(Source: Poll of Polls)
BLPG : 'वारी' स्टुडिओतली... 'वारी' निवेदनातली...!

BLPG : अँकर स्टँडबाय...थ्री...टू..वन.. क्यू..नमस्कार मी दीपक पळसुले... माझा विठ्ठल माझी वारी... या एबीपी माझाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत.. आपण आत्ता थेट आळंदीला जाणार आहोत... अगदी काही क्षणात माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. तत्त्पूर्वी आळंदीत इंद्रायणीच्या काठी जाऊया... मोठ्या संख्येनं वारकरी आळंदीच्या तीरावर जमले आहेत... वैष्णवांचा मेळा, पाहतासी डोळा, भजनी गोतावळा, विठ्ठल जिव्हाळा!
जय जय रामकृष्ण हरीच्या नामघोष सुरु झाला आहे, पालखी पंढरपूरच्या प्रस्थान ठेवणार आहे. राज्याच्या कोनाकोपर्यांतून संतांच्या पालख्या, दिंड्या दाखल झाल्या आहेत.आपली तहान भूक हरपून वारकरी हरीनामात दंग झाले आहेत, ऊनवाऱ्याची, पाऊसपाण्याची तमा न बाळगता ‘वारी’ मध्ये सहभागी झाले आहेत.. अशी ही वारी.. आपणही अनुभवणार आहोत.. पुढे काही दिवस... ही अशी पहिली बुलेटिनची पहिली अँकर लिंक वाचली की मनाला समाधान वाटतं..
हजारो वर्षांची परंपरा, वारकऱ्यांची तल्लीनता... जिथे अवघा महाराष्ट्र राग, लोभ सारं काही विसरुन केवळ देवभेटीकरिता एकवटतो त्या वारीचं मला पहिल्यापासूनच आकर्षण आहे. एक वार्ताहर, रिपोर्टर म्हणून आजवर वारी प्रत्यक्षात अनुभवताना मिळणारा अनुभव हा वेगळा असतो. आजवर कामाची भूमिका वगळता, माघीवारी ही वारकरी म्हणून नक्कीच अनुभवता आली आहे. असं म्हणतात की, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अगदी त्याचप्रमाणे आषाढीवारीत दरवेळी प्रत्यक्ष गेलो नाही तरी वृत्तनिवेदक म्हणून दरवर्षी वारीच्या प्रत्येक सोहळ्यात कॅमेऱ्याने टिपलेल्या प्रतिमेतून सहभागी होता येतं, त्यात समरसून जायला होतं.
वारीचा सोहळा... टाळ,चिपळ्यांचा, मृदंगाचे नाद कानाला,मनाला तृप्त करतात. स्टुडिओत आपण एकटे असतो, संपूर्णपणे अँकर म्हणून लक्ष असतं ते त्या बातमीत, त्यातून निघणाऱ्या लहरी या थेट काळजाला भिडत असतात.
ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान ठेवते त्याआधी माऊलींच्या मंदिराचा कळस दरवर्षी किंचतसा हलतो..त्याआधीची दोन-तीन मिनिटं त्या मंदिर प्रांगणातील शांतता ही एखाद्याच्या समाधी अवस्थेहून मला कमी वाटत नाही.तिथून मग सुरु होणारा प्रवास हा प्रत्येक पावलागणिक उत्कंठा वाढवणारा असतो.आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम कुठे आहे, माऊलींची पालखी कुठे मुक्कामी आहे. उभं रिंगण, गोल रिंगण, तुळशी वृदांवन घेऊन धावणारे सारे वारकरी, दिवे घाटाचं अवघड वळण.. रात्री राहुटीमधला मुक्काम... चुलीवर केला जाणारास्वयंपाक, काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी वारकऱ्यांसाठी केलेली सोय... कधी येणाऱ्या सोसायट्याचा वारा... सारं कसं हवंहवंस वाटत असतं...!
आमचे रिपोर्टर सहकारीदेखील माऊली होऊन वारीची प्रत्येक अपेडट... तिथे त्यांना आलेले अनुभव आधी कॅमेऱ्यातून...मग लेखणीतून पोहचवत असतात... आम्ही एक वृत्तनिवेदक म्हणून देहाने स्टुडिओत असतो पण मनाने केव्हाच वारीत सामील झालेलो असतो. वारीचा एक-एक टप्पा जितका वारकऱ्यांसाठी उत्साह वाढवणारा असतो, तितकाच तो स्टुडिओमध्ये असणाऱ्यांसाठीही उत्साहवर्धक असतो. वारकरी पायी चालत असतात आणि आम्ही सुद्धा कळत न कळत मनाने त्यांच्यासोबत कसे चालू लागतो ते कळतही नाही...
ज्यादिवशी मुख्य आषाढी एकादशीचा दिवस उजाडतो तेव्हा मात्र आमचीदेखील लगबग असते. शासकीय पूजा आणि प्रथम आलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाच्या पूजेचा मिळालेला मान.. मध्यरात्री सुरु होणारी पूजा...त्यात आम्ही स्टुडिओतील मंडळीसुद्धा शुचिर्भूतहोऊन सहभागी होतो अर्थात त्यादिवशी पहिलं बुलेटिन मध्यरात्री पूजेच्या वेळेपासूनसुरु होतं. आषाढीच्या दिवशी विठ्ठलाचं पहिलं दर्शनवारकऱ्यांसमवेत आम्हाला करण्याचं भाग्य त्यावेळी मिळतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
भाळी चंदनी टिळा| हास्य मुख्यकमल|| पैलतीरी चंद्रभागा | सावळा माझाविठ्ठल|| अशा मग ओळी सहजपणे लिहून जातो. चंद्रभागेच्यावाळवंटात दिंड्यापताका घेऊन तल्लीन होऊन ठेका धरणारे वारकरी पाहताना न कळतपणे मनातून देवाचं नाम घेणं सुरु होतं. निवेदनातून बातम्या सांगताना आम्ही वारकरी कसे होऊन जातो कळतही नाही.वारी अनेकांना अनेक गोष्टी शिकवते असं म्हणतात.समता, बंधुता, एकता, एकवाक्यता शिकवते अन् भेदाभेद विसरायला लावते.
आपण सारे एक आहेत,सर्वांचा ईश्वरही एकच आहे.फक्त नजर आणि दृष्टिकोन बदलण्याची आपल्याला गरज असते. समाजप्रबोधनाचा हा एक वेगळा आयाम या पालखीने हजारोवर्षांपासून आपल्याला घालून दिला आहे.तो आपण फक्त सांभाळायला हवा अशी संतांचीही कवण आहे. जर हीच शिकवण अंमलात आणली तर मानवी जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणारनाही हे मात्र नक्की !
तिथे आषाढी वारीची सांगता ते खरी,आम्ही बातम्यांमधून हे सांगत असतो, पण अजूनही वारी, वारकरी वारीतून बाहेर पडलेला नसतो,कारण परतवारी असते, त्यानंतर देवाच्या विश्रांतीचा काळ सुरु होतो त्यातही आम्हीसहभागी होतो,देव विश्रांती घेऊन पुन्हा येत नाही तोच कार्तिकी वारीची तयारी सुरु होते... आणि पुन्हा पुढच्या वारीच्या तयारीसाठी वारकरीही तयार होतात.. स्टुडिओतून बातम्या तयार होतात.. आणि ज्यांना शरिराने शक्य नाही अशा मंडळींनाघेऊन, बातम्यांची वारी करण्यासाठी वृत्तनिवेदक म्हणून आम्हीही तयार होतअसतो.. असो! तुर्तास विठुरायाचंदर्शन घेऊया... नाहीच जमलं तर कळसाचं दर्शन घेऊया.. आणि जीवनाला अर्थदेणाऱ्या ‘वारी’चा एकदा अनुभव घेऊया... वेळ झाली आहे एका छोट्याश्या ब्रेकची...! पाहात राहा माझा विठ्ठल, माझी वारी...!




















