Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
दोन दशकांच्या दुराव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवली. मात्र ही एकी ठाकरे बंधूंना विजयापर्यंत पोहोचवू शकली नाही. निकालानंतर मात्र या ना त्या कारणावरून ठाकरे बंधूंमध्ये दुरावा वाढू लागल्याची चर्चा आहे. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट असो, स्वीकृत नगरसेवकपदाचा मुद्दा असो किंवा प्रभाग समित्यांच्या वाटपाचा प्रश्न असो. दोन्ही पक्षात यावरून नाराजी पसरत असल्याचं चित्र निर्माण झालं. मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेत सध्या तरी या नाराजीवर तोडगा काढलाय. या दोन पक्षात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमध्ये.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १८ फेब्रुवारीला झालेली भेट काही मिनिटांत संपली होती. या भेटीचा काय इफेक्ट झाला, हे अद्याप स्पष्ट नसलं तरी या भेटीचे साईड इफेक्ट्स मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून दिसतायत. स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंकडून मातोश्री बंगल्याकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र मातोश्रीकडून याला काहीच उत्तर न देता परस्पर घोषणा करण्यात आली, असं सूत्र सांगतात. त्यानंतर प्रभाग समितीच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंकडून विचारणा करण्यात आली होती. मात्र त्याला उत्तर न देता राज ठाकरेंनीही फिट्टमफाट केल्याची चर्चा होती. त्यामुळं ठाकरे बंधूंमध्ये आता पुन्हा दुरावा येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र सध्या तरी दुराव्याच्या या जखमेवर बैठकांचं मलम लागलंय. प्रभाग समित्यांच्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि मनसेत यशस्वी वाटाघाटी झाल्याची चर्चा आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांच्यात झालेल्या बैठकीत प्रभाग समित्यांचं वाटप निश्चित झाल्याचं कळतंय. मनसेला चार प्रभाग समित्या मिळणार असल्याची माहिती आहे
हे वाटप ठरवणारी बैठक झाल्यानंतर ठाकरे बंधूंमधल्या दुराव्याविषयी माध्यमांनी वरुण सरदेसाईंना प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी इतर पक्षांची उदाहरणं देत वेळ मारून नेण्याचा असा प्रयत्न केला.
तर मनसेच्या नेत्यांची बॉडी लँग्वेजही बोलकी होती. प्रभाग समित्यांबाबतची चर्चा सकारात्मक झाल्याचं मनसेनंही सांगितलं. पण सगळंच काही माध्यमांसमोर बोलता येत नाही, असं म्हणत नाराजीचा एक पैलू त्यांनी गुलदस्त्यात ठेवणंच पसंत केल्याचं दिसलं.
स्वीकृत नगरसेवकांचा विषय असो किंवा प्रभाग समित्यांच्या वाटपाचा असो. दोन्ही पक्षातली नाराजी दूर झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र याचा दुसरा अर्थ 'नाराजी होती', असा आहे. भविष्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांची नाराजी दूर करत राहणार की नाराजी निर्माणच होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार, यावर भविष्यातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.
All Shows































