"एकनाथदाजी बहिणीचे पैसे दिले आता आमच्याकडे पाहा", दुष्काळ निधीसाठी युवा शेतकऱ्याचे आमरण उपोषण
लाडक्या बहिणीला जसे 3000 हजार रुपये दिले तसे एकनाथदाजी, अजितदाजी, देवेंद्रदाजी दुष्काळ निधी तात्काळ जमा करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे,

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojna) दोन हप्ते महिलांच्या खात्यावर येण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळ निधीच्या पैशांची मागणी केली आहे. लाडक्या बहिणीचे पैसे एकनाथदाजींनी दिले पण उन्हाळा संपून पावसाळा संपत आला तरी आम्हा शेतकऱ्यांचे दुष्काळ निधीचे पैसे अजून मिळालेले नाहीत . किमान आता तरी दाजी आमचे पैसे द्या अशी मागणी करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी आज स्वातंत्र्यदिनापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी न मिळाल्याने युवा सेनेच्यावतीने युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांचं माळशिरस तहसील कार्यालयावर अमरण उपोषण चालू केले आहे . या उपोषण स्थळी माढा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही भेट दिली .
माळशिरस तालुका हा दुष्काळ जाहीर होऊन सहा महिने होऊन गेले उन्हाळा संपला पावसाळाही संपत चालला तरीही तालुक्यातील 30% लोकांचा दुष्काळ निधी जमा झाला नाही. सरकार आश्वासनाची खैरात करत आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नादात दुष्काळ निधी कुठे गेला हे शेतकरी विचारत आहेत . लाडक्या बहिणीला जसे 3000 हजार रुपये दिले तसे एकनाथदाजी, अजितदाजी, देवेंद्रदाजी दुष्काळ निधी तात्काळ जमा करा .आश्वासनांची खैरात करा पण आधी दुष्काळ निधी जमा करा अशी घोषणा बाजी युवासेनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी अतिशय मार्मिक अशी व्यंगचित्रांनी बॅनरबाजी करण्यात आली आहे .
आमचे पैसे तात्काळ आमच्या खात्यावर जमा करावे
नुसत्या योजनांच्या महापूरात माळशिरस तालुक्याचा दुष्काळ निधी वाहून गेला, आधी दुष्काळ निधी द्या... मग आश्वासनांची खैरात करा..., दाजी आधी दुष्काळ निधी द्या नंतर बहिणीला 1500 रुपये द्या..., लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नादात दाजीचा दुष्काळ निधी गायब अशी पोस्टरबाजी यावेळी करण्यात आली आहे. दुष्काळ निधी जाहीर करून सहा महिने झाले. उन्हाळा संपला पावसाळा संपत आला आहे. अद्याप दुष्काळनिधी आम्हाला मिळालेला नाही. आमचे केवायसी सर्व पूर्ण असून देखील आम्हाला दुष्काळनिधी 30 ते 35 टक्के शेतकऱ्यांना दुष्काळनिधी मिळालेला नाही. सरकारने लाडक्या बहिणीच्या नादात आमचा दुष्काळनिधी कुठे गायब केला हेच कळत नाही. आम्ही तिन्ही दाजींना विनंती करतो आमचे पैसे तात्काळ आमच्या खात्यावर जमा करावेत.
हे ही वाचा :
संजय राऊतांमुळे त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला, बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळतात, रेखा ठाकूर यांची टीका
Before You Go
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
महत्त्वाच्या बातम्या






















