गेले अनेक महिने चर्चेत असणारी आणि सर्वाधिक 'टीआरपी' घेणारी बातमी सत्यात उतरण्यात अवघा एक आठवडा राहिला आहे. ती म्हणजे कोरोविरोधातील लस प्रथमच सर्वसामान्यांकरिता पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीने कोरोनाविरोधातील प्रथम लसीकरण करणारा इंग्लंड हा जगातील पहिला देश ठरला असून फायझर कंपनीच्या या लशीला इंग्लंड सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.


लस निर्मिती करणाऱ्या अनेक औषध कंपन्या ह्या आपली लस बाजारात यावी म्हणून जोरदार प्रयत्न करीत होत्या आणि अजूनही करीत आहेत. अनेक कंपन्या त्यांची लस किती उपयुक्त आणि परिणामकारक याचे दावेही करत आहे. मात्र, अद्यापही कोणत्याही कंपनीने लस कधी देणार याची तारीख निश्चित सांगितली नव्हती. या अशा वातावरणात फायझर कंपनीने बाजी मारली असून या लसीचा वापर सामान्य नागरिकांवर व्यापक प्रमाणात करण्याची परवानगी इंग्लंड या देशाने दिली आहे. अनेक लसीची निर्मिती करण्यात वर्षानुवर्षे जातात. मात्र, फायझर कंपनीने ही लस काही महिन्यात बनवून आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात नागरिकांमध्ये एक मोठी आशा निर्माण केली आहे. संपूर्ण जग ज्या गोष्टीची वाट पाहत होता. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. विज्ञान जगतात या बातमीमुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे.


विशेष म्हणजे याच देशात ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे मोठे उत्पादन पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येणार आहे. भारतीयांची मदार या आणि अन्य स्वदेशी बनावटीच्या लशींवर आहे. नुकत्याच या लशीच्या कामाचा आढावा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. तेव्हापासूनच भारतीयांना लवकरच लस मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. ज्या पद्धतीने कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराने जगातील लाखो नागरिकांचे बळी घेतले आहे, तेव्हापासून अनेकांच्या मनात या आजाराने जबरदस्त दहशत निर्माण केली आहे. गेली 11 महिने भारतात या आजाराचे पडसाद उमटत आहे.


आजही परिस्थिती आटोक्यात आली आहे, असे म्हणायला जागा नाही. राज्यात रोज या आजाराचे हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण निर्माण होत आहे. संसर्गाचा प्रभाव कमी झाला असला तरी कधी वाढेल याची शाश्वती कुणीही आजच्या घडीला देऊ शकत नाही. त्यामुळेच तर आजच्या घडीला राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या अनुषंगाने 'अलर्ट' दुसरी लाट येण्याच्या भीतीने पूर्वतयारी करून ठेवण्यात आली आहे. दिल्ली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जगातील 218 देश या कोरोनच्या आजाराने पछाडले असून आतापर्यंत 14 लाख 88 हजारांचा 93 नागरिक या आजराने बळी घेतला आहे. जगात सर्वाधिक रुग्णसंख्येत अमेरिका देशाचा पहिला क्रमांक आहे तर आपल्या भारत देशाचा जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे संपूर्ण विश्वाचे कोरोना विरोधातील लशीकडे डोळे लागले आहेत.


फायझरएनबायोटेकने ही लस विकसित केली असून ब्रिटिश नियामक मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (एमएचआरए) ने ही लस 95 टक्के संरक्षण देते असे सांगतिले आहे. इंग्लंडने 5 कोटी डोसेसची मागणी केली असून ते 2 कोटी लोकांना त्याचे दोन डोस देण्यात येणार आहे, दोन डोस मधील अंतर हे तीन आठवड्याचे असणार आहे. ह्या लशीची साठवणूक करण्याकरिता त्यांना ती उणे 70 अंश सेल्सियस तापमानात ठेवावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही लस प्राधान्यक्रमाने कुणाला द्यावी लागणार आहे याचा आराखडा त्यांना तयार ठेवावा लागणार आहे. वरिष्ठ नागरिक आणि ज्या व्यक्तींना आधीपासून इतर व्याधी आहेत, अशा लोकांचा प्राधान्यक्रमात समावेश केला जाणार आहे. इंग्लंड मधील आरोग्य विभाग नॅशनल हेल्थ सर्व्हीस नागरिकांना संपर्क करूनही लस केव्हा घ्यायची आहे, याबाबत संपर्क करणार आहे.


ह्या लशीची निर्मिती एमआरएनए प्रकारात करण्यात आली आहे, व्हायरसच्या जेनेटिक कोडमधला भागाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. ही लस शरीरात टोचल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असल्याचे मानवी चाचणीमध्ये सिद्ध झाले आहे. बीबीसी संकेतस्थळवरील वृत्तानुसार, तज्ञांच्या मते इंग्लंडमध्ये लसीकरणाची मोहीम सुरु असली तरी नागरिकांनी सजग राहून कोरोना संदर्भातील सगळे सुरक्षिततेचे नियम पाळत राहणे अपेक्षित आहे.


जगभरात अनेक खासगी औषधनिर्मितीतील कंपन्या सध्या कोरोनाविरोधातील लस विकसित करण्याचे काम करत आहे. जगभरातील संशोधक 150 पेक्षा अधिक लसींवर काम करत आहे. एखादी लस विकसित करण्याकरिता फार मोठा काळ कंपन्या घेत असतात. त्यापैकी काही कंपन्यांची माहिती लोकांसमोर मांडण्यात आली आहे. या आजरावर जगभरात प्रथम अमेरिकेतली मॉडर्ना कंपनी, फायझर कंपनी, भारतातील झायडस, ऑस्ट्रेलियातील व्हॅक्सिन, क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी, चीनमधील सिनोफार्मा, सिनोवाक बायोटेक, रशिया येथील सेचोनोव्ह, आपल्या आणि अन्य देशातील काही कंपनीने लस बनवून मानवी चाचण्या करण्यास सुरुवात केली असून त्या सुद्धा आता तिसऱ्या ते अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.


जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) भारत बायोटेक कंपनी सोबत करार केला असून त्यांच्या या 'कोव्हॅक्स' या लसीच्या मानवी चाचण्याला परवानगी दिली आहे. या हैद्राबाद स्थित कंपनीने ही लस पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही) संस्थेबरोबर संयुक्तपणे विकसित केली आहे. या लसीची मानवी चाचण्या करण्याकरिता यापूर्वीच देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली होती.


नोव्हेंबर 24 ला 'आता वेध लागले लशीचे!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, दुसरी लाट, लॉकडाउन आणि कठोर निर्बंध, नियमांचे पालन याच्यापेक्षा जगतातील सर्वच नागरिकांना आता वेध लागलेत लशीचे. महाराष्ट्रातील लोकांना अधिकच. कारण आपल्या राज्यात म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली जी परिणामकारक लस ज्याचे निकाल विज्ञान जगतासमोर मांडण्यात आले आहे, त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्याकडेच होत आहे. कोरोना विरोधातील लसीकरणाच्या दृष्टीने राज्यात हालचाली सुरु झाल्या आहेत, त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला आहे. यामध्ये वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांसोबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असणार आहे.


कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर तीन-चार महिन्यांपासूनच अनेक औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी लस बनविण्याचा दावा करून लवकरच नागरिकांना देऊ, अशी एक स्पर्धाच तयार केली होती. कारण लस हाच या संसर्गजन्य आजारावरचा एकमेव उपाय असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी अनेकवेळा आपले मत व्यक्त करताना जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे तेव्हापासूनच नागरिकांमध्ये या लशींबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता तर काही कंपन्यांनी ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे हे जाहीर केले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील महाराष्ट्रसह 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी नीती आयोगाने देखील येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले.


आपल्या देशातही लवकरच लस येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नाही. लस मिळण्यापेक्षा ती किती सुरक्षित आहे हे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे अनेकवेळा त्या लशींची सुरक्षितता तपासण्यास अधिक वेळ लागतो. सध्या तरी जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत शासनाने आखून दिलेले सर्व सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. लस आल्यानंतर कुणाला दिली जावी याचे नियोजन करण्यात आले आहे. आता फक्त इंग्लंड ह्या लसीकरणाची मोहीम कशी राबवतो यांच्याकडे सर्वच जगाचे लक्ष लागले आहे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग