एक्स्प्लोर
अखेरच्या भाषणात देशवासियांना राष्ट्रपतींची भावनिक साद
देशाचे मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशवासियांना उद्देशून अखेरचं भाषण केलं. या भाषणात प्रणव मुखर्जी यांनी देशातील नागरिकांना भावनिक साद घातली. जबाबदार समाजाच्या निर्माणासाठी आपल्याला अहिंसेच्या ताकदीला पुन्हा जागृत करावं लागेल, असं आवाहन प्रणव मुखर्जींनी केलं.

नवी दिल्ली : देशाचे मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशवासियांना उद्देशून अखेरचं भाषण केलं. या भाषणात प्रणव मुखर्जी यांनी देशातील नागरिकांना भावनिक साद घातली. जबाबदार समाजाच्या निर्माणासाठी आपल्याला अहिंसेच्या ताकदीला पुन्हा जागृत करावं लागेल, असं आवाहन प्रणव मुखर्जींनी केलं. “सहहृदयता आणि सहानुभूती आपल्या सभ्यतेच्या खरेपणाचा पाया आहेत. मात्र, दिवसागणिक आपल्या आजूबाजूला हिंसेत वाढ होताना दिसते आहे. या हिंसेच्या मुळात अज्ञान, भय आणि अविश्वास आहे. त्यामुळे आपला संवाद हा शारीरिक आणि मौखिक हिंसेपासून दूर असला पाहिजे. एक अहिंसक समाजच लोकशाहीच्या प्रक्रियेत समाजातील सर्व वर्गांना, विशेषत: मागासवर्गीय आणि वंचितांनाचा सहभाग वाढवेल. आपल्याला एका जबाबदार समाजाच्या निर्मितीसाठी अहिंसेच्या ताकदीला आणखी जागृत करावं लागेल.”, असे मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुढे म्हणाले, “जस जसं व्यक्तीचं वय वाढतं, तस तसं उपदेश देण्याची प्रवृत्ती वाढते. मात्र, माझ्याकडे उपदेशासाठी काहीही नाही. गेल्या पन्नास वर्षातील सार्वजनिक जीवनात माझ्यासाठी भारताचं संविधान सर्वात पवित्र ग्रंथ राहिलं, भारताची संसद माझ्यासाठी मंदिर राहिलं आणि भारतीय जनेतेची सेवा करणं ही माझी नेहमीच इच्छा राहिली.” “मी जितकं देशाला दिलं आहे, त्यापेक्षा अधिक या देशानं मला दिलं आहे. यासाठी मी भारतीय नागरिकांचा सदैव ऋणी राहीन. एका आधुनिक राष्ट्राच्या निर्मितीसाठी समान हक्क, लोकशाही, स्वातंत्र्य, प्रांतांमधील समानता, आर्थिक समानता इत्यादी तत्त्वांची गरज असते. विकासाला सत्यात उतरवण्यासाठी देशातील प्रत्येक गरिबाला आपण देशाचा भाग आहोत, हे वाटायला हवं.”, असेही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















