Maharashtra News Updates 3rd May 2023 : बारसू रिफायनरीचा वाद पेटणार, बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा 6 मे रोजी प्रत्युत्तर मोर्चा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आज 3 मे रोजी देखील अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी पहिला भारतीय मूकपट 'राजा हरिश्चंद्र' प्रदर्शित झाला. तर, आज चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची जयंती आहे. मुस्लिम समाज सुधारक हमीद दलवाई, अभिनेत्री नर्गिस, गीतकार जगदीश खेबुडकर यांचा स्मृतीदिनदेखील आहे.
1897: चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा जन्म
मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक भालचंद्र पेंढारकर ऊर्फ भालजी पेंढारकर यांचा जन्म. भालजी पेंढारकर यांनी अनेक आशयघन चित्रपटांची निर्मिती केली. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे मोठे योगदान आहे. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली.
भालजी पेंढारकर यांची चित्रपट निर्मिती संस्था म्हणजे त्या काळी एक कलाकार घडवणारी संस्था होती. भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ हा भालजींनी उभारला. या स्टुडिओत अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण पार पडले आहे.
भारतीय चित्रपटक्षेत्रातल्या प्रदीर्घ कामगिरीसाठी त्यांना 1992 साली दादासाहेब फाळके पुरस्कार या चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले.
1913: पहिला भारतीय मूकपट 'राजा हरिश्चंद्र' प्रदर्शित
राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट होता. याची निर्मिती दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांनी केली होती. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट होता. भारतातील पुराणकथा राजा हरिश्चचंद्र यांच्या कथेवर आधारीत हा चित्रपट होता. चित्रपटात काम करणारे सर्व कलाकार मराठी असल्याने हा चित्रपटही मराठी चित्रपटांच्या श्रेणीत आला आहे. या चित्रपटात दत्तात्रय दामोदर दाबके यांनी राजा हरिश्चचंद्राची मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका अण्णा साळुंके नावाच्या अभिनेत्याने साकारली होती. 'राजा हरिश्चंद्र' चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला.
1939: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली
काँग्रेसमधून बाहेर पडत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. हा पक्ष काँग्रेसमध्ये एक गट म्हणून काम करत होता. स्वातंत्र्यानंतर या गटाने वेगळा राजकीय पक्ष स्थापन केला. महात्मा गांधी यांच्यासोबत मतभेद झाल्याने सुभाषचंद्र बोस यांनी 29 एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 3 मे रोजी उत्तर प्रदेशमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. सुरुवातीला फॉरवर्ड ब्लॉकचे उद्दिष्ट काँग्रेसमधील सर्व डाव्या वर्गांना एकत्र आणणे आणि काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कविशर हे त्याचे उपाध्यक्ष झाले. जूनच्या अखेरीस मुंबईत फॉरवर्ड ब्लॉकची परिषद झाली. त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर करण्यात आला.
1969 : भारताचे तिसरे राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन
भारताचे तिसरे राष्ट्रपती, एक ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी (1963) होते. जर्मन भाषेमध्ये त्यांनी महात्मा गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले. 1956 साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. 1967 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. झाकिर हुसेन यांनी अनेक शैक्षणिक समित्यांवर काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (1954) हा पुरस्कार देण्यात आला.
1971: प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन
धनंजय गाडगीळ हे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी भारतात आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांची उभारणी केली होती. गाडगीळ हे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष देखील होते.
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते. केंद्र सरकारकडून चौथ्या आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राज्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्य वाटपासाठी त्यांनी सूत्र निश्चित केले होते. महाराष्ट्रातील शेतकरी सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे श्रेय त्यांना जाते.
1977 : मुस्लिम समाज सुधारक हमीद दलवाई यांचे निधन
मुस्लिम समाज सुधारक, पत्रकार, लेखक हमीद दलवाई यांचे निधन. मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी 1970 मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन केले होते. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे. 1966 मध्ये सात मुस्लिम महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. मुसलमानांमधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी हा या मोर्चाचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा. या मोर्चाची मोठी चर्चा झाली, त्याशिवाय मुस्लिम महिलांचा प्रश्नही ऐरणीवर आला. महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती.
1981 : अभिनेत्री नर्गिस यांचे निधन
फातिमा रशीद ऊर्फ नर्गिस यांचे निधन आजच्या दिवशी झाले. नर्गिस यांनी बाल कलाकार म्हणून 1935 मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात 1942 साली तमन्ना या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते 1960 च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गीसने अनेक सिनेमांतून कामे केली. राज कपूर आणि नर्गिस यांच्या ऑन स्क्रिन जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. मदर इंडिया चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अभिनेते सुनील दत्त यांनी त्यांना आगीतून वाचवले होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले आणि ते विवाहबद्ध झाले. नर्गिस या राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार होत्या.
कर्करोगासारखा जीवघेण्या आजाराने नर्गिस यांनी वयाच्या 51 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नर्गिस यांचे पती आणि अभिनेते सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या स्मरणार्थ नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाउंडेशनची स्थापना केली.
2011: गीतकार जगदीश खेबुडकर यांचे निधन
लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना करणारे गीतकार अशी जगदीश खेबुडकर यांची ओळख होती. पेशाने शिक्षक असणाऱ्या जगदीश खेबुडकर यांनी आपल्या कारकिर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते सोनू निगमपर्यंत सर्वच दिग्गज, प्रसिद्ध गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य समजले जाते.
साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’, पिंजरा' आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली.
सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. 25 पटकथा, संवाद , 50 लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. जगदीश खेबुडकर यांनी आपल्या पाच दशकाच्या कारकीर्दीत जवळपास 36 दिग्दर्शक, 44 संगीतकार आणि जवळपास 30 हून अधिक गायकांसोबत काम केले आहे.
इतर महत्त्वाच्या घटना
1994 : सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण
2006: भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन.
Barsu Refinery: बारसू रिफायनरीचा वाद पेटणार, बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा 6 मे रोजी प्रत्युत्तर मोर्चा
Barsu Refinery: बारसू रिफायनरीचा वाद पेटणार
रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरेंविरोधात महायुती भिडणार
बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा प्रत्युत्तर मोर्चा
रत्नागिरीत 6 मे रोजी युतीचे नेते काढणार समर्थन मोर्चा
उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार करणार मोर्चाचे नेतृत्व
उद्धव ठाकरे उतरणार असलेल्या हेलिपॅडपासूनच युतीच्या नेत्यांचा मोर्चा
ठाकरे गट व शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकणार
Latur News : लातूर जिल्हाभरात ढगाळ वातावरण; अहमदपूर शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी
Latur Unseasonal Rains: मागील काही दिवसापासून जिल्हाभरात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मोठ्या प्रमाणात शेतीचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. भाजीपाला फळबाग आणि ज्वारीचे नुकसान या पावसाने केले होते .. दोन दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे मात्र त्यात नुकसान झाल्याची घटना घडली नाही .. मात्र आज अहमदपूर शहर आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे..वारे आणि ढगांचा गडगडाट होत पावसाने हजेरी लावली आहे. जिल्हाभरात ढगाळ वातावरण आहे. थंड हवा वाहत असल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र गारवा जाणवत आहे
Beed News नेकनूर मध्ये भागवत कथेत कृष्ण जन्मोत्सव सोहळा हजारो महिलांनी एकाच वेळी धरला फेरा
Beed News: बीडच्या नेकनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भागववत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..यावेळी हजारो महिलांनी एकाच वेळी या कृष्ण जन्मोत्सवामध्ये फेरा धारल्याच पाहायला मिळालं.
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन खून केल्याबद्दल पाच वर्षानंतर आरोपीला फाशी
अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून केल्या प्रकरणी आरोपीला आज खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेड तालुक्यातील सुकिवली गावातील चव्हाणवाडी येथे 19 जुलै 2018 रोजी श्रुती सतीश चव्हाण या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करून शौचालयाच्या टाकीमध्ये तिचा मृतदेह लपवण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सूर्यकांत नवनाथ चव्हाण या आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला होता. हा आरोपी देखील सुकिवली गावातील होता व मुलीच्या नात्यात होता. या प्रकरणाची सुनावणी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. आज या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एल.निकम यांनी आरोपी सूर्यकांत चव्हाण याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी गावकऱ्यांनीही सरकारी वकिलांचा सत्कार करून गौरव केला. या प्रकरणात सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तीवाद व सबळ पुरावे तपासून या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल पाच वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Maharashtra Politics: परळीत अजिय पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणुन झळकले बॅनर
Maharashtra Politics: परळी शहरातील नगर परिषद रोड परिसरात माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरवर खा. शरद पवार, सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. धनंजय मुंडे, परळी नगर परिषदचे माजी गटनेते वाल्मिक आणा कराड यांचे फोटो देखील आहेत. असे बॅनर परळी वैजनाथ नगर परिषदचे माजी नगर सेवक जाबेर खान पठाण यांनी लावले आहेत. बॅनरमुळे शहरात चर्चा होत आहे.