Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे हे शरद पवारांचा फॉर्म भरण्यासाठी आले नाहीत अशी कुजबूजही सुरू झाली. या सर्व गोष्टींवरती आज आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई : राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीचं ठरलं आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शरद पवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज देखील भरला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव, काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित नसल्याने त्याची चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेवर आदित्य ठाकरे आग्रही होते. ही जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळावी यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीने शरद पवारांचं नाव पुढे केलं. अशाही परिस्थितीत ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. नंतर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीकडून शरद पवारांचं नाव अंतिम झालं. या सर्व घडामोडी घडत असताना आदित्य ठाकरे मात्र नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे शरद पवारांचा फॉर्म भरण्यासाठी आले नाहीत अशी कुजबूजही सुरू झाली. या सर्व गोष्टींवरती आज आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काल जो निर्णय झाला तो सर्वांच्या मताने झाला
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांचं राजकारणात जे स्थान आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. त्यांच्याबद्दल आदर आहे,जी काही मैत्री आहे आणि माझ्या आजोबापासूनचे जे त्यांच्यासोबत पारिवारीक संबंध आहेत, त्याबद्दल दुमत नाही आणि असायचं कारण देखील नाही. पण मी जी भूमिका मांडली, आणि आज देखील मांडत आहेत, ती पक्षहिताची आणि पक्षासाठी आणि पक्षाच्या वतीने मांडत आहे. यामध्ये कुठेही माझा स्वार्थ नव्हता की आज माझी सीट राहिल, उद्या माझी सीट जाईल, असं कुठेही नव्हतं, पण दोन ते तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या, ते म्हणजे कोणतीही घोषणा पत्रकार परिषदेत होत नाही, ती मातोश्रीवरती बैठक झाल्यानंतरच घोषणा होते. हे परवा सिध्द झालं. जयंत पाटील, सुप्रिया सुळे मातोश्रीवर आले होते. त्यानंतर आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की, पक्षाच्या विलीनीकरणाच्या भुमिकेबाबत संभ्रम होते, ते काल स्पष्ट झाले, आता शिवसेना ठाकरे पक्षाला आता जी ही राज्यसभेची संधी होती, ती गेल्यानंतर आता कदाचित २०२९ पर्यंत पुन्हा संधी येणार नाही, कारण आता जे आम्ही फॉलो करत होते, आकडे पाहत होतो, त्यामुळे आता २०२८ला कदाचित आमच्यातील इच्छुक होते, ते दावा करतील किंवा काँग्रेस दावा करेल पण या सगळ्यात मतांचा कोटा फार वाढतो आहे, मी जी भूमिका मांडत होतो, ती पक्षासाठी मांडत होतो, स्वार्थासाठी मांडत नव्हतो, त्यावरती मी ठाम होतो, पण काल जो निर्णय झाला तो सर्वांच्या मताने झाला, काल बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने मान्यता दिली, अंसंही पुढे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
त्या दिवशी मी उदयपूरला होतो
खरंतर हा टर्न राज्यसभेचा आमच्याकडे होता,महाविकास आघाडीमध्ये ज्या प्रकारे राज्यसभेचा टर्न आमच्या पक्षाकडे आता येईल तो आता थेट 2029 ला येईल, त्यामुळे जो कोणी असेल त्याला 2029 पर्यंत थांबावं लागेल, आणि ज्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली, त्या दिवशी मी उदयपूरला होतो आणि काल अर्जुनचं लग्न होतं त्यामुळे मी येऊ शकलो नाही त्यामुळे मी नाराज नव्हतो, असंही पुढे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली






















