Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Maharashtra Budget 2026: अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्याची वित्तीय तूट 3 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा कमी म्हणजेच 2.60 टक्क्यांवर राखण्यात यश आले आहे.

Maharashtra Budget 2026: सरकारने सादर केलेला 7 लाख 69 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून 'विकसित महाराष्ट्र 2047' चे स्वप्न साकार करणारा एक जाणीवपूर्वक तयार केलेला रोडमॅप आहे," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प 4 प्रमुख क्षेत्रे आणि 165 उपक्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारा असून, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया रचणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजितदादांच्या पश्चात फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. 'लाडकी बहीण योजना' यशस्वीपणे सुरू असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ३७ लाख 'लखपती दीदी' तयार झाल्या असून, आगामी काळात आणखी 25 लाख महिलांना या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलं असल्याचे ते म्हणाले. यंदा 'अलनिनो'चे (El Nino) वर्ष असल्यामुळे पाऊस कमी पडण्याची आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी शासनाने आतापासूनच वैरण विकास, पिण्याचे पाणी राखून ठेवणे आणि जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शिस्तबद्ध अर्थव्यवस्था
राज्याची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्याची वित्तीय तूट 3 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा कमी म्हणजेच 2.60 टक्क्यांवर राखण्यात यश आले आहे. तसेच महसूल तूट देखील 1 टक्क्याच्या खाली ठेवण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प समता आणि समरसतेने काम करण्यासाठी अजित पवार यांना समर्पित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता
विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा, एआयचा (AI) वापर करून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. 'ॲग्रीस्टॅक' आणि 'महाविस्तार' या दोन प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांना तज्ञांशिवाय केवळ पिकाचा फोटो काढून परिस्थिती जाणून घेता येईल.
कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात क्रांती
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून 13-14 हजार मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या मोफत विजेसाठी 32 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, शेतमजुरांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण आणि युवा पिढीसाठी संधी
त्यांनी सांगितले की, राज्यात 'एज्युसिटी' निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे. जगातील पहिल्या 100 विद्यापीठांपैकी काही विद्यापीठे महाराष्ट्रात येणार असून, भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण आता इथेच उपलब्ध होईल. स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी 'फंड ऑफ फंड्स'ची निर्मिती करण्यात आली असून 25 लाखांपर्यंतची कामे त्यांना उपलब्ध करून दिली जातील. खेळ क्षेत्रात 'मिशन लक्ष्यवेध'च्या माध्यमातून खेळाडू घडवले जातील.
पायाभूत सुविधा आणि पर्यावरण
राज्यातील १ हजार गावांना काँक्रीटच्या रस्त्यांनी जोडण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने छोट्या शहरांमध्ये ६ हजार कोटी रुपये खर्च करून मलनिस्सारण आणि एसटीपीची (STP) कामे पूर्ण केली जातील. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढील 7 वर्षांत 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून, 33 टक्के वनाच्छादनाचे उद्दिष्ट गाठले जाईल, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या






















