CM Uddhav Thackeray Discharged : 22 दिवस उपचार, रुग्णालयातून राज्याचा कारभार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज
CM Uddhav Thackeray Discharged : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 22 दिवसांनी मुख्यमंत्री आज घरी परतले आहेत.
CM Uddhav Thackeray Discharged : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते. आज 22 दिवसांनी ते घरी परतले आहेत. मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज दिला त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत होते.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) HN रिलायंन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आधी वरिष्ठ आर्थो सर्जन डॉक्टरांच्या सल्ल्यानं विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होत. तब्बल 22 दिवस ते रुग्णालयात होते. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते की, गेली सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आरोग्याविषयी माहिती देताना मुख्यमंत्र्यांना नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना लसींच्या बाबतीत आपण 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.