MNS Sandeep Deshpande: राज ठाकरेंना ललकारणाऱ्या सुशील केडियाला संदीप देशपांडेंनी सुनावलं, म्हणाले, 'व्यापारी आहात, बाप बनायचा प्रयत्न करु नका'
Sandeep Deshpande on Mira bhayandar Morcha: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात एकजूट होत मोर्चा काढला होता. यावरुन राजकीय वातावरण तापले आहे.

Sandeep Deshpande on Mira bhayandar Morcha: 'आमच्याकडे मराठी नव्हे हिंदीच चालते', अशी टिप्पणी केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या व्यापाऱ्याच्या भाईबांधवांनी गुरुवारी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढून मनसेचा निषेध केला होता. यावेळी मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे मनसेपासून (MNS) संरक्षण देण्याची मागणी केली होती. यावरुन मुंबईतील राजकीय वातावरण तापले होते. सोशल मीडियावर अनेक अमराठी लोकांकडून राज ठाकरे आणि मनसेला लक्ष्य करण्यात आले. एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील सुशील केडिया नावाच्या एका युजरने राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ललकारले होते. 'राज ठाकरे ड्रामा बंद कर. तुझे 10-12 गुंड दोन-चार कानाखाली मारतील. पण आम्ही आमरण उपोषणाला बसलो तर तुला हात जोडून माफी मारावी लागेल. मग काय करशील', असे या सुशील केडियाने म्हटले होते. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याच ट्विटचा धागा पकडत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मराठीला विरोध करणाऱ्यांना सज्जड भाषेत इशारा दिला. (Mira bhayandar News)
बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं. तूर्तास एवढंच, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. संदीप देशपांडे यांच्या या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं.तूर्तास एव्हढाच
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 4, 2025
BJP & MNS: मीरा-भाईंदरमधील मराठी भाजप पदाधिकार्याचा राजीनामा
मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. याविरोधात गुरुवारी मीरा-भाईंदरच्या काही भागात व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पाळला होता. व्यापाऱ्यांच्या या मोर्चाला भाजपचे स्थानिक आमदार आणि नेत्यांची फूस असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी केला होता. हे प्रकरण चर्चा करुन मिटणार होते. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला प्रवृत्त केले, असे जाधव यांनी म्हटले होते. या सगळ्या घडामोडींमुळे मीरा-भाईंदरमधील भाजपचे मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. याच नाराजीतून पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष श्री. कुंदन सुरेश मानकर यांनी भाजपला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला होता.
आणखी वाचा
























