Karnataka Elections: 'कर्नाटकमध्ये महागाई आणि बेरोजगारीची दहशत'; प्रियंका गांधींचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल
Priyanka Gandhi On BJP: कर्नाटकात गरिबी आणि बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पंतप्रधान मोदींनी महागाई, बेरोजगारीची दहशत माजवल्याने ही परिस्थिती आल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या.

Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकातील निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी (PM Modi) कर्नाटकात येतात आणि येथील दहशतवादावर बोलतात, कर्नाटकाच्या विकासावर बोलण्याऐवजी मोदी नेहमी दहशतवादावर बोलतात. इथे दहशत असेल तर ती फक्त महागाई आणि बेरोजगारीची दहशत आहे आणि त्याचं कारणही आहे 'मोदी सरकार', असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. कर्नाटकातील मोडबिद्री येथील एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) म्हणाल्या, दहशतवादावर बोलण्याठी कर्नाटक (Karnataka) ही जागा नाही. कर्नाटकात दहशत असेल तर ती तुमच्या 40 टक्के सरकारची दहशत आहे, जी जनतेची लूट करत आहे, असं म्हणत त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
कर्नाटकात दररोज 5 तरी शेतकरी आत्महत्या करत आहेत. कर्नाटकात 4 वर्षात 6 हजार 487 शेतकरी, गरिबीमुळे 542 जणांनी, बेरोजगारीमुळे 1 हजार 675 आणि कर्जबाजारीपणामुळे 3 हजार 734 जणांनी आत्महत्या केल्याचंही प्रियांका गांधींनी नमूद केलं.
'दोन लोकांना अनेक गोष्टी विकल्या'
प्रियंका गांधी म्हणाल्या की, पूर्वी कॉर्पोरेशन बँक, विजया बँक, सिंडिकेट बँक आणि कन्नड बँक या चार वेगवेगळ्या बँका होत्या आणि आता या सरकारमुळे आज सर्व एकाच बँकेत विलीन झाले आहेत. नेत्यांची सवय बिघडली तर त्यातून सुटणे देखील अवघड होऊन बसेल, असा उल्लेखही त्यांनी केला. तुम्ही इथे अनेक गोष्टी दोन लोकांना विकल्या आहेत. सर्व काही महाग केलं आहे, असंही त्या म्हणाल्या.
पुढे प्रियंका गांधी म्हणाल्या, आम्ही छत्तीसगडमधील 18 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आहे. नवीन पेन्शन योजनेवर अनेकांचा आक्षेप असल्याने आम्ही जुनी पेन्शन योजना परत लागू केली आहे, त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
'200 युनिट मोफत वीज दिली जाईल'
कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर अनेक सोईसुविधा उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन प्रियंका गांधींनी कर्नाटकातील जनतेला दिलं आहे. आम्ही एका वर्षात अडीच लाख सरकारी पदं भरण्याचे काम करू, तसेच 200 युनिट मोफत वीज दिली जाईल. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील मुख्य सदस्याला 2,000 रुपये मिळतील. महिलांसाठी बस पास मोफत केले जातील. पदवीधर झालेल्या बेरोजगारांना 3,000 रुपये आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना 1,500 रुपये दिले जातील, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
हेही वाचा:
लोकसभेच्या भाजप-शिवसेना युतीबाबत 'हे' आदेश दिल्लीहून आले; शिरसाट यांचा महत्वाचा खुलासा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

