![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Latur: रामदास आठवलेंनी घेतली अत्याचारग्रस्त कुटुंबीयांची भेट; हत्या झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी
Maharashtra News: लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये केवळ तीन हजार रुपयांसाठी एका इसमाची हत्या करण्यात आली. पीडित कुटुंबाची रामदास आठवलेंनी भेट घेतली आहे.
![Latur: रामदास आठवलेंनी घेतली अत्याचारग्रस्त कुटुंबीयांची भेट; हत्या झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी Ramdas Athawale visited the oppressed families demand to accommodate the person from the murdered family in government job Latur: रामदास आठवलेंनी घेतली अत्याचारग्रस्त कुटुंबीयांची भेट; हत्या झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/34cf8b6c1f1af2f80d38d95a6cdb52481686850931327713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Latur: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (15 जून) लातूर जिल्ह्यातील रेणापूरमधल्या तीन हजार रुपयांसाठी हत्या झालेल्या गिरीधारी तपघाले यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पीडित कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्या, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. रिपाई आठवलेच्या वतीने त्यांनी दोन लाख रुपयांची मदत पीडित कुटुंबाला केली आहे. या हत्या प्रकरणातील पोलिसांना बडतर्फ करा, अशी मागणीही त्यांनी केली. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी उज्वल निकम यांना वकील नेमा अशी मागणीही आठवले यांनी केली आहे.
नेमकी काय होती घटना?
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं आर्थिक देवाण-घेवाणीतून एका व्यक्तीस बेदम मारहाण करण्यात आली, यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर यातील आरोपी अटकेत आहेत.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गिरिधारी तपघाले या व्यक्तीने गावातील लक्ष्मण मारकड यांच्याकडून पैसे घेतले होते. सतत पैशांची मागणी केल्यावरही पैसे परत मिळत नसल्यामुळे लक्ष्मण मारकड याने गिरिधारी तपघाले यांना मारहाण केली. याबाबत रेणापूर पोलिसांत 2 जूनला गुन्हा दाखल आहे. उपचार सुरू असतानाच 3 तारखेला गिरिधारी तपघाले यांचे निधन झाले.
बऱ्याच दिवसापूर्वी तपघाले आणि मारकड यांच्यात आर्थिक वाद होता, 23 मे रोजी यांच्यात हाणामारी झाली होती आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी दोन्ही बाजूने विचार करून प्रकरण वाढवण्यात आले नाही आणि हा विषय तिथेच मिटवण्यात आला होता.
मात्र, 2 जूनला सकाळी गिरिधारी तपघाले यांच्या घरासमोर पुन्हा हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये गिरिधारी तपघाले यांना मार लागला, त्यानंतर त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरू होते आणि याच वेळी पोलिसांत तक्रार देण्यात आली. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यात 3 तारखेला उपचार सुरू असताना गिरिधारी तपघाले यांचं निधन झाले आहे. रेणापूर पोलिसांनी त्यानुसार देखील गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
दोषी पोलिसांवर काय कारवाई?
या प्रकरणातील दोषी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे. ज्या पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना वाढत गेली. गिरीधारी तपघाळे यांच्या मृत्यूला कारण ठरले असा आरोप ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे, अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी निलंबित करण्यात आलं आहे. तर, तीन पोलीस कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबाला नेत्यांच्या भेटी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनीही कुटुंबाला भेट दिली होती. बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनीही रेणापुरातील तपघाळे कुटुंबीयांची भेट घेतली. विविध दलित आणि सामाजिक संघटनांनी तपघाळे कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर आणि आधार देण्याचा प्रयत्न केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे अनेक पदाधिकारी आणि स्वतः रामदास आठवले हे रेणापुरात दाखल झाले होते.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)