कोरोनाच्या आजाराविरोधातील राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम जेव्हा जाहीर होतो तेव्हा साहजिकच सरकारने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींचा विचार केलेला असतो. भारतासारख्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या देशात लसीकरण हा तसा जिकिरीचा कार्यक्रम आहे, याची केंद्र आणि राज्य सरकारला व्यवस्थित माहिती आहे. कोरोनाने ज्यावेळी एका बाजूला संपूर्ण जगात हाहाकार माजविला होतो, अनेकजण त्यावेळी याआजारामुळे मृत्युमुखी पडत होते. त्यावेळी देश-विदेशातील शास्त्रज्ञ या विषयातील लस शोधण्याचे काम नेटाने करत होते. त्यांच्या या कामाला काही दिवसांपूर्वी यश प्राप्त झाले आणि या संसर्गजन्य आजारा विरोधातील लस विकसित झाली. त्यांची परिणामकारकता, सुरक्षितता आणि उपयुक्तता ज्या संबंधित संस्थांनी तपासणे अपेक्षित होते, त्यांनी तपासून आणि सर्व बाजूंचा विचार करून सध्या तरी दोन लसींना आपातकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.


लसीकरणासारखा महाकाय असा कार्यक्रम राबविताना नव-नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. छोटया-छोट्या गोष्टींचे भांडवल करून अर्धवट माहितीच्या आधारे चुकीची माहिती सर्व सामन्यांमध्ये प्रसारित होणे, हा ह्या लसीकरण मोहिमेमधील सर्वात मोठा अडथळा आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळे शासनाने वेळीच 'सावध ऐका पुढल्या हाका' हे धोरण अवलंबून लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी 'सवांद लसीकरणाचा' हा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे.


लसीकरण मोहिमेत ज्यामध्ये देशातील सर्व नागरिकांचा समावेश आहे अशा वेळी त्या मोहिमे संदर्भातील संवाद थेट नागरिकांसोबत सोप्या भाषेत कसा करता येईल याचा विचार प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने प्रामुख्याने करण्याची आवश्यकता आहे. लसीकरण मोहीम चारच दिवस चालणार आहे याची कालपर्यंत फारशी कुणाला माहिती नव्हती. मात्र, आरोग्य विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी त्याच्यावर तीन-चार दिवसापूर्वीच भाष्य केले होते. मात्र ही बाब सर्वसामान्यपर्यंत पोहचली नव्हती. ही गोष्ट येथे प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये ज्यावेळी कोविन अॅपच्या तांत्रिक बिघाडामुळे मोहिमेला दोन दिवसाची तात्पुरती स्थगिती दिली गेली त्यावरून उलट सुलट चर्चा या मोहिमेला धरून होऊ लागल्या. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे कुठलीही चांगली-वाईट बातमी सर्वसामान्यापर्यंत वाऱ्याच्या वेगाने पसरत असते. त्यामुळे आपल्या मोबाईल वर आलेली माहिती हीच खरी असे मानणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्या सोशल मीडियाच्या तंत्राला आरोग्य विभागाने हेरून दररोज लस मोहिमेबद्दल देशातील नाही तर किमान राज्यातील माहिती रोज जनतेला दिली तर त्याचा या मोहिमेसाठी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आज राज्यात खेडोपाडी लोकांकडे स्मार्ट मोबाईल आहे, ज्या ठिकाणी नसतील त्या ठिकाणी आशा वर्कर्सचा वापर करून लसीकरणाची प्रत्येक टप्प्यातील माहिती पोहचविणे गरजेचे आहे.


आरोग्य विषयक संवाद ही सध्याच्या काळाची गरज असून लसीकरण मोहिमेपासून या अशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे. पारंपारिक पद्धतीने माहिती पोहचविणे पोस्टर लावणे त्यासोबत डिजटल तंत्रांचा आवश्यक असा वापर केल्यास सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहचणे अधिक सुलभ होणार आहे. लसीकरणा संदर्भातील चांगले 'क्रियेटिव्ह पोस्टर' विविध भाषेत बनवून त्याचा डिजिटल माध्यमाचा वापर करून प्रसारित केले पाहिजे. शिवाय लोकांच्या मनात लसीला घेऊन छोट्या शंका असतात. त्यांना त्याची तात्काळ उत्तरे अशा या नागरी सवांदातून मिळू शकतात. शिवाय यामुळे जे काही समाजकंटक लसीकरणाच्या नावाने काही चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला तात्काळ पायबंद बसण्यास ह्या उपक्रमामुळे मदत होईल. कुणी लसी कधी घ्यायची याचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. या पहिल्या टप्प्यातील लोकांच्या लसीकरणावर या लसीचे महत्त्व सर्व सामान्य जनता विशद करणार आहे. कारण पहिल्या टप्प्यातील लसीकरण हे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आहे, जे रुग्णांना लसीचे महत्त्व सांगणार आहे त्यापैकी किती जण लस घेतात हे पाहणे फार औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण त्यांच्या या पहिल्या टप्प्यानंतर नागरिकांमध्ये लसीला घेऊन विविध चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळी नागरिकांसमोर या लसीबद्दलची वस्तू स्थिती समोर ठेवण्यासाठी आरोग्य विभागाला सज्ज राहावे लागणार आहे.


कोवॅक्सीन लसीला घेऊन मोठ्या प्रमाणात चर्चा आहे या लसीबद्दल लोकांच्या मनात अनेक किंतु परंतु आहेत. ते दूर करण्याची जबाबदारी शासनाची आहे. नागरिक जे लस घेत आहे ती लस सुरक्षित आहे असा विश्वास जनतेच्या मनात तयार करण्यासाठी योग्य आणि अचूक सवांद गरजेचा आहे. शासन किंवा प्रशासन ठरलेल्या पठडीतून किंवा जुन्या शैलीतून लोकांसमोर लसीकरणाची माहिती मांडत असते. मात्र, त्याला आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची जोड देऊन लोकांसमोर गेले तर अधिक प्रमाणात प्रभावी ठरून शकेल. लसीकरणाबद्दल कायम पडणारे प्रश्न या माहितीचा विडिओ बनवून तो माध्यमांवर, सोशल मीडियावर प्रसारित करून लोकांच्या मनातील शंका दूर केल्या पाहिजे. लसीकरण मोहीम राबवित असताना काहीवेळा सर्वसाधारण दुष्परिणाम हे होत असतातच. याची माहिती याअगोदरही वैद्यकीय तज्ञांनी दिली आहे. मात्र, आपल्याकडे त्या अत्यअल्प प्रमाणात दुष्परिणामाची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनात लसीकरणाबाबत नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. त्याचप्रमाणे समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याचे अनुकरण बरेच लोकं करत असतात. त्याच्या मार्फ़त लसीकरण मोहिमेबद्दल जनजागृती केली पाहिजे. लसीकरणाच्या अनुषंगाने नागरिकांना त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी व्यवस्था करावी लागणार आहे.


याप्रकरणी, राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी सांगतात कि, "हो हे खरंय लोकांमध्ये लसीकरणाला घेऊन समज आणि गैरसमज आहेत. त्यामुळे शासनाला मोठ्या पातळीवर नागरिकांशी याबाबत संवाद साधने गरजेचं आहे. माहिती, शिक्षण आणि समुपदेशन या त्रिसूचीचा वापर शासनाला करावा लागणार आहे. सध्या आपल्याकडे ज्या दोन्ही लशी उपलब्ध आहेत किंवा लसीकरण मोहिमेत त्याचा वापर केला जात आहे त्या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. त्यामुळे लोकांनी जरासुद्धा घाबरण्याचे कारण नाही. मात्र लसीकरणाच्या बाबतीतील संवाद विविध भाषेत केलाच गेला पाहिजे कारण त्यामुळे लोकांच्या मनातील गैसमज दूर होण्यास मदत होणार आहे."


जानेवारी 17 ला, 'श्रद्धा + सबुरी = लसीकरण' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, राष्ट्रीय लसीकरणाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला संपूर्ण देशात दीड लाखापेक्षा अधिक तर राज्यात अठरा हजारापेक्षा जास्तआरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली. मात्र त्याच दिवशी रात्री उशिरा 'कोविन' अॅपमधील तांत्रिक अडचणीमुळे लसीकरण दोन दिवस स्थगित करण्याचा निर्णय राज्याने घेतला. देशात सिरम इन्स्टिटयूट निर्मित कोविशील्ड आणि भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सीन या दोन लसीच्या आधारावर लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असताना काही ठिकाणी कोवॅक्सीनच्या लसीला घेऊन प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यानंतर लसीकरणाचा हा कार्यक्रम संपूर्ण आठवडा चालणार नसून आठड्यातील केवळ चारच दिवस सुरु राहणार असल्याची भूमिका राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. आपल्याकडे आजही म्हणावं तितक्या प्रमाणात डिजिटल व्यवस्थेचे सबलीकरण झालेले नाही, याची प्रचिती सर्व देशवासियांना अनेक टप्प्यावर येत असते. 10-12 बोर्डाचे आणि नीट परीक्षांचे निकाल असो वा अन्य स्पर्धात्मक परीक्षाची माहिती देणाऱ्या, तसेच महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या वेबसाईट आणि अँप अनेक वेळा ' क्रॅश ' झाल्याचा अनुभव आहेच. त्यामुळे नागरिकांनी या सर्व घटनांना घेऊन लसीकरण मोहिमेबद्दल उलट-सुलट चर्चा न करता केंद्र सरकार यातून तोडगा काढेल यावर विश्वास ठेवून थोडा धीर ठेवून लसीकरण मोहीम यशस्वीपणे कशी राबविली जाईल याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आरोग्याच्या या आणीबाणीत कोरोना विरोधातील लस ही अनेक नागरिकांसाठी जगण्याची उमेद आहे. त्यामुळे लसीबद्दल संभ्रम निर्माण होईल असे वातावरण तयार होणे हे समाजासाठी धोकादायक आहे.


ज्यावेळी विविध प्रसार माध्यमांचा वापर करून संवाद केला जातो व तो संदेश खूप लोकापर्यंत पोहोचविला जातो त्यास जनसंज्ञापन म्हणतात. त्यामुळे लसीकरणाच्या अनुषंगाने जितका प्रभावी संवाद साधणे शक्य आहे तितका संवाद शासनाने सामान्य जनतेशी केला पाहिजे. या सवांदाच्या जोरावर ह्या मोहिमेचे यशस्वीपण अवलंबून आहे. लसीकरण जसे जसे पुढे जाईल तसे कमी अधिक प्रमाणात काही प्रश्न निर्माण होतील. त्याची उत्तरे त्यावेळी मिळणे गरजेचे आहे. लोकांमधील संभ्रम वेळीच दूर झाल्यास ते लोकच पुढे मोहिमेबद्दल यशस्वी माहिती प्रसारित करू शकतील. त्यामुळे लसीकरणाला घेऊन छोटे छोटे माहितीपर मिम्स, विडिओ, जिंगल्स, आकर्षक पोस्टर बनविल्यामुळे मदत होईल. काही दिवसानंतर शाळा आणि कॉलेजेस उघडण्याची शक्यता असल्याने शिक्षकामार्फ़त या समूहात जनजागृती केल्यास याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग