Sanjay Raut: केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील, पण महाराष्ट्र गां**ची औलाद नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut: मन साफ आहे तर कुणाच्या बापाला घाबरु नका असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता असं खासदार संजय राऊत म्हणाले.

मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्र हा गां*ची औलाद नाही, महाराष्ट्र बेईमान नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली."
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय तणाव वाढत आहे. त्याचवेळी संजय राऊत हे शिवसेनेत एकटे पडतायत का असाही सवाल विचारला जात होता. त्यावर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला शिवसेनेचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
काय म्हणाले होते संजय राऊत?
आम्ही खूप सहन केलं, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय, आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं होतं. राऊतांच्या आजच्या पत्रकार परिषदेला पक्षाचे पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी सोमवारी म्हटलं होतं.
सोमवारी बोलताना संजय राऊतांनी म्हटलं होतं की, "भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही."
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. ईडीकडे काही नेत्यांची भाजप नेत्यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असून त्यांच्याविरोधात इतरही आरोप आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून सरकार पाडण्यासाठी सहकार्य करण्यासाठी ईडीकडून धमकी दिली जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Before You Go
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग






















