एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा गंभीर आरोप
एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आपण मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याने आपल्याला राजकारणातून बाजूला करण्यात आल्याचे षडयंत्र रचण्यात आलं.

जळगाव : दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी माझा संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळेला काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांनी देवेंद्र फडणीस यांची भेट घालून दिली होती. त्या बदल्यात त्याच्या विरोधात असलेले खटले मागे घेण्यात आले. त्यांना एमएलसी देण्यात आल्याचा गंभीर तितकाच खळबळजनक आरोप भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आपण मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याने आपल्याला राजकारणातून बाजूला करण्यात आल्याचे षडयंत्र रचण्यात आलं. याशिवाय दाऊदच्या पत्नीशी आपले संबंध असल्याचे आपल्यावर आरोप करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळे याचीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी रात्री दीड वाजता भेट का घेतली असे प्रश्न उपस्थित केले होते. या विषयावर अधिक माहिती देताना खडसे यांनी आज पुन्हा एकदा आरोप करताना म्हटलं की, मनीष भंगाळे याची देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून देण्यात काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांचा हात आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या मनीष भंगाळेची फडणीस यांच्याशी भेट घालून देण्याच्या बदल्यात कृपाशंकर सिंग यांच्यावर असलेले विविध गुन्ह्यात खटला चालवण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक होती, मात्र ही परवानगी सरकारने दिली नसल्याने ते या सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष सुटले.
एवढंच नव्हे तर कृपाशंकर सिंग यांना एमएलसी देण्यात आल्याचा गंभीर तितकाच खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. मनीष भंगाळेला रात्री दीड वाजता भेटण्यासाठी यांच्या जवळ वेळ होता. मात्र मी मंत्री असून देखील मला वेळ दिला जात नव्हता. याशिवाय हॅकर असलेल्या मनीष भंगाळेवर आजपर्यंत कोणती कारवाई का झाली नाही? त्याच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? या मागच कारण काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे, असंही खडसे यांनी म्हटलं.
खडसे यांच्या आरोपानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन केले होते. त्यावर बोलताना खडसे यांनी म्हटलं की, गेली चाळीस वर्षे भाजप पक्ष वाढीमागे माझं योगदान त्यांना माहित आहे. याशिवाय माझ्यावर केले गेलेले खोटे आरोप कुणी आणि का केले याचीही खरी परिस्थिती अब्दुल सत्तार यांना माहित आहे. म्हणून त्यांनी आवाहन केलं असलं तरी त्यांना मी प्रतिसाद देऊ शकत नाही. गेली इतकी वर्ष भाजपमध्ये काम केले आहे. आज तरी पक्ष सोडण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर बोलताना खडसे यांनी म्हटलं की, दानवे हे आमचे नेते आहेत. दानवे आणि आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. भाजपा पक्षातील परिस्थिती त्यांना माहित आहे. मात्र ते उघडपणे बोलू शकत नाहीत. म्हणून ते एकत्र बसून मार्ग काढण्याचं बोलत आहेत. माझीही त्याला हरकत नाही, कारण मी कोणालाही ब्लॅक मेल केले नाही. वस्तूस्थितीवर विचार व्हायला हवा एवढीच अपेक्षा आहे. मुलीला तिकीट न मागता का दिलं, मला का दिलं नाही. माझ्यावर आरोप होताच राजीनामा का घेतला. इतरांना मात्र क्लीनचिट देण्यात आली. पक्षात जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तो पर्यंत आपण पक्षाला हे प्रश्न विचारत राहणार असल्याचे खडसे यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
