रकृती इतकी ढासळली की ती अर्धवट बेशुद्ध झाली. घाबरलेल्या मोहनराजने 108 वर फोन करून अम्ब्युलन्स बोलावली. सरकारी रुग्णवाहिका सरकारी गतीनेच आली तोवर विजयाची प्रकृती गंभीर झाली होती. तिला घेऊन ही दोन्ही भावंडं सरकारी रुग्णालयात आली पण तिथे पोहोचण्यापूर्वीच त्या माऊलीचे प्राणपाखरु उडून गेले होते. आपल्या तीन चिमूरडयांना वाऱ्यावर सोडून जाताना तिचा आत्मा कमालीचा कळवळला असणार. sameer gaiwad blog on dindigul 2-compressed लोकांनी मदत केल्याने आणि तमिळ अभिनेता लॉरेन्सच्या फॅन्स संघटनेसह अन्य काहींनी मदतीचा हात पुढे केल्याने मोहनराजने पुन्हा शाळेत जाण्याचा निर्धार केलाय. पण जनसहानुभूतीवर आयुष्य काढता येत नाही, किमान आपल्या देशात तर नाहीच नाही कारण सहानुभूतीचा मौसम आकसला की त्यातला जोर आणि जोश दोन्ही उतरतात. जागतिक महासत्ता व्हायच्या बाता करणाऱ्या देशात प्रत्येक शहरात, गावात असे मोहनराज असतील आणि खंडीभर विजया असतील. पण आम्ही घोषितच केले आहे की गरिबी संपुष्टात आली आहे, सर्वत्र सुबत्ता आली आहे, सगळीकडचे प्रशासन सक्षम व सुसज्ज झालेय तेंव्हा अशा किडूक मिडूक मृत्यूंची आणि दोन हजाराच्या मौतीची काय कथा ? ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ दुसरी घटना आपल्या महाराष्ट्रातील आहे. देशातील सर्वात प्रगतीशील राज्य. पुरोगामी विचारवंत आणि समाजधुरीणांची कर्मभूमी असलेलं राज्य. देशातच नव्हे तर जगात आपल्या डिजिटलायझेशनचे अस्मानी पोवाडे गाणारे राज्य, महाराष्ट्र! सुशासन आणि रामराज्य यांची छबी असलेलं राज्य. हे माझे सरकारच्या करोडो रुपयांच्या जाहिराती दाखवणारं आणि विकास - प्रगतीची बाळंतपणे केल्याचा आव आणणारे सरकार असणारे राज्य, महाराष्ट्र ! आपल्या या आधुनिक आणि टेक्नॉसॅव्ही राज्यात एक किरकोळ अब्रू लुटीचे प्रकरण घडलेय. तसे बलात्कार आपल्या सर्वांच्या इतक्या अंगवळणी पडलेत की एखाद्या दिवशी पाच सहा बलात्कार घडले नाहीत तर ती बातमी व्हावी. दिल्ली आणि कोपर्डीसारखी प्रसिद्धी सर्वच बलात्काराच्या गुन्ह्यांना मिळत नाही. त्यामुळे आपणही बातमी वाचून कोरडा सुस्कारा टाकून पान पालटतो. अशाच शेकडोंनी हजारोंनी होणाऱ्या बलात्कारापैकी एक घटना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मोहली येथे हा बलात्कार झाला. गडचिरोली हे नक्षलवाद्यांच्या प्रभावातले क्षेत्र. जे पोलिस अधिकारी सरकारचे तळवे चाटत नाहीत वा जे अधिकारी कर्तव्यात कसूर करतात त्यांना शिक्षा म्हणून इथली पोस्टिंग दिली जाते असे गृहखात्यात नेहमी बोलले जाते. यामुळे इथे आलेले पोलिस कर्मचारी, अधिकारी कधी एकदा आपला कार्यकाळ पुरा होतो याची चातकासारखी वाट बघत असतात. परिणामी इथली कायदा सुव्यवस्था नेहमीच त्रोटक आणि नाममात्र असते. काही अधिकारी कर्मचारी याला अपवाद आहेत हे नमूद केले नाही तर त्यांच्या कर्तृत्वाचा तो अवमान होईल. पण अशांची संख्या अगदी तोकडी आहे हे कोणीही मान्य करेल. विशेष म्हणजे आजघडीला राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांकडेच गृहखाते आहे. भाजपचे अशोक नेते हे इथले खासदार आहेत. डॉक्टर देवराव होळी (भाजप), अंबरीशराव अत्राम(भाजप), कृष्णा दामाजी गजबे (भाजप) हे इथले आमदार. म्हणजे सबकुछ भाजप असलेला जिल्हा आणि शहर, राज्य, केंद्र ! तरीही इथं एक लाजिरवाणी घटना घडली ज्याची वाच्यता देखील आपल्या काही अपवाद वगळता मिडीयाने ताकदीने केली नाही. धानोऱ्यातील मोहली येथे पूर्व माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अनिल मडवी नावाच्या नराधमाने पाशवी बलात्कार केला. मडवीने तिला शाळेतून घरी सोडतो, असे सांगत निबिड अरण्यात नेऊन बलात्कार केला. रोजची पायपीट वाचणार या मोहाने ती बिचारी त्याच्या भूलथापांना बळी पडली.  इथपर्यंतच्या घटनेने आपल्या अंगावर शहारे येणार नाहीत कारण आपण यांना सरावलो आहोत. खरं तर याहून वाईट या नंतर घडलं. या प्रकरणानंतर मुलीचे पालक पोलिसांकडे जाण्याऐवजी जातपंचायतीकडे गेले. राज्यातील पोलिस यंत्रणावरचा लोकांचा विश्वास यातून दृढ होतो आणि जातीपातींचे व त्यांच्या पंचायतींचे भूत आपल्या मानगुटीवर किती पक्के रुजले आहे हे ही कळते. पंचायतीत प्रकरण आल्यावर पंचांनी यथोचित आपल्या अकलेचे दिवे पाजळले. त्यांच्या लेखी एका पोरीच्या अब्रूचे मोल असून असून किती असणार ? दोन हजाराची मौत आणि बारा हजाराची अब्रू !! यथासांग पंच मंडळी गोळा झाली. त्यांनी पीडित मुलीच्या आई वडीलांचे म्हणणे ऐकून घेतले. अनिल मडवीचेही मत जाणून घेतले. अनिलला त्यांनी दोषी मानले आणि जगावेगळी सजा दिली. अर्थात या कृत्याला सजा का म्हणावे हा संशोधनाचा विषय व्हावा. पंचांनी मडवीला आपला फैसला सुनवला. सगळ्या गावाला मटणाची पार्टी आणि मुलीला बारा हजार रुपये नुकसान भरपाई असा हा फैसला होता. बिचारे पंच ! त्यांनी फार दिवसापासून मटण पार्टी झोडली नसावी, त्यामुळे त्यांचा तरी काय दोष ? गावालाही अशा निमित्ताने ओशट खायला मिळाले तर लोक कोपरापासून हात धुवून पंगतीला बसायला तयारच असतात. कुठे तरी दहा पंधरा वर्षे खटला चालून बारा वर्षाची सक्तमजुरी लागण्यापेक्षा इथे बारा हजार देणं कधीही मडवीला किफायतीचं होतं. त्यामुळे गावही खूश झाले. पंच मंडळी तर पार्टीच्या स्वप्नात मश्गुल झाले आणि अनिल मडवीलाही हायसे वाटले. हिरमुसून गेली ती मुलगी आणि कोलमडून गेले ते तिचे मायबाप. पण त्यांनीही गप्प राहणेच पसंत केले. पण एका कर्मदरिद्री 'भूमकाल'च्या काही लोकांना याची भनक लागली आणि प्रकरणाला वाचा फुटली. आता मामला पोलिसांकडे आहे. गृहखात्याने अहवाल मागवण्याची तत्परता दाखवली आहे. सरकारी बाहुली असलेल्या महिला आयोगाने खोटे खोटे डोळे वटारले आहेत. एकंदर प्रकरणाचा थोडाफार रागरंग बदलू लागला आहे. कोवळ्या मुलीच्या अब्रूचे मूल्य बारा हजार रुपये आणि मटण पार्टी इतकं ठरवणारी पंच मंडळी फरार झालीत. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:'  हे आमचे दाखवायचे दात आहेत आमचे खरे दात हे असे बारा हजारीच आहेत हे आम्ही मान्य करायला हवे. डिजिटल युगाच्या आम्ही कितीही ग्लोबल गप्पा ठोकत असलो तरी आजही हिडीस जातपंचायती आणि त्यातले हिणकस फैसले हे ही आमचे सत्यरूप आहे हे ही आम्ही मान्य करायला हवे. आम्हाला आरशातच बघायचे नसल्याने आमचे हे नकोसे प्रतिबिंब आम्ही कधीच पाहणार नाही का हा खरा सवाल आहे .
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
Ashok Kharat Case : अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
Narendra Modi : युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
Ashok Kharat Case : अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
Narendra Modi : युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
Embed widget