एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत शेवटचं अल्टिमेटम! 'कामावर आले तर निलंबन मागे' : अनिल परब
ST Workers Protest Anil Parab LIVE : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे.

ST Workers Protest Anil Parab LIVE : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत जे ST कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर घेतलं जाईल, त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. जे कर्मचारी कामावर आले आहेत, त्यांना वेतनवाढ दिली आहे. जे कामावर येतील त्यांना वेतनवाढ दिली जाईल, असंही परब म्हणाले.
परब म्हणाले की, सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामाला येतील त्यांना कामावर घेतलं जाईल. त्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाईल. निलंबित कामगार यांनी ही कामावर यावं. त्यांना ही संधी दिली जाईल. जर कुणाला अडवण्यात आलं तर त्यांना पोलीस संरक्षण दिलं जाईल, असंही ते म्हणाले.सोमवारपर्यंत आम्ही मेस्मा लावणार नाही. 2018 च्या नियमानुसार एसटी ही अत्यावश्यक सेवेत येत आहे. त्यामुळे मेस्माची कारवाई केली आणि करता येते, असंही ते म्हणाले. परब म्हणाले तरीही माणुसकीच्या दृष्टीनं विचार करुन कामगारांना संधी दिली जाईल. आतापर्यंत एसटीचं 550 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, असंही परब यांनी सांगितलं.
परब यांनी सांगितलं की, एक महीना जे कामागार कामावर नव्हते त्यांना पगाराला मुकावं लागणार आहे. त्याला नेते जबाबदार आहेत मात्र त्याची नुकसान नेते देणारं नाहीत, असंही ते म्हणाले. परब म्हणाले की, महाराष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांशी मी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की कामगार यायला तयार आहेत. जवळपास 10 हजार कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे काही कर्मचारी गटागटाने आम्हाला भेटत आहेत. काहींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याचा संबंध संपाशी जोडला जात आहे.
त्यांनी म्हटलं की, विलिनीकरण मुद्दा समितीच्या समोर आहे. 12 आठवड्यानंतर हा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे लगेच निर्णय घेता येणार नाही. म्हणून 41 टक्के पगारवाढ दिली. काही राज्याच्या तुलनेत तर काही राज्यांपेक्षा जास्त पगार वाढ देण्यात आली आहे. संप मागे घ्या त्यानंतर अन्य मुद्द्यांवर चर्चा करु असंही सांगण्यात आलं आहे, असं परब म्हणाले. सदाभाऊ खोत आणि पडळकर यांना आमची भूमिका मान्य होती पण ते कर्मचारी यांना समजवण्यात कमी पडले, असं परब म्हणाले.























