Narendra Modi : बुद्ध धम्माचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी पाली भाषेचं ज्ञान आवश्यक, पाली भाषा जिवंत ठेवणं सर्वांची जबाबदारी : नरेंद्र मोदी
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणं चांगल्या गोष्टींची सुरुवात आपल्या स्वत:पासून केली पाहिजे असं म्हटलं.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानं लोकांना प्रेम आणि करुणेसह जग समृ्द्ध होतं असं म्हटलं नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी कुशीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. नरेंद्र मोदी म्हणाले, भगवान बुद्धासोबत जोडलं जाण्याची प्रक्रिया त्यांच्या जन्मासोबत सुरु झालेली आणि आज देखील ती सुरु आहे. नरेंद्र मोदी म्हणाले त्यांचा जन्म गुजरातच्या वडनगरमध्ये झाला आहे, जे एकेकाळी बौद्ध धम्माचं केंद्र होतं. तिथूनचं भगवान बुद्धाच्या धम्म आणि विचारांबद्दल आणि शिकवणीबद्दल माहिती जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली.
नरेंद्र मोदी म्हणाले त्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये भगवान बुद्धांशी संबंधित अनेक पवित्र कार्यात सहभाग घेतला आहे. नेपाळमध्ये भगवान बुद्धाच्या जन्मस्थळाला भेट देणे, मंगोलियात भगवान बुद्धाच्या पुतळ्याचं अनावरण करणे, श्रीलंकेतील वैशाख महोत्सवाचं उदाहरण मोदींनी दिलं. संघ आणि साधकाचं मिलन हे भगवान बुद्धाच्या आशीर्वादाचा परिणाम असल्याचं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पौर्णिमेनिमित्त वाल्मिकी जयंतीचा उल्लेख करत नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र मोदी म्हणाले यंदाचा अभिधम्म दिवस विशेष आहे. भगवान बुद्धानं पाली भाषेत उपदेश केला होता. यावेळी त्या भाषेला भारत सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं हे भगवान बुद्धांच्या महान कार्याला केलेलं अभिवादन असल्याचं ते म्हणाले. धम्माचा खरा अर्थ समजून घ्यायचा असल्यास पाली भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. भगवान बुद्धांचा संदेश आणि सिद्धांत मानवाच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्नांची उत्तरं, मानवांसाठी शातीचा मार्ग, शाश्वत शिकवणी,मानवाच्या कल्याणासाठी दृढनिश्चय हे दर्शवतो. बुद्ध धम्मामुळं संपूर्ण जगाला प्रेरणा मिळत आहे, असं मोदी म्हणाले.
पाली भाषा जिवंत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची
नरेंद्र मोदी पुढं म्हणाले की दुर्दैवानं पाली भाषा आता सर्वसामान्यांच्या वापरात राहिली नाही. भाषा केवळ संवादाचं माध्यम नसते, संस्कृती आणि परंपरेचा आत्मा असते. पाली भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आमच्या सरकारनं ही जबाबदारी विनम्रतेनं पार पाडली आहे. बुद्धाच्या कोट्यवधी अनुयायांच्या अपेक्षा पूर्ण कर्याचा प्रयत्न करतोय, असं मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले एकीकडे पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. दुसरीकडे मराठी भाषेला देखील तो दर्जा दिला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मातृभाषा मराठी होती. ते बुद्ध धम्माचे समर्थक होते. त्यांनी पाली भाषेत धम्म दीक्षा घेतली होती. बंगाली, आसामी आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची आठवण मोदींनी सांगितली.
भारत आपल्या विविध भाषांच्या माध्यमातून विविधतेला प्रोत्साहित करत असतो. आपल्या भाषांनी राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण सर्व भाषांच्या संरक्षणाचं माध्यम बनलं आहे. देशातील युवकांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण
भारत की बुद्ध में आस्था केवल अपने लिए ही नहीं, बल्कि यह पूरी मानवता की सेवा का मार्ग है। pic.twitter.com/iYElrWz5sa
— Narendra Modi (@narendramodi) October 17, 2024
दरम्यान, यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारनं भारत सरकारच्या विविध कामांची माहिती दिली. बुद्धांच्या विचारानं आपलं सरकार कार्यरत असल्याचं मोदींनी काही उदाहरणांसह सांगितलं.
इतर बातम्या :
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















