एक्स्प्लोर
Pulwama terror attack : ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे!
कितीही आघात झाले, अतिरेकी हल्ले झाले, हल्लेखोर शेजारच्या देशात उघड फिरत राहिले तरी भारत शांत राहिला, पण आता ही ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे.

मुंबई : उरी हल्ल्यानंतरच्या भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचे लॉन्चपॅड्स उद्ध्वस्त केलं. भारतीय सैन्य काय करु शकतं, याची छोटीशी चुणूक पाकिस्तानला आणि त्यांनी पोसलेल्या अतिरेकी संघटनांनी त्यावेळी अनुभवली. पण पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता तीच वेळ पुन्हा आली आहे. अतिरेक्यांना...त्यांच्या हॅडलर्सना घरात घुसून मारण्याची वेळ पुन्हा आली आहे. 'ये इंडियावाले कुछ नही करेंगे,' हा बेबी सिनेमातील डायलॉग. पण ही ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे. सहिष्णु, सहनशील, संयमी देश अशी आपल्या भारताची जगभरात ओळख आहे. पण या सहनशीलतेलाच भित्रेपणा समजलं जात असेल तर.. ही ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे. कितीही आघात झाले, अतिरेकी हल्ले झाले, हल्लेखोर शेजारच्या देशात उघड फिरत राहिले तरी भारत शांत राहिला, पण आता ही ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे. जगाच्या इतिहासात स्वत:हून दुसऱ्या देशावर आक्रमण न करणारा कदाचित एकमेव देश म्हणजे आपला भारत. कोणी धर्मप्रसारासाठी, कोणी पैशासाठी, कोणी कसला बदला घेण्यासाठी आक्रमण करतं. सात समुद्र ओलांडून दुसऱ्या देशांत घुसून युद्ध करणारे अनेक देश जगात आहेत. कधी कट्टर जिहादी अतिरेकाच्या नावाखाली तर कधी नक्षलवादाच्या नावाखाली, आपल्याच भूमीत रक्तबंबाळ होत राहिलेला कदाचित एकमेव देश म्हणजे आपला भारत. गेल्या तीन दशकात जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात किमान 14 हजार नागरिक आणि अंदाजे साडेपाच हजार जवान गमावले आहेत, तर जवळपास 26 हजारांवर अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आहे. देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांवर छुपे हल्ले करणाऱ्यांना, त्यांच्याच घरात घुसून मारण्याची वेळ आता आली आहे. आपल्या निष्पाप नागरिकांचे भ्याड हल्ल्यात बळी घेणाऱ्यांना, त्यांच्याच घरात घुसून मारण्याची वेळ आता आली आहे. या अतिरेक्यांच्या हाती बंदूक देणाऱ्यांना, त्यांच्याच घरात घुसून मारण्याची वेळ आता आली आहे. युवा पिढीच्या डोक्यात भारत द्वेष घुसवणाऱ्या त्यांच्या मास्टरमाईंडना, त्यांच्याच घरात घुसून मारण्याची वेळ आता आली आहे. ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे. पाहा व्हिडीओ
Before You Go
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!






















