विरोधी पक्षानं विदर्भावर प्रस्ताव आणलाच नाही, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवरही टीका, हिवाळी अधिवेशनानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतील.
नागपूर : हिवाळी अधिवेशनाची (Assembly Winter Session 2023) सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांवर जोरदार निशाणा साधण्यात आला. तसेच विदर्भाच्या मुद्द्यावर विरोधकांनी प्रस्ताव आणला नाही, असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या अधिवेशनात मला उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) दर्शन घडलं हे ही या अधिवेशनांचे फलित आहेत, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
यंदा 7 डिसेंबर रोजी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज हे 101 तास म्हणजेच 15 दिवस चालले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली. नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होते. या अधिवेशनात एकूण 12 विधेयके मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच यावेळी दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर देखील चर्चा झाली.
देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं?
या अधिवेशनात मला उद्धव ठाकरेंचे दर्शन घडलं हे ही या अधिवेशनांचे फलित आहेत. विरोधी पक्षानं विदर्भाच्या संदर्भात एकही प्रस्ताव आणला नाही. हे पहिल्यांदाच घडलंय, त्यामुळे आश्चर्य वाटतय. आम्ही विदर्भासाठी चांगली मदत जाहीर केली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, मी मागील 33 वर्ष अधिवेशन पाहत आलोय, पण एकही मिनिट वाया गेला नाही. यंदा जे झालं ते ऐतिहासिक होतं. आमची आणि कामकाज समितीची बैठक झाली. आम्ही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा विचार करत होतो. आम्ही विरोधी पक्षांना विचारलं पण कालच त्यांनी अंतिम प्रस्ताव देण्यास संमती देखील दिली. त्यामुळे अंतिम प्रस्ताव आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपवावं लागतं. ही विरोधकांची मानसिकता नव्हती की अधिवेशन वाढवावं. राज्यात जे काही प्रश्न होते, त्यावर योग्य पद्धतीने दोन्ही सभागृहांमध्ये राज्य सरकारकडून उत्तर देण्यात आलं.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
या अधिवेशनामध्ये अनेक मोर्चे आले, आम्ही त्या सगळ्यांच्या समित्यांशी देखील संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर देखील आम्ही चर्चा केली. पण विरोधकांचा कुठलाही सहभाग पाहायला मिळाला नाही. आज आम्ही शेतकऱ्यांना मदत होईल अशाच पद्धतीने काम केलं आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकाणारचं आरक्षण देणार आहोत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. आम्ही जरांगे पाटलांना देखील विनंती करतोय की, सरकारवर विश्वास ठेवून थोडं धीराने घ्यायला हवं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.