Pravin Tarde Garbage On Raigad Fort: 'इथे आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला आणि तुम्ही...'; स्वराज्याच्या राजधानीची दयनीय अवस्था पाहून प्रवीण तरडेंचा संताप
Pravin Tarde Garbage On Raigad Fort: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी नुकतीच स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला भेट दिली.

Pravin Tarde Garbage On Raigad Fort: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) म्हणजे, फक्त महाराष्ट्राचंच (Maharashtra News) नाहीतर अवघ्या देशाचं आराध्य दैवत आणि त्यांचे गड-किल्ले म्हणजे, आपल्या सुवर्ण इतिहासाचं वैभव. अनेकदा या गड-किल्ल्यावर काही समाजकंटकांकडून घातला जाणारा धुमाकूळ चर्चेचा विषय ठरला. तसेच, गड-किल्यांवर फिरायला जाणाऱ्यांकडून तिथे केला जाणारा कचरा किंवा ऐतिहासिक वास्तूंची विटंबणा यांवरही अनेकदा आवाज उचलण्यात आला आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी नुकतीच स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला (Raigad Fort) भेट दिली. पण, यावेळी ते अस्वस्थ झाले. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून संताप व्यक्त केला आहे. तसेच, मी मनापासून विनंती करतोय की, बाबा तू परत रायगडावर येऊ नकोस.
व्हिडीओमध्ये बोलताना प्रवीण तरडे म्हणाले आहेत की, "आज खरं तर डॉ. विश्वास पाटील सरांसोबत रायगड पाहायला आलोय. इतल्या भींती, दगडांना हात लावताना कधी तरी इथून महाराज गेले असतील. याला स्पर्श केला असेल. महाराजांच्या असण्याचा भास निर्माण होतो. आणि आपल्या लोकांनी काय केलंय ते बघायचंय का तुम्हाला?? म्हणजे आम्ही आता फिरत होतो. तर या ऐतिहासिक वस्तूंच्या खपच्यांमध्ये हे बघा(प्लास्टिकचे रॅपर्स). ज्याने कोणी हे इथं टाकलं असेल त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो की बाबा तू परत रायगडावर येऊ नकोस. ही कचरा टाकायची जागा नाहीये. इथे आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला. इथे त्यांनी रक्त सांडलं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे. आजही महाराज इथे आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. याचं भान ठेवा..."
View this post on Instagram
विश्वास पाटील यांनी रायगडाचं वर्णन करताना म्हटलं की "आणि फक्त स्पर्श नव्हे तर परिस स्पर्श... म्हणजे लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. तसं महाराजांनी या परिसराचं सोनं बनवलं आहे".
"एवढे सगळे पर्यटक येतात त्या सगळ्यांना एकच विनंती आहे की बाबांनो आपला रायगड स्वच्छ ठेवा रे. रस्त्यावर पडलेला कचरा आम्ही उचलू तरी पण अशा दगडांच्या खाच्यात घातलेला कचऱ्याचं काय करायचं? हे आपल्या राजांचं आहे, आपलं आहे...", असं प्रवीण तरडे यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना प्रवीण तरडे यांनी एक कॅप्शनही लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "मित्रांनो रायगड आपली राजधानी आहे... आपल्यासाठी तीर्थक्षेत्रच आहे... त्याचं पावित्र्य जपा... महाराज आजही रायगडावर आहेत हे लक्षात ठेवा..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























