रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
भंडाऱ्यातील अपघाताच्या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी अपघातग्रस्त कारची तोडफोड करत महामार्गावर मृतदेह ठेवत चक्काजाम आंदोलन केलं.

गोंदिया : होळीच्या सणाला गालबोट लागणाऱ्या दोन घटना घडल्या असून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील या दोन विविध घटनांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. तुमसर-भंडारा मार्गावरील खापा खरबी फाट्याजवळ एका भरधाव कारनं दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत (Accident) 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य दोन गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, गोंदिया जिल्ह्याच्या (Gondia) सडक अर्जुनी तालुक्यात अंघोळीसाठी तलावात गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
भंडाऱ्यातील अपघाताच्या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी अपघातग्रस्त कारची तोडफोड करत महामार्गावर मृतदेह ठेवत चक्काजाम आंदोलन केलं. तुमसरकडून भंडाऱ्याच्या दिशेनं आज दुपारी एक चारचाकी वाहन अतिवेगानं जात असताना, खापा खरबी गावाजवळ या कारनं एका दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार गोलू कांबळे (32) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील इतर दोन प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताचं परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र, घटनेची माहिती देऊनही पोलीस प्रशासनाला पोहोचायला उशीर झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
ग्रामस्थांकडून चक्का जाम
संतप्त जमावानं अपघातग्रस्त कारवर दगडफेक करत तिची तोडफोड केली, मृतदेह रस्त्यावर ठेवून तब्बल 4 तास वाहतूक रोखून धरली होती. अखेर पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांची समजूत काढली. मृताच्या कुटुंबीयांना योग्य मदतीचं आश्वासन दिल्यानंतर आणि प्रशासनानं तोडगा काढल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं. तब्बल 4 तासांनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथे तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सागर गहाणे (16), प्रणय गहाणे (13) अशी दोन्ही मृतकांची नावं आहेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र रंगपंचमी साजरी केली जाते. सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथील काही मुलांनी रंगपंचमी साजरी केल्यानंतर तलावात आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, दोन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच डुग्गीपार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत.
























