Aastad Kale Post On Corporate Professionals: 'राजकारण एकमेव क्षेत्र, जिथे...'; मराठी अभिनेत्याची वास्तवाची जाणीव करुन देणारी खरमरीत पोस्ट
Aastad Kale Post On Corporate Professionals: मराठी रंगभूमी, तसेच मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला आस्ताद काळे नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आपलं मत व्यक्त करत असतो.

Aastad Kale Post On Corporate Professionals: स्टार प्रवाहवरच्या (Star Pravah) 'पुढचं पाऊल' (Pudhcha Paaul) मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) सध्या त्याच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. अनेक मालिकांसोबतच नाटकांमधूनही आस्तादन आपल्या अभिनयाची छाप सोडली. सोशल मीडियावरही आस्ताद नेहमीच सक्रीय असतो. वेगवेगळ्या विषयांवर तो नेहमीच व्यक्त होत असतो. नुकतीच त्यानं राजकाणी (Maharashtra Politics) आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची तुलना करणारी खरमरीत पोस्ट केली आहे.
मराठी रंगभूमी, तसेच मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला आस्ताद काळे (Marathi Actor Aastad Kale) नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आपलं मत व्यक्त करत असतो. आस्ताद काळे बेधडकपणे सोशल मीडियावर आपलं मत मांडत असतो. मग तो सामाजिक प्रश्न असो वा राजकीय.... अशातच आता आस्ताद काळेनं भयाण वास्तवाची जाणीव करुन देणारी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यानं राजकारणी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची तुलना केली आहे. तसेच, दोन्ही क्षेत्रांत मिळणारं वेतन आणि त्यांची काम याचीही तुलना केली आहे. तसेच, राजकारण्यांवर ताशेरेही ओढले आहेत.
अभिनेता आस्ताद काळे सोशल मिडिया पोस्टमध्ये काय म्हणाला?
मराठी अभिनेता आस्ताद काळेनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "कॉर्पोरेट असो, आय.टी असो, बँकिंग असो.... या सर्व क्षेत्रांमध्ये महिन्याला साधारण रु.2,50,000/- ते रु.4,50,000/- एवढा पगार मिळवणारे लोक हे मोठ्या पदांवर असतात, अधिकारी असतात. त्यांना तिथपर्यंत पोचायला बऱ्यापैकी उच्च शिक्षण घेणं आवश्यक असतं. त्यांनी काही महिने जरी कामात टाळाटाळ केली, जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत तर त्यांची नोकरी अथवा त्यांचं पद धोक्यात येऊ शकतं. शिवाय सरकारी बँकेतले, कंपनीतले कर्मचारी/अधिकारी असाल तर ठराविक वयाचे झाल्यावर तुम्हाला निवृत्त व्हावंच लागतं..."
View this post on Instagram
"मात्र......!!!!! राजकारण हे एकमेव क्षेत्र असं आहे, जिथे शिक्षणाची मूलभूत काहीही अट नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवडून आलात की पुढची 5 वर्ष तुमचा हा पगार, भत्ते वगैरे चालू असतं. दुसऱ्यांदा निवडून आलात की, त्यात वाढही होते. आणि या 5 वर्षांमध्ये तुम्ही धड काम नाही केलंत, जबाबदाऱ्या पार नाही पाडल्यात, तरी तुमची हकालपट्टी होत नाही. आणि ही कामं, जबाबदाऱ्या या गावं, शहरं, राज्यं आणि देश चालवण्याशी निगडित आहे राव !!! आणि वयोमानपरत्वे निवृत्तीची सक्तीही नाही. मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी !!!!!", असं आस्ताद काळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























