Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
यंदाच्या होळी (Holi) पौर्णिमेवर ग्रहणाचं सावट असून आज यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण लागू झाल्याचं पाहायला मिळालं. दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी हे ग्रहण सुरु झालं, संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणार आहे. एकीकडे होळीनंतर धुळवड साजरी केला जात असून मुंबईसह मेट्रो सिटीमध्ये रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. काहींनी चंद्रग्रहण पाळत रंग खेळण्यापासून अंतर राखले आहे. तर, काहींनी रंगांची उधळण करत ही अंधश्रद्धा असल्याचं म्हटलं. मात्र, दोन दिवसांपूर्वीच टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजचा पराभव करत जगाचं लक्ष वेधलेल्या टीम इंडियानं (Team india) आज आपला सराव थांबवल्याचं महत्त्वाचं कारण समोर आलं आहे.
कुणी याला श्रद्धा म्हणेल तर कुणी अंधश्रद्धा, पण भारतीय क्रिकेट संघाच्या या कार्यपद्धतीची देशभर चर्चा होणार हे नक्की. कारण, बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज खग्रास चंद्रग्रहणाच्या काळात सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं वानखेडे स्टेडियमवर सराव करणं टाळलं आहे.
ट्वेन्टी 20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड संघांमधला उपांत्य सामना गुरुवार, 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचा नियोजित सराव आज दुपारपासून सुरु होणार होता. पण, भारतीय संघ व्यवस्थापनाला मुंबईत दाखल होताच आजच्या खग्रास चंद्रग्रहणाची माहिती मिळाली. त्यानंतर टीम इंडियाच्या सरावाची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. प्रत्यक्षात भारतीय संघ आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर फ्लडलाईट्समध्ये सराव करताना दिसेल. तर, इंग्लंड संघाचा सराव पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुपारी सुरू झाला आहे. मात्र, खग्रास ग्रहणामुळे टीम इंडियाने आपला दुपारचा सराव टाळल्याची माहिती समोर आली आहे.





















