फडणवीस साहेब, सोसायटीतील गैरव्यवहाची तक्रार करुन चूक केली का? या संभ्रमात जगतोय, पत्नीला त्रास अन् घरच दावणीला; किशोर कदमांची पोस्ट
Kishor Kadam facebook Post for Devendra Fadnavis about Mumbai Home issue : फडणवीस साहेब, सोसायटीतील गैरव्यवहाची तक्रार करुन चूक केली का? या संभ्रमात जगतोय, पत्नीला त्रास अन् घरच दावणीला; किशोर कदमांची पोस्ट

Kishor Kadam facebook Post for Devendra Fadnavis about Mumbai Home issue : मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते आणि कवी किशोर कदम (सौमित्र Kishor Kadam) यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील घराच्या समस्येबाबत फेसबुकवरुन व्यथा मांडली होती. माझं मुंबईतील राहण्याचं घर धोक्यात असून बिल्डर आणि सोसायटी समितीकडून फसवणूक झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. मात्र, आता सोसायटीतील गैरव्यवहाची तक्रार करुन चूक केली का? या संभ्रमात जगतोय, असं किशोर कदम (Kishor Kadam) म्हणाले आहेत. किशोर कदम (Kishor Kadam) यांनी सोसायटीतील गैरकारभाराची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना शेअर केली आहे. किशोर कदम नेमकं काय काय म्हणाले? जाणून घेऊयात..
किशोर कदम यांची पोस्ट जशीच्या तशी
नमस्कार फडणवीस साहेब.
11 ऑगस्ट रोजी आमच्या सोसायटीच्या
पुनर्विकासाच्या गैरकारभारा विरोधात मी जी पोस्ट केली होती त्याची दखल घेऊन 12 ऑगस्ट रोजी तीच पोस्ट शेअर करुन आपण मला जो दिलासा दिलात त्या बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.आपल्या सारखा संवेदनशील मुख्यमंत्री असल्याने एका कलावंताच्या हाकेला तुम्ही ओ दिलात. आपले खुप खुप आभार.
काही गोष्टी मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.
आमच्या येथे RADIUS & ASSOCIATS आणि बिल्डर PRO DEV हे दोघे STRATAGICAL PARTNERS असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे, आणि ही बाब मॅनेजिंग कमिटीने आमच्यापासून जाणीवपूर्वक पहिल्यापासून लपवून ठेवलेली आहे.
वास्तविक PMC आणि BUILDER हे संपूर्णपणे वेगळे असायला हवेत आणि PMC ने फक्त सोसायटीच्या हितासाठी काम करावे असे अपेक्षित असते. तरी कमिटीने MANIPULATION करून या दोघांना एकाच ठिकाणी नियुक्त केले हे संपूर्ण रेकॉर्ड तपासल्यावर लक्षात येईल.
तसेच मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की RADIUS &ASSOCIATS चे श्री. तेजस शहा यांना काही वर्षांपूर्वी फोर्जरीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्यावर IPC खाली 420/ 468/465 आणि 471 ही कलमे लावण्यात आली आहेत. तसेच त्यांचे ARCHITECT म्हणूनचे लायसन्सही कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.
गमतीची बाब अशी की हेच श्री.तेजस शहा आज STRUCTURAL ENGINEER म्हणून आमच्या सोसायटीमध्ये काम करीत आहेत. ज्या BMCने त्यांच्यावर FIR दाखल केला,तीच BMC त्यांना स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम करण्याचे लायसन्स देते आणि पत्ता बदलून,वेगळी कंपनी काढून तेच तेजस शहा तशाच प्रकारचा गुन्हा आमच्या सोसायटी मध्ये करू पाहतात हा एक विलक्षण योगायोग आहे. हे सगळे आम्हा सामान्यांच्या अवाक्या बाहेरचे आहे.
पुरावे सादर करुन, एवढा जाहीर विरोध करुन अजूनही कमिटी ढिम्म हलत नाही याचा अर्थ मॅनेजिंग कमिटी PMC आणि BUILDER यांच्यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा संशय घ्यायला पुरेपूर जागा आहे.
माझ्यासारख्या कलावंताने सर्वस्व पणाला लावून या प्रकरणाविरोधात आवाज उठवला हे चांगले झाले की वाईट या संभ्रमात गेले काही दिवस मी जगतो आहे. कारण त्याचे वाईट परिणाम गेल्या काही दिवसात आम्हाला अनुभवास येत आहेत.
दिनांक 12.9.2025 रोजी रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी एक अनोळखी महिला सोसायटीमध्ये शिरते.... आमच्याबद्दल चौकशी करते... शेवटी आमच्या दारावर येऊन ठेपते...बेल वाजवते, कडी वाजवते... मग वरल्या मजल्यावर जाते... वर तीन मिनिटे थांबते... आणि पुन्हा आमच्या दाराबाहेर येऊन बेल वाजवते, कडी वाजवते.. मग खालच्या मजल्यावर जाते.. तिथे ती सहा मिनिटे काय करते कळत नाही आणि नऊ वाजून सहा मिनिटांनी गेट बाहेर जाताना दिसते आणि हे सगळे आमच्याच दाराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये रेकॉर्ड होते.हीच महिला या आधीही दोन वेळा सोसायटीच्या आसपास येऊन आमची चौकशी करून गेल्याचे कळते. हे सगळे सोसायटीच्या CCTV कॅमेऱ्यातही record झाले असावे आणि ते फुटेज सोसायटी चौकशीत उपलब्ध करुन देईल अशी आशा करूयात.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या श्री. तेजस शहा यांची मॅनेजजिंग कमिटीने कुठल्याही प्रकारची सखोल चौकशी न करता नियुक्ती केल्याच्या विरोधात आवाज उठवल्याने आता मला आणि माझ्या पत्नीला हा भावनिक मानसिक सामाजिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे. वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे. इथे तर माझे संपूर्ण घरच दावणीला लागले आहे. खरेतर सगळी तेवीस घरे मॅनेजिंग कमिटीने दावणीला लावली आहेत. अशा बेजबाबदार आणि बेबुर्वत कारभार करणाऱ्या मॅनेजिंग कमिटी विरोधात कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून अशा प्रवृत्तीच्या भ्रष्ट कारभार करणाऱ्या कमीट्या ताळ्यावर येतील.
माननीय फडणवीस साहेब..! आपण जो मला दिलासा दिलात त्याबद्दल मी आणि माझी पत्नी आपले खूप खूप आभारी आहोत.
या प्रकरणाशी संबंधित सर्व शासकीय कार्यालयांच्या सहकार्याचे रूपांतर मला न्याय मिळवून देण्यात होईल अशी मी आशा व्यक्त करतो.
धन्यवाद..!
आपलाच.
किशोर कदम सौमित्र.
इतर महत्त्वाच्या बातम्या























