एक्स्प्लोर
Advertisement
एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरे हजर राहणार
मुंबई : राजधानी दिल्लीत आज एनडीएच्या 32 घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
दिल्लीतील प्रवासी भारतीय भवन इथे संध्याकाळी साडे सहा वाजता ही बैठक होणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या मोठ्या विजयानिमित्त ही बैठक आयोजित केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर खलबतं होणार आहे.
त्यामुळे ‘मातोश्री’ची परंपरा खंडित होणार आहे. कारण राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास पाहिला तर शिवसेनेचं समर्थन मागण्यासाठी आतापर्यंत सर्व पक्ष ‘मातोश्री’वर यायचे, पण शिवसेना पहिल्यांदाच राष्ट्रपती निवडणुकीबाबत दिल्लीत चर्चा करणार आहे.
तीन वर्षांनी उद्धव मोदी-शाहांना भेटणार
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर म्हणजे जवळपास मे 2014 नंतर तीन वर्षांनी उद्धव ठाकरे मोदी आणि शाह यांना दिल्लीत भेटणार आहेत. याआधी दोनवेळा उद्धव ठाकरे दिल्लीत गेले, मात्र तेव्हा ते राजनाथ सिंह, जेटली यांनाच भेटले होते.
NDA च्या बैठकीत कोणाला निमंत्रण
1. काश्मीरमधून पीडीपी आणि सज्जाद लोन पीपल्स पार्टी
2. पंजाबमधून अकाली दल
3. महाराष्ट्रातून शिवसेना, भारतीय समाज पक्ष, शेतकारी संघटना आणि रिपाइंचे रामदास आठवले
4. गोव्यातून गोवा फॉरवर्ड ब्लॉक, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी
5. आंध्र प्रदेशातून तेलुगुदेशम पार्टी, तामिळनाडुमधून IJK, IMMK आणि IMKAMK बैठकीत सहभागी होती.
6. केरळमधून केरळ जनाधिपत्य पार्टी, केरळ काँग्रेस (थॉमस) आणि भारतीय धर्मजनसेना
7. उत्तर प्रदेशातून अपना दल, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी
8. बिहारमधून जीतनराम मांझी यांची हम, राष्ट्रीय लोक समता पार्टी, लोकजनशक्ती पार्टीला आमंत्रण देण्यात आलं आहे.
9. झारखंडमधून ऑल झारखंड स्टूडंट युनियन
10. पश्चिम बंगालमधून गोरखा जनमुक्ती मोर्चा
11. आसाममधून आसम गण परिषद आणि गण शक्ती पार्टी या बैठकीत सामील होतील.
11. सिक्किम, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि नागालॅण्डसह 17 राज्यांमधून भाजप 32 पक्ष सहभागी होती.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा इतिहास
2002 साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार टी. एन. शेषन यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तर एनडीएचे उमेदवार एपीजे अब्दुल कलाम होते. शेषन यांना पाठिंबा देण्यामागे बाळासाहेबांची भूमिका होती की आचारसंहिता हा फक्त कागदावरचा नियम प्रत्यक्षात अंमलात आणणारा निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन होता. त्यामुळे देशाला शिस्त लावणाऱ्या व्यक्तीला शिवसेना पाठिंबा देईल. त्यावेळेस टी. एन. शेषन यांना फक्त शिवसेनेची मतं पडली होती.
2007 साली UPA चे उमेदवार प्रतिभा पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यावेळेस महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होणार होतं म्हणून देशाच्या सर्वोच्चपदी मराठी भाषिक आणि त्याहून महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून एक महिला निवडून येणं हा महाराष्ट्राचा बहुमान असल्याचं मत बाळासाहेबांनी व्यक्त केलं होतं. एनडीएचे उमेदवार भैरोसिंह शेखावत यांनी स्वतः फोन करुन बाळासाहेबांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. लालकृष्ण अडवाणींपासून ते मुरली मनोहर जोशी अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून बाळासाहेबांचं मन वळवण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र बाळासाहेब आपल्या भमिकेवर ठाम राहिले.
2012 साली शिवसेनेने पुन्हा UPA चे उमेदवार प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता. शरद पवार आणि प्रणव मुखर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांकडे पाठिंबा मागितला होता. शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन पी. ए. संगमा राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पी. ए. संगमा यांना एनडीएने पाठिंबा दिला होता. मात्र प्रणव बाबू असं संबोधणाऱ्या प्रणव मुखर्जी यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंध आणि राजकारणताला प्रदीर्घ अनुभव या निकाशांवर बाळासाहेबांनी प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता.
सद्य राजकीय परिस्थिती
सलग तीनदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीए विरोधी भूमिका घेतली होती. यंदाच्या राष्ट्रपती निवडणुकीतही शिवसेना महत्वाची भूमिका बजावणार आहे. उद्या दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीचा मुद्दा केंद्रबिंदू असणार आहे. मात्र गेल्या चार वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. उद्या पहिल्यांदाच शिवसेनेचं पक्ष नेतृत्त्व या बैठकीला हजेरी लावणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पूर्वी युतीचा काडीमोड झाला आणि शिवसेना भाजपने एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक केली. इतकंच काय तर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीवर बोट ठेवलं आणि वांद्र्याचे माफिया म्हणून हिणवलं. पण राज्यतील निवडणुकांपाठोपाठ यूपीचा निकाल लागला आणि चित्र पालटलं.
एनडीएच्या बैठकीला स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपास्थित राहणार असले तरी राष्ट्रपती निवडणुकीला एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र सद्यस्थिती पाहता उद्धव ठाकरे ती किती प्रतिष्ठेची करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या
'मातोश्री'ची परंपरा खंडीत, उद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीला दिल्लीला जाणार
तीन वर्षांनंतर मोदी-शाह आणि उद्धव ठाकरे आमने-सामने येणार
अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement