Mann Ki Baat : ऑस्ट्रेलिया आणि बुंदेलखंडच्या झाशीचं एक वेगळं नातं : पंतप्रधान मोदी
Mann Ki Baat LIVE :स्वातंत्र्यलढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचे योगदान आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. ऑस्ट्रेलिया आणि बुंदेलखंडच्या झाशीचेही एक वेगळे नाते आहे, असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

Mann Ki Baat LIVE : स्वातंत्र्यलढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचे योगदान आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई यांसारख्या विरांगनाही येथे घडल्या आणि मेजर ध्यानचंद यांच्यासारखी क्रीडारत्नेही या प्रदेशाने देशाला दिली आहेत. ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचेही एक वेगळे नाते आहे, असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी सांगितलं की, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा देत होत्या तेव्हा त्यांचे वकील जॉन लँग होते. हं जॉन लँग मूळचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी होते. भारतात राहून त्यांनी राणी लक्ष्मीबाईंचा खटला लढवला होता. इतिहासातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचेही एक वेगळे नाते आहे, असं ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ नावाचे एक शहर आहे. क्रिकेटप्रेमी याच्याशी चांगलेच परिचित आहेत, कारण पर्थमध्ये क्रिकेटचे सामने होत असतात. पर्थमध्ये 'सॅक्रेड इंडिया गॅलरी' या नावाचे एक कलादालनही आहे. स्वान नामक दरीच्या सुंदर परिसरात हे कलादालन तयार करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगत तारिणी दासी यांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. जगत तारिणी खरे तर ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्यांचा जन्मही तिथेच झाला, तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.पण त्यांनी 13 वर्षांपेक्षा जास्त काळ वृंदावनात व्यतीत केला. जगत तारिणीजींचा हा अप्रतिम प्रयत्न, खरोखरच, आपल्याला कृष्णभक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतो. या प्रयत्नाबद्दल मी त्यांना अनेकानेक शुभेच्छा देतो, असं ते म्हणाले.
भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक कलाकृतीही येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. एका कलाकृतीमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आहे आणि त्याच्या खाली वृंदावनातील लोकांनी आश्रय घेतला आहे. तारिणी दासी म्हणतात की त्या ऑस्ट्रेलियात परतल्या, आपल्या देशात परतल्या, पण त्या वृंदावनाला विसरू शकल्या नाहीत. त्याचमुळे वृंदावन आणि तिथल्या आध्यात्मिक भावनेशी जुळल्यासारखे वाटत राहावे, या भावनेतून त्यांनी ऑस्ट्रेलियातच वृंदावन वसवले.
कलेच्याच माध्यमातून त्यांनी अद्भूत असे वृंदावन घडवले. येथे येणाऱ्या लोकांना विविध प्रकारच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळते. त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे - वृंदावन, नवाद्वीप आणि जगन्नाथपुरी येथील परंपरांचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांच्या भाषणातील अन्य महत्वाचे मुद्दे
अमृत महोत्सव हा शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याचीही प्रेरणा देतो आणि आता तर देशभरातील सामान्य जनता असो वा सरकारे असो, पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाचाच गाजावाजा सुरू आहे आणि या उत्सवाशी जोडलेले कार्यक्रमसतत सुरू आहेत. -
डिसेंबर महिन्यात नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबरला देश 1971 च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त मी देशाच्या वीरांचे स्मरण करत वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो.
हिमाचल प्रदेशातील उना येथील लघुलेखक राम कुमार जोशी यांनी सुद्धा एक अद्भुत काम केले आहे.त्यांनी टपाल तिकिटांवरच, म्हणजे इतक्या लहानटपाल तिकिटांवरच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची अनोखी रेखाचित्रे रेखाटली आहेत. -
आदिवासी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेत देशाने आदिवासी गौरव सप्ताहसुद्धा साजरा केला आहे. यासंबंधीच्या कार्यक्रमातून अंदमान-निकोबार बेटांवर,जारवा,ओंगे अशा आदिवासी समुदायांच्या लोकांनी त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
दिल्लीत नुकताच “आजादी की कहानी-बच्चों की जुबानी” या कार्यक्रमात मुलांनी स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित कथा अगदी मनापासून सादर केल्या. विशेष म्हणजे यात भारताबरोबरच नेपाळ, मॉरिशस, टांझानिया, न्यूझीलंड आणि फिजी येथील विद्यार्थीही सहभागी झाले.
मध्य प्रदेशातील कटनी येथील काही सहकाऱ्यांनीसुद्धा एका अविस्मरणीय दास्तानगोई कार्यक्रमाची माहिती दिली आहे. यामध्ये राणी दुर्गावतीच्या दुर्दम्य साहसाच्या आणि त्यागाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. असाच एक कार्यक्रम काशीमध्ये सुद्धा आयोजित करण्यात आला.
हिंदीत लिहिलेल्या 'राम' या शब्दावर त्यांनी रेखाटने केली असून त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या महापुरुषांचे चरित्रही थोडक्यात नोंदवले आहे.
गोस्वामी तुलसीदास, संत कबीर, संत रविदास, भारतेंदू हरिश्चंद्र, मुन्शी प्रेमचंद आणि जयशंकर प्रसाद या महान व्यक्तींच्या स्मरणार्थ तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वांनी देशात जनजागृती घडवून आणण्यात मोठी भूमिका निभावली आहे.
Before You Go
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?






















