एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठाचा पुरग्रस्तांना मदतीचा हात, विद्यापीठाकडून 25 लाख रुपये आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत
पूरग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ पुढे सरसावले आहे. आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत ठराव करण्यात आला आहे.

फाईल फोटो
मुंबई : राज्यातील कोकण, कोल्हापूर आणि सांगली येथे उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थीमुळे झालेले नुकसान आणि जनजीवन पूर्ववत होण्यासाठी तेथील नागरिकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुंबई विद्यापीठाकडून 25 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. यासोबतच पूरग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ पुढे सरसावले आहे. आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत ठराव करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशावेळी सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जपत विद्यापीठाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रुपये 25 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर या पूर परिस्थितीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विद्यापीठाने या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वह्या, पेन, प्रयोगशाळा साहित्य आदी बाबी उपलब्ध करुन देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. या मदतीसाठी विद्यापीठाने एका अभ्यासगटाची निर्मिती केली आहे. हा अभ्यासगट प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन व परिस्थितीचा अभ्यास करुन आवश्यक त्या ठिकाणी कोणत्या शैक्षणिक साहित्यांची गरज आहे याचीही पाहणी करणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांना देखील विद्यापीठाच्या केंद्रीय मदत कक्षामध्ये आवश्यक शैक्षणिक साहित्य जमा करण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या केंद्रीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत केली जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर यांनी सांगितले आहे.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















