Pune News: बिबट्याला लावलेल्या पिंजऱ्यात स्वत: भक्ष्य म्हणून बसला, शेतकऱ्यांसाठी शिवसैनिकाचं टोकाचं पाऊल
Pune News: शेतकऱ्यांसाठी आंदोलन, प्रशासन ढुंकून पाहेना; उद्गिग्न झालेला ठाकरेंचा शिवसैनिक बिबट्याच्या पिंजऱ्यात भक्ष्याच्या जागी जाऊन बसला. प्रशासनाची तारांबळ उडवणारं आंदोलन

पुणे: पुण्याच्या मंचरमध्ये एका व्यक्तीने स्वतःला बिबट्याला पिंजऱ्यात कैद करून घेतले. शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नांना सरकार गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांनी स्वतः बिबट्याचं भक्ष्य व्हायचं ठरवले. प्रशासनाला ही बाब लक्षात येताच, त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. बिबट्याच्या पिंजऱ्यात बसून आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचे नाव दत्ता गांजाळे (Datta Ganjale) आहे. आंबेगाव तालुक्यातील उद्धव ठाकरेंच्या (Uddahv Thackeray) शिवसेनेचे ते प्रमुख आहेत. गांजळे गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र, प्रशासन त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हतं. त्यामुळे वैतागलेल्या गांजळे यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. परिसरातील शेतात भटकून त्यांनी बिबट्याला कैद करण्यासाठी ठेवण्यात आलेला पिंजरा शोधला आणि ते स्वतः बिबट्याचे भक्ष्य होण्यासाठी पिंजऱ्यात जाऊन बसले. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.
प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचेच नसेल तर मी स्वतःला बिबट्याच्या स्वाधीन करतो, अशी भूमिका गांजळेंनी घेतली. गांजळेंनी उचलेल्या पावलाची चर्चा पंचक्रोशीत झपाट्याने पसरली. साहजिकच प्रशासनाच्या कानावर सुद्धा बाब पडलीच, मग मात्र प्रशासनाची तारांबळ उडाली. गांजळेंचा शोध सुरू झाला, वनविभागाने ज्या ठिकाणी पिंजरे लावलेत तिथं जाऊन पाहणी केली. तेव्हा मंचरपासून सात किलोमीटर अंतरावरील चांडोली बुद्रुक गावातील पिंजऱ्यात गांजळेंचं आंदोलन सुरू झाल्याचं दिसून आलं. मग तहसीलदार संजय नागटिळक, वन अधिकारी स्मिता राजहंस आणि मंचर पोलिसांसह प्रशासन गांजळेंपर्यंत पोहचले. गांजळेंनी पिंजऱ्यातून बाहेर पडावे, यासाठी प्रशासनाकडून विनवणी सुरू झाली.
मात्र, दत्ता गांजळे यांनी आधी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, असा हट्ट धरला. यात शेतीमालाला हमीभाव भेटला पाहीजे, सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द करा, आंबेगाव आणि जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र असल्याने शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी , कांदा अनुदान द्यावे, निर्यात बंदी उठवण्यात यावी ,दुधाला योग्य बाजारभाव मिळावा, अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी,पीक विमा मिळावा , शासनाने शेतीसाठी वाढवलेली पाणीपट्टी कमी करावी या मागण्यांचा समावेश होता. अखेर लवकरात लवकर या मागण्या सरकारकडून मान्य करून घेऊ, असे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर दत्ता गांजळेंनी पिंजऱ्यात बसूनच अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.
आणखी वाचा
Before You Go
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा






















