Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
कुणी याला श्रद्धा म्हणेल तर कुणी अंधश्रद्धा, पण भारतीय क्रिकेट संघाच्या या कार्यपद्धतीची देशभर चर्चा होणार हे नक्की.

यंदाच्या होळी (Holi) पौर्णिमेवर ग्रहणाचं सावट असून आज यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण लागू झाल्याचं पाहायला मिळालं. दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी हे ग्रहण सुरु झालं, संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणार आहे. एकीकडे होळीनंतर धुळवड साजरी केला जात असून मुंबईसह मेट्रो सिटीमध्ये रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. काहींनी चंद्रग्रहण पाळत रंग खेळण्यापासून अंतर राखले आहे. तर, काहींनी रंगांची उधळण करत ही अंधश्रद्धा असल्याचं म्हटलं. मात्र, दोन दिवसांपूर्वीच टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजचा पराभव करत जगाचं लक्ष वेधलेल्या टीम इंडियानं (Team india) आज आपला सराव थांबवल्याचं महत्त्वाचं कारण समोर आलं आहे.
कुणी याला श्रद्धा म्हणेल तर कुणी अंधश्रद्धा, पण भारतीय क्रिकेट संघाच्या या कार्यपद्धतीची देशभर चर्चा होणार हे नक्की. कारण, बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज खग्रास चंद्रग्रहणाच्या काळात सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं वानखेडे स्टेडियमवर सराव करणं टाळलं आहे.
ट्वेन्टी 20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड संघांमधला उपांत्य सामना गुरुवार, 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचा नियोजित सराव आज दुपारपासून सुरु होणार होता. पण, भारतीय संघ व्यवस्थापनाला मुंबईत दाखल होताच आजच्या खग्रास चंद्रग्रहणाची माहिती मिळाली. त्यानंतर टीम इंडियाच्या सरावाची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. प्रत्यक्षात भारतीय संघ आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर फ्लडलाईट्समध्ये सराव करताना दिसेल. तर, इंग्लंड संघाचा सराव पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुपारी सुरू झाला आहे. मात्र, खग्रास ग्रहणामुळे टीम इंडियाने आपला दुपारचा सराव टाळल्याची माहिती समोर आली आहे.
5 मार्च रोजी भारताची लढत
सुपर 8 मध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला मात देत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता, उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया असा सामना रंगणार आहे. तसेच, द.आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात उद्या 4 मार्च रोजी सामना होईल. या दोन्ही सामन्यात विजयी होणाऱ्या संघास अंतिम सामन्याचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे, चारही संघांनी आपलं सर्वस्व देत सराव सुरू केला आहे. टी-20 चा विश्वचषक उंचावण्यासाठी टीम इंडियाही सज्ज झालीय.
भारतातही चंद्रग्रहण
वैदिक पंचांगानुसार, आज 3 मार्च रोजी 2026 चे पहिले चंद्रग्रहण आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतातही दिसेल. त्यामुळे, सुतक आणि इतर विधींबाबतचे सर्व नियम येथे लागू होतील. ज्योतिषांच्या मते, ग्रहणांचा परिणाम शुभ आणि अशुभ दोन्ही राशींवर होतो. या चंद्रग्रहणाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, असं सांगण्यात येतं.
चंद्रग्रहणाची वेळ
चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ: दुपारी 3:20
जास्तीत जास्त ग्रहण: अंदाजे संध्याकाळी 6:33 ते 6:40
ग्रहण संपण्याची वेळ: सायंकाळी 6:47
हेही वाचा
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो




















