![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maratha Reservation Protest LIVE : परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार, समन्वयकांसोबतच्या बैठकीत संभाजीराजेंची माहिती
Maratha Reservation Silent Protest : आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात होणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांची नेतृत्त्वात आज हे आंदोलन पार पडणार आहे. या आंदोलनात प्रकाश आंबेडकर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलही सहभागी होणार आहेत.
LIVE
![Maratha Reservation Protest LIVE : परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार, समन्वयकांसोबतच्या बैठकीत संभाजीराजेंची माहिती Maratha Reservation Protest LIVE : परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार, समन्वयकांसोबतच्या बैठकीत संभाजीराजेंची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/16/056824f59d5f511a8816bf4f115ae208_original.jpg)
Background
कोल्हापूर : आजपासून म्हणजेच, 16 जूनपासून मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात मूक आंदोलन केलं जाणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले होते. आज सकाळी 11 वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळी या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनाची सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असून आज कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी मौन बाळगून तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करुन हे आंदोलन करायचं आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसंर्ग वाढेल असं कोणतंही कृत्य करायचं नाही अशा सूचनाही आंदोलकांना देण्यात आलेल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंनी दिलेल्या हाकेला प्रकाश आंबेडकर यांनी साद दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर कोल्हापुरातील मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरुन या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील अनेक नेतेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलही या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना उलटसुलट न बोलण्याचं आवाहन संभाजीराजेंनी काल मराठा आंदोलकांना केलं आहे.
कोल्हापुरातील मूक आंदोलन सहभागी होणाऱ्यांनी कुणालाही उलटसुलट बोलू नये, संभाजीराजेंचं आवाहन
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल (मंगळवारी) खासदार संभाजीराजे छत्रपती आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी उद्याच्या मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींचा आढावाही घेतला. खासदार संभाजीराजे छत्रपती बोलताना म्हणाले होते की, "आपलं आंदोलन हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटतं हा मोर्चा आहे. पण मूक आंदोलनाचा अर्थच आहे. आपल्याला मूक मोर्चा काढायचा असता तर, आपण काढू शकलो असतो. पण मोर्चा काढण्याची ही परिस्थिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा लोकांना आपण वेठीस धरायचंय का? ज्या समाजाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांनी आपल्या 58 मोर्चांच्या माध्यमातून केल्या आहेत. समाज बोलला आहे, आणखी त्यानं रस्त्यावर का उतरायचं? आतापर्यंत समाजानं आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीही बोललं पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. आंदोलनासाठी सर्वच आमदार, खासदारांना आपण निमंत्रित केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते सर्वजण येतील"
"आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपणही सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण ते आपल्यासाठी इथे येणार आहेत. आपल्यापैकी कोणीही त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारायचे नाहीत. कोणीही बोलायचं नाही. माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचं आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलू द्यायचं, त्यांचं मन मोकळं करु द्या. हवं तेवढा वेळ बोलू द्यात. पण त्यांनी येणं महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे ते सर्वजण येतील.", असंही खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते.
मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे-उदयनराजे यांची चर्चा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची पुण्यात भेट झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी भेटीनंतर दिली. तर मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं उदयनराजे म्हणाले. पुण्यातील व्यावसायिक संदीप पटेल यांच्या घरात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसमोर मराठा आरक्षणाबाबत आपापली भूमिका मांडली.
संभाजीराजे म्हणाले की, "आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत आहे. कोल्हापूर आणि साताऱ्याचं घराणं एकत्र आलं याचा मला आनंद आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. राज्य सरकारने सहा मागण्या मान्य कराव्यात. अधिवेशनातून अनेक विषय मार्गी लागू शकतात."
"आम्ही दोघे एकाच घराण्यातील आहोत. संभाजीराजे यांच्या विचारांशी मी सहमत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मराठा आरक्षणावर राजकारण सुरु आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण द्या. समाजाचा उद्रेक होईल अशी वेळ येऊ देऊ नका," अशी संतापजनक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. तसंच मराठा आरक्षणासाठी विशेष आंदोलन बोलवण्याची मागणी त्यांनी केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सिंधुदुर्ग : तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा बाजारपेठेत पाणी
तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा बाजारपेठेत पाणी. होडावडे पुलावरून पाणी वाहत असल्याने वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावरील वाहतूक बंद. जिल्ह्यातील प्रमुख नद्याना पुरसदृश्य स्थिती. जिल्ह्यात आतापर्यंत ६३० मी. मी. पाऊस
परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार, समन्वयकांसोबतच्या बैठकीत संभाजीराजेंची माहिती
मूक मोर्चातील सत्ताधाऱ्यांच्या भाषणावर मराठा क्रांती मोर्चा नाराज, मागण्या मान्य केल्याचं पत्र मिळण्याऐवजी केवळ भाषणबाजी झाल्याचं मत
आजच्या मूक मोर्चातील सत्ताधाऱ्यांच्या भाषणाबाबत मराठा क्रांती मोर्चा नाराज असल्याचं समजतं. मागण्या मान्य केल्याबाबतचं पत्र मिळण्याऐवजी केवळ भाषणबाजी ऐकायला मिळाली, असं मराठा क्रांती मोर्चाचं म्हणणं आहे. तसंच पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढण्यावर मराठा क्रांती मोर्चा ठाम आहे.
हा आवाज मुंबईपर्यंत पोहचलाय, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती बोलताना म्हणाले की, "मराठा आरक्षणाचा मुद्दा एकमतानं हाताळण्यापेक्षा दुफळी करण्याकडे अनेकांचा प्रयत्न होता. हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला आहे, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीमध्ये राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिलं पाहिजे, केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावं."
वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
"मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन वेळा आंदोलन केलं. पण आरक्षण कोर्टात टिकलं नाही. नारायण राणे यांची समिती नेमून आरक्षण देणं ही आमची चूक होती. ", असं हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले. कायदा व्यवस्थित असता तर तो टिकला असता ना, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भापवर निशाणाही साधला. तसेच सारथी, नियुक्ती पत्र असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज देणं असेल हे सगळे प्रश्न आम्ही पूर्ण करणार, वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू, अशी ग्वाहीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)