Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh Murder Timeline : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे अपहरण करुन त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. आपली दहशत कायम रहावी यासाठी वाल्मिक कराडने त्याच्या साथिदारांसह ही हत्या घडवून आणली.

मुंबई : एखाद्या व्यक्तीला किती क्रूरपणे मारावं याचीही परिसीमा असते. पण राक्षसी प्रवृत्तीच्या वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगच्या गुंडांनी सरपंच संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या (Santosh Deshmukh Murder Case) केली ती संतापजनक होती. संतोष देशमुखांना गॅस पाईप, लोखंडी रॉडने आणि लाकडी दांड्याला तारा गुंडाळून मारलं, त्यांना 56 ठोके हाणले. देशमुखांचे कपडे काढून तब्बल दोन तास त्यांना मारहाण करण्यात आली. ते पाणी मागत होते, हात जोडून गयावया करत होते... तरीही त्या नराधमांना दया आली नाही. उलट ते त्याचा व्हिडीओ काढत होते, देशमुखांच्या अंगावर लघवी करून आपल्या नीच प्रवृत्तीचं दर्शन घडवत होते. शेवटी संतोष देशमुखांना हे सहन झालं नाही आणि त्यांनी जीव सोडला.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. यामागे अवादा पवनचक्की खंडणी प्रकरण असल्याचं उघड झालं. परळीतील वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने संतोष देशमुखांची दोन कोटींच्या खंडणीच्या वादातून हत्या केली.
नंतर या प्रकरणात मनोज जरांगेनी उडी घेतली, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि गँग तुरुंगात गेली.
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. पण एक वर्ष झाले तरी त्यावर ठोस असं काही झाल्याचं दिसत नाही. या प्रकरणातील आणखी एक आरोपी, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
Santosh Deshmukh Murder Timeline : संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम
29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने अवादा पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खंडणी मागितली. ती जर दिली नाही तर काम बंद पाडण्याची आणि अधिकाऱ्यांना मारण्याची धमकी दिली.
6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता वाल्मिक कराडचे साथिदार अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि इतर अनोळखी इसमानी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला. त्यांनी प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या वॉचमनलाही मारहाण केली.
वॉचमन मस्साजोगचा असल्याने त्याने लगेच सरपंच संतोष देशमुखांना फोन करून बोलावून घेतलं. त्यावेळी संतोष देशमुख आणि त्यांच्या साथिदारांनी वाल्मिक कराड गँगच्या लोकांना तिथून हाकलून लावलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाल्मिक कराडच्या गँगचा संताप झाला. आपली दहशत कायम राहावी यासाठी त्यांनी संतोष देशमुखांना मारहाण करण्याचं ठरवलं.
Santosh Deshmukh Murder Full Story : केज मांजरसुबा टोल नाक्यावरुन अपहरण
9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख केज मांजरसुबा टोल नाक्याजवळून अपहरण करण्यात आलं आणि केजमध्ये नेण्यात आलं. त्यावेळी विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यासह काही लोकांनी त्यांना मारहाण केली. संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखांनी या प्रकरणी पोलिसांना 35 वेळा फोन केले. पण त्यांच्याकडून काहीही मदत मिळाली नाही. 36 व्या फोन वेळी काही वेळात तुमचा भाऊ परत येईल असं सांगण्यात आलं.
Walmik Karad Gang : राक्षसांनी जीव घेतला
वाल्किम कराडच्या लोकांनी संतोष देशमुखांना क्रूरपणे मारलं. जवळपास सात ते आठ जण गॅस पाईप, लोखंडी रॉडने संतोष देशमुखांना दोन तासभर मारत होते. लाकडी दांड्याला तारा गुंडाळून त्याने संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आलं. एवढ्यावरच त्यांचं समाधान न होता आरोपींनी देशमुखांच्या तोंडावर लघवी देखील केली. संतोष देशमुख पाण्यासाठी तडफडत होते, हात जोडून माफी मागत होते, तरीही त्यांना मारहाण करणे सुरूच होतं.
देशमुखांना मारहाण करताना त्याचे व्हिडीओ काढण्यात आले. त्यावेळी कुणालातरी व्हिडीओ कॉल काढण्यात करण्यात आला आणि ती मारहाण दाखवण्यात आली. या मारहाणीत संतोष देखमुखांचा जीव गेला. त्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह एका शेतात फेकून दिला.
Massajog Protest : ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी 10 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग रोखला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्तीनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संरपंच संतोष देशमुखांच्या मृतदेहावर 24 तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी 11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिक घुलेला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली. 11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मीक कराडवर आरोप केला.
त्याच दिवशी, 11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड, अजित पवार गटाचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Sarpanch Murder Case : प्रकरण सीआयडीकडे वर्ग
12 डिसेंबर रोजी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन या गुन्हेगारांचा जे कोणी आका असेल त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी केली. सुरेश धसांचा रोख धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याकडे होता. 13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्याच दिवशी या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.
14 डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. तर आरोपी विष्णू चाटेची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली. 18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्यात आली.
या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी केली.
Beed Crime : शवविच्छेदनाचा अहवाल
19 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला. यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आणि नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. त्याच दिवशी शरद पवार आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
Parli Politics : वाल्मिक कराड शरण आला
24 डिसेंबर रोजी मसाजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेली मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. 28 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खून प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी या मागणीसाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला. 30 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण गेला. त्याच दिवशी उशिरा केज न्यायालयात कराडला हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
3 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉ. संभाजी वायबसेला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. 4 जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तर त्याच दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील कल्याण मधून अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
6 जानेवारी रोजी जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार आणि विष्णू चाटे यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यातील 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 7 जानेवारी रोजी पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली.
Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा
11 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. 16 जानेवारी रोजी वाल्मिक कराडला एसआयटीने ताब्यात घेतले.
3 मार्च रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे दोषारोप पत्रातील फोटो समोर आल्याने एकच खळबळ उडाली. संतोष देशमुखांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली यावरून समोर आलं. त्यानंतर 4 मार्च रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणाची धग लक्षात घेता धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव निर्माण होऊ लागला. त्याच दिवशी, म्हणजे 4 मार्च रोजी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे, परळी गँगची दहशत काय आहे, कुणाला कसं मारलं जातं, कुणाकडून किती खंडणी घेतली जाते... अशा अनेक गोष्टी समोर आल्या. महादेव मुंडे हत्या प्रकरणातही तेच झालं. गरीबांच्या हत्येला कुणीही वाली नाही, ज्याच्या हातात सत्ता त्याच्या हातात बीडची पोलीस व्यवस्था... अशा अनेक गोष्टी समोर आल्या. परळी गँग असो वा बीडमधील इतर बाहुबली असोत... त्यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या किती संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंना यांनी मारलं, गायब केलं याचा हिशोब नाही. मात्र हे कुठेतरी थांबवायचं असेल तर संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे सगळे मारेकरी लवकरात लवकर फासावर गेले पाहिजेत. तरच पुन्हा कुठेतरी लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास बसेल. असं जर झालं नाही तर गुन्हेगार डोकं वर काढतच राहतील, कायद्याची तक्तरं वेशीवर टांगली जातील आणि बीडची तुलना बिहारसोबतच होतच राहील हे निश्चित.
ही बातमी वाचा:























