एक्स्प्लोर
मी धोनीकडून बरंच काही शिकलो : हार्दिक पंड्या
'संघाचा विचार सगळ्यात आधी करा. धोनीचा हा सल्ला मी लक्षात ठेवला. त्यामुळेच दबाव बाजूला सारुन मला खेळता आलं.' असं शतकवीर पंड्या म्हणाला.

फोटो सौजन्य : AP
कॅण्डी : पहिल्याच कसोटी मालिकेत वादळी शतक झळकावणारा टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानं आपल्या या यशाचं श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पंड्यानं 96 चेंडूत 108 धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मीडियाशी बातचीत करतावा पंड्या म्हणाला की, 'माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच 90 धावा केल्यानंतरही एवढा आरामात खेळत होतो. आतापर्यंत मी जेवढ्या शतकी खेळी साकारल्या तेव्हा-तेव्हा मी दबावात खेळायचो. या सामन्यात मात्र मी नव्वदीनंतरही सहजपणे फटके मारत होतो. आता फलंदाजी करताना मी एका वेगळ्या विश्वात असतो. त्यामुळे स्वत:च्या स्कोअर आणि विक्रमाबद्दल मी अजिबात विचार करत नाही.' यानंतर पंड्या म्हणाला की, 'मी माही भाईकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या टीमला सगळ्यात पुढे ठेवा, स्कोअरबोर्ड पाहून त्या पद्धतीनं खेळा. त्यांचा हा सल्ला लक्षात ठेवल्यानं मला दबाव बाजूला सारुन खेळता आलं.' सुरुवातीला पंड्यावर काही जणांनी टीकाही केली होती. पण तरीही टीम मॅनेजमेंटनं त्याच्यावर भरोसा दाखवला आणि पंड्यानंही त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही त्याच्या या शतकी खेळीचं कौतुक करत तो भविष्यातील कपिल देव असल्याचं म्हटलं. पंड्यानं करिअरमधील पहिल्याच 3 कसोटीत खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना एक शतक, एक अर्धशतक आणि एका ओव्हरमध्ये 26 धावा करण्याचा एक मोठा विक्रम रचला आहे. तसेच त्यानं पाच विकेटही घेतल्या आहेत.






















