Gopichand Padalkar : सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी; मुघलांच्या खुणा असलेल्या गावांची नावे बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार : गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar : सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून पहिलं हिंदूंनी बाहेर पडायला हवं, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

Gopichand Padalkar : सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून पहिलं हिंदूंनी बाहेर पडायला हवं. सर्वधर्मसमभाव पाळण्याची जबाबदारी फक्त हिंदूंची आहे का? हिंदू मुस्लिम भाई भाई असं म्हटलं जातं; मग जम्मू-काश्मीरमध्ये (Pahalgam Terror Attack) धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर गोळ्या घातल्या गेल्या? असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलाय.
तसेच मुघलांच्या खुणा असलेल्या आणि त्या पुसण्याच्या दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्यातील काही गावाची नावे बदलण्याची आणि पूर्वीची नावे या गावांना देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार गोपीचंद पडळकर करणार आहेत. यामध्ये खानापूर शहराचे नाव भवानीपूर करावे, सुलतानगादे या गावाचे देखील नाव बदलावे, जत तालुक्यातील उमदी गावाचे नाव देखील बदलावे अशी मागणी आमदार पडळकर यांनी केलीय.
मुघलांच्या खुणा असलेल्या गावाची नावे बदलण्याची मागणी करणार
खानापूर शहरातील महादेव मंदिरातील विटंबना झालेल्या नंदीच्या मूर्तीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाकडून आज महादेव मंदिरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यावेळी पडळकर यांनी या कृत्यामागे जो कुणी आहे? त्याला पोलीस विभाग अटक करेल आणि शिक्षा देईल असे सांगितले. पत्रकारांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत आहे की, खानापूर शहराचे नाव भवानीपूर करावे, सुलतानगादे या गावाचे देखील नाव बदलावे, जत तालुक्यातील उमदी गावाचे नाव देखील बदलावे. मुघलांच्या खुणा जिथे असतील, त्या पुसण्याच्या दृष्टिकोनातून जे काही पूर्वीचे नाव आहेत, ती पूर्वीचे नाव देण्यात यावी, अशी मागणी मी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या बाबींचा विचार करून नक्की निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.
सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, पूर्वीच्या लोकांनी षडयंत्र केले. हिंदी-चिनी भाई भाई, हिंदू-मुस्लिम भाई भाई. मग भाई भाई असताना काश्मीरमध्ये हा प्रकार का घडला? हिंदू मुस्लिम भाई भाई आहेत तर तुम्ही धर्म विचारून का आमच्या भावांना गोळ्या घातल्या. काही लोकांनी कलमा पढल्यानंतर सुद्धा त्यांचे कपडे उतरवून बघितले. त्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या हा काय प्रकार आहे? सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावे. हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही. सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनी बघायचा मग बाकीच्यांनी का बघायचा नाही? काश्मीरमधल्या पंडितांना कोणी घालवले? तिथे काय पाकिस्तानचे मुसलमान आले होते का? त्यांच्या गल्लीत राहणाऱ्या लोकांनीच त्यांना घालवले. तिथे कोणी पाकिस्तानी माणूस आला नव्हता, असा प्रतिक्रिया त्यांनी पहलगामच्या हल्ल्यावर दिली आहे.
आणखी वाचा























