Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून शहराध्यक्षपदाची ऑफर, तरीही कोणावर नाराज होऊन पक्ष सोडणार? धंगेकर स्पष्टच म्हणाले....
Ravindra Dhangekar Resigns Congress: पक्ष सोडताना दुःख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत. शिंदे आणि सामंत यांना भेटलो. कार्यकर्त्यांसोबत सगळ्याची चर्चा केली. सायंकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे, अशी माहिती धंगेकरांनी दिली आहे.

Ravindra Dhangekar Resigns Congress: पुण्यात काँग्रेसला (Pune Congress) शिवसेनेनं अखेर मोठं खिंडार पाडलं आहे. पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस सोडताना दु:ख व्यक्त होत असल्याची भावना यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. पक्ष सोडताना दुःख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत. शिंदे आणि सामंत यांना भेटलो. कार्यकर्त्यांसोबत सगळ्याची चर्चा केली. आज प्रवेशाबाबत चर्चा करणार आहे. सायंकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. आज कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार आहे. कार्यकर्ते मतदारांचा आदर करूनच प्रवेश करणार आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. दरम्यान रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून शहराध्यक्षपदाची ऑफर, तरीही कोणावर नाराज होऊन पक्ष सोडणार? का यावर धंगेकरांनी मा पक्षाचा आभारी आहे, त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आहे असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काँग्रेस सोडण्याचं कारण काय?
मी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्य़कर्ते आणि मतदारांचा आभारी आहे. मी त्यांचा कायम आभारी आहे. माझी विचारसरणी मानवतवादी आहे. काँग्रेसने माझ्यासारख्याला त्यांनी विधानपरिषद, लोकसभा अशी उमेदवारी दिली. शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं नाही, कोणाला नाही? काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते उत्साही आणि काम करणारे आणि प्रेमळ आहेत. पक्षाचे पदाधिकारी चांगल्याप्रकारे माझ्या पाठी उभे राहिले. निवडणुकीत दोनवेळा उभा राहून माझा पराभव झाला, पण मी कोणाला दोष दिला नाही. काँग्रेस पक्ष सोडणे सोपे नाही. पण माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा घेऊन कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केली. धंगेकर आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वाचं नातं आहे.त्यामुळे एकत्र काम करण्याचे ठरवले. मी त्यांना सात वाजता भेटून पुढील निर्णय घेईन, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
माझा कोणाच्या बांधाला बांध नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही. माझी काँग्रेस पक्षावर कधीही नाराजी नव्हती. त्यांनी मला भरभरुन दिलं. पण राजकारणात कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात. कार्यकर्त्यांचा कुठेतरी विचार करणं गरजेचे आहे. मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. त्यानंतर मी निर्णय घेईन, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
पक्षातील सर्वांशी कौटुंबिक नाती निर्माण होत
सगळ्या कार्यकर्त्यांशी माझी बैठक, चर्चा झाली. मी मतदारांशी बोलत राहिलो. कुठलाही निर्णय घेणं हे प्रचंड कठीण असतं. या पक्षासोबत मी गेली 10-12 वर्ष काम करतोय. पक्षातील सर्वांशी कौटुंबिक नाती निर्माण होत असतात. 8-10 वर्षांत आपण एकमेकांचे सहकारी होतो, कुटुंबातले होतो. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं आहे. लोकसभा असो किंवा विधानसभेची निवडणूक असो, पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरपर्यंत, सर्वांनीच माझ्यामागे प्रचंड ताकद उभी केली. निवडणूक यंत्रणेत सर्वांनीच भाग घेतला. मी निवडणूक हरलो, हा वेगळा विषय पण सर्वांनीच कष्ट केले, त्यांची जी ताकद माझ्या पाठिशी उभी केली, पक्ष सोडताना खूप दुःख होतंय, मीही माणूसच आहे. मतदारांशीही मी चर्चा केली, आमच्याकडे काम कोण करणार, असा सर्वांचा सवाल होता. लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांचं काम करू शकत नाही, असंही धंगेकर यांनी म्हटलं आहे.
धंगेकर आणि शिंदेंच्या भेटीमुळे आधीपासूनच चर्चा
काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. रवींद्र धंगेकर यांनी अचानक घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात धंगेकर पक्ष सोडणार का चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यानंतर या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना आपण वैयक्तिक कामाच्या संदर्भात भेट घेतल्याचं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं. “माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचं स्वरुप सांगितलं, तेव्हा ते काम करून देतो बोलले. त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज पडली”, असं रवींद्र धंगेकर तेव्हा म्हणाले होते. त्यानंतर उदय सामंत आणि धंगेकरांची भेट झाली होती, त्यानंतर धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसाला सामंत उपस्थित होते, या गाठीभेटींमुळे चर्चांना उधाण आलं होतं, मात्र आज अखेर धंगेकरांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.























