![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar : 40 टक्के भानगड काय आहे हे कळेना, कर्नाटकची इतकी बदनामी कुणीही केली नाही; प्रचार संपताना शरद पवारांचा भाजपवर शेवटचा 'वार'
Karnataka Election 2023 : निपाणीतून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून द्या, इथल्या उसाला दर वाढवून देण्याबाबत मार्गदर्शन करू असं आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं.
![Sharad Pawar : 40 टक्के भानगड काय आहे हे कळेना, कर्नाटकची इतकी बदनामी कुणीही केली नाही; प्रचार संपताना शरद पवारांचा भाजपवर शेवटचा 'वार' NCP sharad pawar slams bjp on 40 percent commission govt karnataka election marathi update Sharad Pawar : 40 टक्के भानगड काय आहे हे कळेना, कर्नाटकची इतकी बदनामी कुणीही केली नाही; प्रचार संपताना शरद पवारांचा भाजपवर शेवटचा 'वार'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/e6f0c1337d16b6e4e4ff4f3c01cc9ada1683034176275488_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव: कर्नाटकात 40 टक्क्यांचं सरकार आहे असं म्हटलं जातं, ही 40 टक्के भानगड काय असते हे काही कळेना अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली आहे. मणिपूरसारखं लहान राज्य भाजप सरकारला सांभाळता येईना असंही ते म्हणाले. बेळगाव जिल्ह्यातल्या निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी भाजपवर चांगलीच टीका केली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी आज प्रचार संपला असून 10 मे रोजी मतदान होणार आहे.
निपाणी या ठिकाणी आयोजित सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की कर्नाटकात जाऊन शेतकऱ्यांचे, तरुणांचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीत उतरायचं. त्यानंतर आम्ही या ठिकाणी उमेदवार दिले. उत्तम पाटील यांना निपाणीमधून संधी दिली.
निवडणुकीत चावी देणारे लोक खूप असतात, पण कुठं थांबायचं हे कळलं नाही की अपघात होतो असा टोला शरद पवारांनी काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांना लगावला.
शरद पवार पुढे म्हणाले की, धनाचा वापर करून माणसं फोडून सरकार बनवली जातात, त्याला कर्नाटक देखील अपवाद नाही. अशा पैशाचा वापर करून सरकार बनवणाऱ्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. ही 40 टक्के काय भानगड आहे हे कळेना. कर्नाटकची आजवर इतकी बदनामी कुणीही केली नाही जितकी भाजप सरकारने केली आहे. मिळालेली सत्ता सामान्य माणसासाठी वापरायची असते. पण तसं कर्नाटकात झाल्याचं दिसत नाही.
मणिपूरमध्ये गेले 6 दिवस संघर्ष सुरू आहे, अनेक विद्यार्थी मृत्युमुखी पडले सांगत शरद पवार म्हणाले की, ज्यांच्या हातात देश आहे त्यांना मणिपूर सारखं राज्य सांभाळता येत नाही. मणिपूर कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. शरद पवार म्हणाले की, 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे, इथले काही लोक त्याला अशुभ दिवस म्हणत आहेत.
शरद पवार म्हणाले की, माझ्याकडे 10 वर्षे कृषी खातं होतं, 72 हजार कोटी कर्जमाफी केली, व्याजाचे दर 3 टक्क्यांवर आले. उत्तम पाटील यांना निवडून द्या, इथल्या उसाला दर वाढवून देण्याबाबत मार्गदर्शन करू.
दरम्यान, कर्नाटकातील निवडणुकीचा प्रचार आज संपला असून 10 मे रोजी मतदारांचा कौल मतपेटीत बंद होणार आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)