एक्स्प्लोर
इंडोनेशियात तिरंगा फडकवणारी ‘लेडी’ एकलव्य
महाराष्ट्राची राही सरनोबत ही एशियाडच्या इतिहासात सुवर्णपदकाची कमाई करणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. सत्तावीस वर्षांची राही सरनोबत ही मूळची महाराष्ट्रातल्या कोल्हापूरची आहे. त्यामुळे तिची कामगिरी महाराष्ट्रासाठी अधिक अभिमानास्पद ठरली आहे.

Asian Games 2018 : पैलवान विनेश फोगाटपाठोपाठ महाराष्ट्राच्या, आपल्या कोल्हापूरच्या राही सरनोबतने जकार्ता-पालेमबान्ग एशियाडमध्ये नवा इतिहास घडवला. एशियाडच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारी विनेश फोगाट ही पहिली भारतीय महिला पैलवान ठरली होती. राही सरनोबतने एशियाडचं सोनं जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरण्याचा मान मिळवला.
राही सरनोबतने जकार्ता-पालेमबान्ग एशियाडमध्ये 25 मीटर्स रॅपिड पिस्टलच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. या सुवर्णपदकासाठी राही सरनोबत आणि थायलंडची नाफास्वान या दोघींमध्ये झालेला शूटऑफ हा त्यांच्या एकाग्रतेची, चिकाटीची आणि प्रचंड दडपणाखाली अचूक लक्ष्यवेधाची परीक्षा पाहणारा ठरला. त्या कठोर परिक्षेत राहीने बाजी मारली. म्हणूनच पालेमबान्गच्या एशियाड रणांगणात भारतीय तिरंगा डौलाने फडकला.
एशियाडच्या इतिहासात आजवर रणधीरसिंग, जसपाल राणा, रंजन सोधी, जीतू राय आणि यंदा सौरभ चौधरी या पाच पुरुष नेमबाजांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. त्या पंक्तीत दाखल होणारी राही सरनोबत ही सहावी भारतीय आणि पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.
राही सरनोबतने नेमबाजीच्या दुनियेत सर्वोत्तम कामगिरी बजावण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. 2010 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने 25 मीटर्स पिस्टल दुहेरीचं सुवर्ण आणि एकेरीचं रौप्यपदक पटकावलं होतं. 2014 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही ती 25 मीटर्स पिस्टलच्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये तिचा भारताच्या कांस्यविजेत्या चमूत सहभाग होता. पण त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 2013 साली राहीला कारकीर्दीतलं मोठं यश लाभलं. दक्षिण कोरियातल्या जागतिक नेमबाजीत तिने 25 मीटर्स स्पोर्टस पिस्टलचं सुवर्णपदक जिंकलं.
2013 साली राहीचा तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते 'माझा सन्मान' कार्यक्रमात गौरव करण्यात आला होता.
राही सरनोबतच्या याच विश्वविजयाचा 'एबीपी माझा'ने 2013 साली तिला ‘माझा सन्मान’ देऊन गौरव केला होता. महाराष्ट्र शासनानेही 2013 साली एक कोटी रुपयांचं इनाम बहाल करून, मोठी भरारी घेण्यासाठी राहीच्या पंखात बळ भरलं. पण त्याच सुमारास राहीच्या पाठी दुर्दैवाचा फेरा लागला. एका छोट्या अपघातात तिचा खांदा दुखावला. तिला पाठदुखीनेही हैराण केलं. त्याच सुमारास तिचे प्रशिक्षक अनातोली यांचं निधन झालं. या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून, राहीने एकलव्याच्या जिद्दीने अथक सराव केला.
अखेर जर्मनीच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या आणि विश्वविजेत्या मुन्खबायर डॉरसरेनच्या रुपाने तिला नवी गुरू लाभली. एक चॅम्पियन नेमबाज असलेल्या डॉरसरेन यांनी राहीला संघर्षाच्या काळात नेमकं काय हवं आहे ते ओळखलं आणि तसं मार्गदर्शनही केलं. राही सरनोबत आणि तिच्या नव्या गुरुंच्या प्रयत्नांमधून भारताला हवी असलेली चॅम्पियन नेमबाज नव्या जोमाने पुन्हा उभी राहिली. त्या चॅम्पियन नेमबाज राही सरनोबतने भारताला एशियाडचं सुवर्णपदक तर जिंकून दिलं आहे. आता तिचं पुढचं लक्ष्य हे दक्षिण कोरियातली जागतिक नेमबाजी आहे. ऑल दी बेस्ट, राही!
संबंधित बातम्या :
एशियाड गेम्स 2018 | राही सरनोबतची 25 मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्ण कमाई
कोल्हापूरच्या राही सरनोबतचा सुवर्णवेध, भारताला आणखी एक गोल्ड


अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
