Maharastra Kesari 2025 : सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी, मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत चांदीच्या गदेचा मानकरी
Maharastra Kesari 2025 : वेताळ शेळके हा पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी ठरला असून त्याच्या विजयानंतर लोकांनी एकच जल्लोष केला.

Maharastra Kesari 2025 : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या चांदीच्या गदेवर सोलापूरच्या वेताळ शेळकेने (Vetal Shelke) नाव कोरलं. त्याने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला. अहिल्यानगरमधील कर्जत शहरात आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. वेताळ शेळके हा पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी ठरला असून त्याच्या विजयानंतर लोकांनी एकच जल्लोष केला.
अंतिम कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये झाला. या अटीतटीच्या कुस्ती स्पर्धेमध्ये वेताळ शेळके याने सात गुण मिळवून मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याच्यावर मात केली आणि वेताळ शेळके हा 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार निलेश लंके यांच्या हस्ते वेताळ शेळके यास मानाची गदा प्रदान करण्यात आली.
यावेळी प्रतिक्रिया देताना 66 वा महाराष्ट्र केसरी ठरलेला वेताळ शेळके याने सांगितले की, "माझे स्वप्न होते महाराष्ट्र केसरी होण्याचे आणि पृथ्वीराज पाटील यांचं आव्हानही होतं ते मी स्वीकारलं. आई-वडिलांचं आणि वस्ताद यांचं स्वप्न मी पूर्ण केलं याचा आनंद आहे."
कोण आहे वेताळ शेळके?
सध्याचे गाव : बेंबळे, टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर
मूळ गाव : बादलेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर
माती विभागातून महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीसाठी पात्र
प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पैलवान
मॅटवर सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदककमाई
जागतिक आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग
मातीवरच्या कुस्तीतही तरबेज
प्रशिक्षण : आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, पुणे
प्रशिक्षक : काका पवार
स्पर्धेत गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला. त्यामध्ये मोळी डाव वापरून पृथ्वीराज पाटीलने शिवराज राक्षेचा पराभव केला. तर सोलापूरच्या वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमिफायनरमध्ये अकोल्याच्या प्रशांत जगतापचा पराभव केला होता.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील अंतिम लढतीच्या निकालावरून चांगलाच गोंधळ झाला होता. शिवराज राक्षेनं पंचांना मारलेल्या लाथेवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.























