Ratnagiri News : दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
Ratnagiri News : रत्नागिरी शहरातील चौघांचा आरेवारे येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

रत्नागिरी : रत्नागिरीतील आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आरे वारे समुद्रात बुडालेले चारही पर्यटक रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बुडालेल्या चार पर्यटकांपैकी तीन पर्यटक महिला तर एक पुरुष आहे.
रत्नागिरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने समुद्रकिनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शनिवार आणि रविवार या दिवशी आरे वारे समुद्र किनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे.
शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओसवाल नगर येथून आरे वारे समुद्र येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक बुडाल्याची घटना घडली. या चार जणांमध्ये जुनेद बशीर काझी (30 ओसवाल नगर), जैनब जुनेद काझी (28 ओसवाल नगर) उजमा समशुद्दीन शेख (17 मुंबई मुंब्रा) उमेरा शमशुद्धीन शेख (16 मुंब्रा) बुडालेल्या चार पर्यटकांपैकी दोन पर्यटक हे नुकतेच मुंबई येथून आले होते. समुद्रात उरलेल्या नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जण पाण्यात बुडाले. अवघ्या काही मिनिटांत चारही जण खोल समुद्रात बुडाल्याने चारही जणांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती स्थानिक पोलिस पाटील आदेश कदम यांनी ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना माहिती दिली. मोठ्या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्री बघते यांनी घटनास्थळाला भेट दिली. चारही पर्यटकांना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, पुढील 3 तासांत रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे.
नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज
समुद्र किनारे, गड किल्ले या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. पर्यटनस्थळी गेल्यानंतर सतर्कता न बाळगल्यानं दुर्घटना घडतात. त्यामध्ये अनेकांचे जीव जातात. जीवितहानी टाळण्यासाठी पर्यटकांनी पर्यटनस्थळी गेल्यानंतर सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.























