![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'देवेंद्रजी, कामाला लागा'; सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना सल्ला
भाजपने सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
!['देवेंद्रजी, कामाला लागा'; सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना सल्ला Shivsena advise to devendra fadnavis in Saamana Editorial 'देवेंद्रजी, कामाला लागा'; सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना सल्ला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/10/01152555/Devendra-Fadnavis.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागावे असा सल्ला शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखामधून देण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. याचाच धागा पकडून अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. बहिष्कार टाकण्यापेक्षा फडणवीस यांनी शेतकरी, कष्टकरी या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला हवा होता, असंही सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या 105 आमदारांशी संवाद साधायचं ठरवलं तर विरोधी पक्षनेत्यांचं काय होईल असा खोचक सवालही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
सामना अग्रलेख - देवेंद्रजी, कामाला लागा! बहिष्काराने 'संवाद' कसा होईल?
भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील '105' लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल? नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एक हवाबाज विधान केले. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षात राहणार नाहीत. त्यांच्यामागची 'माजी' ही बिरुदावली लवकरच जाईल. या विधानामुळे विरोधी पक्षांना मानसिक गुदगुल्या झाल्या असतीलही, पण महाराष्ट्रात असे काही घडणार नाही. तेव्हा देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकेच आम्ही सुचवू शकतो!
पाहा व्हिडीओ : #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे आता काही राहिलेले नाही, पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार टाकून विधिमंडळ अधिवेशनातील त्यांच्या पक्षाची दिशा ठरवून टाकली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. विरोधी पक्षाने चहापान कार्यक्रमात हजेरी लावून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला हवा होता. राज्याच्या हिताच्या काही सूचना करता आल्या असत्या. शेतकरी, कष्टकरी अशा प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला काहीच हरकत नव्हती, पण विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा एकदा आडमुठे धोरण स्वीकारले. विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावरील बहिष्काराचे समर्थन करताना जो युक्तिवाद केला तो बिनबुडाचा आहे. ते सांगतात, ''राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये 'आपसातच' सुसंवाद नाही. त्यामुळे त्यांच्याशी विरोधकांचा संवाद कसा होणार? महाविकास आघाडीने सर्वप्रथम आपसात संवाद साधावा आणि मग आम्हाला चहापानासाठी आमंत्रण द्यावे.'' असे श्री. फडणवीस सांगतात हे हास्यास्पद आहे.
विरोधी पक्षनेत्याने संसदीय लोकशाहीच्या परंपरा राखून काम केले तर तो 'शॅडो मुख्यमंत्री' असतो व मुख्यमंत्र्यांइतकेच विरोधी पक्ष नेत्याकडे प्रश्न व माहिती घेऊन लोक तसेच अधिकारी येत-जात असतात, पण फडणवीस या कामात अपयशी होताना दिसत आहेत. त्यांच्याकडे अर्धवट माहिती आहे. मुळात महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये उत्तम परस्पर संवाद आहे आणि कोणत्याही परिस्थितीत विसंवाद होणार नाही याची खात्री महाराष्ट्राला आहे. आघाडीतील सर्व घटक पक्ष सरकार चालवणे व टिकवणे या भूमिकेवर ठाम आहेत. आता हीच जर विरोधी पक्षनेत्यांची पोटदुखी असेल तर आमचा नाइलाज आहे. महाविकास आघाडीत भिन्न विचारांचे तीन पक्ष एकत्र आले हादेखील एक संवादच आहे, पण भारतीय जनता पक्षाबरोबर हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर पंचवीस वर्षे साथ देणाऱया शिवसेनेशी तुमचा संवाद का तुटला याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. संवादाचे धोरण नीट राबवले असते तर महाराष्ट्राचे राजकीय चित्र वेगळे दिसले असते. त्यामुळे संवाद कौशल्याचे धडे श्री. फडणवीस यांनी महाविकास आघाडीस द्यायची गरज नाही. संवाद कौशल्याबाबतचे एक शिबीर रामभाऊ म्हाळगी संस्थेत ठेवून त्यात भाजपातील अनेक नेत्यांनी सहभागी व्हावे, असे एकंदरीत वातावरण आहे. विरोधी पक्षांची सध्या जी धोपटशाही सुरू आहे तोच त्यांचा 'संवाद' असेल तर ईश्वर त्यांचे रक्षण करो! विधिमंडळात सरकारला काम करू देणार नाही, असा धोपटमार्ग देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे.
पाहा व्हिडीओ : CM on NPR CAA | एनपीआरमध्ये अडचणीचे प्रश्न आहेत का हे तपासू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
श्री. फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा भूषवले आहे. एकदा पाच वर्षे व दुसऱयांदा 80 तास. त्या 80 तासांचा अनुभव महत्त्वाचा ठरतो, कारण 80 तासांत राष्ट्रपती भवन, राजभवन, गृहमंत्रालय, ईडी, सीबीआय यांच्यामार्फत 'संवाद' साधूनही महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटला नाही. त्यामुळे तुमच्यापेक्षा आमच्यातील संवाद मस्त आहे. भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे 105 आमदार आहेत. बाकी इतर कुणी त्यांच्याबरोबर आहेत असे दिसत नाही. या 105 मध्येही किमान 50 असे आहेत की, ते विचाराने 'उपरे' आहेत व विरोधी पक्षात राहून काम करण्याची त्यांची भूमिका नाही. भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील '105' लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल? नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एक हवाबाज विधान केले. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षात राहणार नाहीत. त्यांच्यामागची 'माजी' ही बिरुदावली लवकरच जाईल. या विधानामुळे विरोधी पक्षांना मानसिक गुदगुल्या झाल्या असतीलही, पण महाराष्ट्रात असे काही घडणार नाही. तेव्हा देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकेच आम्ही सुचवू शकतो!
महत्त्वाच्या बातम्या :
Farmers Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर
चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असंख्य शिवसैनिकही अयोध्येला जाणार
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | माझ्या हातात सरकारचा रिमोट नाही : शरद पवार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)