Ind vs Aus 4th Test : जसप्रीत बुमराह करणार टीम इंडियाचं नेतृत्व? बॉक्सिंग-डे कसोटीआधी नेमकं काय घडलं?
मेलबर्न कसोटीपूर्वी टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू जखमी झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे.

India vs Australia Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या बॉक्सिंग डे टेस्टची प्रत्येक क्रिकेट फॅन आतुरतेने वाट पाहत आहे. मालिका 1-1 अशी बरोबरीत असून या सामन्यात दोन्ही संघ आपली पूर्ण ताकद लावण्यास सज्ज आहेत. दरम्यान, भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. टीम इंडिया मेलबर्नमध्ये जोरदार सराव करत आहे, पण आता हा सराव डोकेदुखी ठरत आहे.
खरंतर, मेलबर्न कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. शनिवारी केएल राहुलच्या हाताला दुखापत झाली, तर आज रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंच्या दुखापतींचे गांभीर्य अद्याप समजू शकलेले नाही, मात्र हे दोघेही पुढील कसोटीतून बाहेर पडले तर त्यांची जागा कोण घेणार? आणि पुन्हा जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. एमसीजी येथे होणारी चौथी कसोटी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
केएल राहुलची जागा घेण्यासाठी भारताकडे एकमेव पर्याय आहे तो म्हणजे अभिमन्यू ईश्वरन. या उजव्या हाताच्या फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलग धावा करून वरिष्ठ संघात आपले स्थान निर्माण केले आहे, तरीही त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळाली नाही. ईश्वरनने आतापर्यंत खेळलेल्या 101 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 48.87 च्या सरासरीने 7674 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर 27 शतके आणि 29 अर्धशतके आहेत.
जसप्रीत बुमराह करणार टीम इंडियाचं नेतृत्व?
कर्णधार रोहित शर्माच्या बदलीबद्दल बोलायचे तर, त्याच्या जागी खेळाडू म्हणून अनेक पर्याय आहेत. संघ व्यवस्थापनाला फक्त फलंदाजी मजबूत करायची असेल तर ते ध्रुव जुरेलला संधी देऊ शकतात. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. फलंदाजीसोबतच तो गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो.
रोहित शर्मा बाहेर झाल्यास जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल. या मालिकेच्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मा उपलब्ध नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान सांभाळली. पहिली कसोटी पर्थमध्ये खेळली गेली, जिथे भारतीय संघ बुमराहच्या नेतृत्वाखाली जिंकला. यानंतर, भारताने पुढील दोन कसोटी सामने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळले, ज्यात एक पराभवाचा सामना करावा लागला आणि दुसरा अनिर्णित राहिला.
हे ही वाचा -





















