विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला
मुळशी तालुक्यात सरकारमान्य 'गिरीवन' नावाचा प्रकल्प असल्याचे भासवून त्या आधारे तक्रारदारासह 14 जणांची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही तक्रार आहे.

पुणे : जमीन प्रकरणात गुन्हा दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील जमिनींच्या प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते विक्रम यांच्यासह सुजाता फार्म लि या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी या तिघांवर मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे विक्रम गोखले यांच्या समोरील अडचणीत आता वाढ झाली आहे
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांच्या न्यायालयात या जामिन अर्जाची सुनावणी झाली. न्यायालयाने यापूर्वी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र अंतिम निकाल देताना गोखले यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. याप्रकरणी जयंत प्रभाकर बहिरट (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात 14 गुंतवणूकदारांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता.
आरोपींनी मुळशी तालुक्यात सरकारमान्य 'गिरीवन' नावाचा प्रकल्प असल्याचे भासवून त्या आधारे तक्रारदारासह 14 जणांची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही तक्रार आहे. गोखले यांनी अॅड. ॠषीकेश गानू आणि ऍड. उपेंद्र खरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मार्चमध्ये यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.
दरम्यान अॅडव्होकेट सप्रे यांनी विक्रम गोखले हे संबंधित कंपनीचे अध्यक्ष असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच गुन्ह्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली रक्कम मोठी आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद अॅड. सप्रे यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाने गोखले यांचा अर्ज फेटाळून लावला.
दरम्यान सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अर्ज करण्यास मुदत मिळावी, अशी विनंती गोखले यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने या निकालास 17 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
Before You Go
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या





















