Karnataka Election : जीभ घसरली आणि सत्ता गेली; वाजपेयींप्रमाणे खरगेंनाही वादग्रस्त वक्तव्याचा फटका बसणार?
Karnataka Election : हावेरी येथील सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी साप म्हटले. खरगेंच्या वक्तव्यावर भाजपने टीका करत हा पंतप्रधानांचा अपमान असल्याचे म्हटले.

Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची तारीख संपल्यानंतर आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. यातच हावेरी येथील जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भरसभेत खरगेंनी पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) यांना विषारी साप म्हटले. खरगेंच्या वक्तव्यावर भाजपने तात्काळ टीकेची झोत उठवली, हा पंतप्रधानांचा अपमान असल्याचे भाजपने म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्याचा कितपत फटका काँग्रेसला बसणार हे पंतप्रधानांच्या कृतीवरच अवलंबून असेल. पंतप्रधान मोदी 29 एप्रिलला बेळगावातून निवडणुकीच्या प्रचाराचा शंख फुंकणार आहेत, यावेळी भाजपच्या सभेतून ते काय बोलतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
खरगेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात निवडणुकीची गणिते मांडली जात आहेत. कारण, यापूर्वीही निवडणुकीत हार-जीत ठरवण्यात वादग्रस्त वक्तव्यांचा वाटा मोठा आहे. 1962च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी त्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे पराभूत झाले होते.
भारतीय राजकारणात गेल्या 16 वर्षांत, 4 निवडणुकांमध्ये, पक्षांची हार-जीत ठरवण्यात वादग्रस्त वक्तव्यांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत खरगेंच्या वक्तव्यामुळे कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचे नुकसान होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेत्यांची जीभ घसरल्यामुळे कोणत्या-कोणत्या निवडणुकीत पक्षासाठी ते अडचणीचे ठरले आहे, हे पाहूया...
अटलबिहारी वाजपेयी निवडणुकीत झाले होते पराभूत
वर्ष होते 1962, त्यावेळी देशात तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधून जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. वाजपेयींनी 1957 मध्ये या जागेवरून काँग्रेसच्या हैदर हुसेन यांचा पराभव केला होता.
वाजपेयींचा पराभव करण्यासाठी जवाहरलाल नेहरूंनी सुभद्रा जोशी यांना मैदानात उतरवले. जोशी बलरामपूरमध्ये सक्रिय झाल्या आणि प्रत्येक गल्लीबोळात प्रचाराला सुरुवात केली, बाराही महिने लोकांची सेवा करेल असे त्या प्रचारादरम्यान म्हणू लागल्या.
त्याच वेळी, सुभद्रा जोशींना प्रत्युत्तर देताना वाजपेयींची जीभ घसरली आणि ते म्हणाले, स्त्रिया महिन्यातून काही दिवस काम करू शकत नाहीत, मग सुभद्रा नेहमी काम करण्याचा दावा कशा करतात?
सुभद्रा जोशी आणि काँग्रेसने याचा संबंध महिलांच्या अपमानाशी जोडला. वाजपेयी स्पष्टीकरण देत राहिले, पण काँग्रेसला मुद्दा धरुन ठेवण्यात यश आले. निवडणुकीचे निकाल आले तेव्हा अटल बिहारी 2057 मतांनी पराभूत झाले होते. मात्र 10 वर्षांनंतर म्हणजेच, 1967 च्या निवडणुकीत वाजपेयींनी सुभद्रा जोशी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
2007 मध्ये सोनिया गांधी यांचे वादग्रस्त वक्तव्य
2007 मध्ये गुजरातमधील निवडणूक प्रचारादरम्यान तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात 'मौत का सौदागर' हा शब्द वापरला होता. गुजरात दंगलीच्या संदर्भात सोनिया गांधींनी हे वक्तव्य केले होते. सोनियांच्या या वक्तव्याला गुजरातमधील भाजपच्या अपमानाशी जोडण्यात आले.
गुजरातमधील सत्ताधारी भाजपने हा मुद्दा लावून धरला. मोदींविरोधातील हे विधान गुजरात निवडणुकीत काँग्रेसला चांगलेच महागात पडले. काँग्रेसच्या 59 जागा कमी झाल्या, तर भाजपला विक्रमी 117 जागा मिळाल्या. निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले.
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याने काँग्रेसला बुडवलं
गोवा अधिवेशनानंतर भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले. त्यावेळी काँग्रेसनेही निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
"मोदींना दिल्लीत काही काम नाही, त्यांना चहा विकायला यायचे असेल तर ते नक्कीच येऊ शकतात", असे मणिशंकर अय्यर म्हणाले. भाजपने अय्यर यांच्या विधानाला चहावाल्यांच्या अपमानाशी जोडले.
त्यानंतर भाजपने 'चाय पे चर्चा' आणि 'चायवाला पीएम' कॅम्पेनला सुरुवात केली. 2014 च्या निवडणुकीत अय्यर यांच्या विधानाने काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या, तर भाजपने पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन केली.
कर्नाटक निवडणुकीवरही होणार परिणाम?
भाजपने पंतप्रधान मोदींवरील खरगेंच्या वक्तव्याला गांधी घराण्यातून पसरलेले विष म्हटले आहे. यानंतर खरगे म्हणाले, त्यांचे कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नाही. मात्र तरीही, भाजपने निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.
मल्लिकार्जुन खरगेंचे विधान काँग्रेससाठी कितपत हानीकारक ठरणार आहे, हे पंतप्रधान काय प्रतिक्रिया देतात यावर अवलंबून आहे. पंतप्रधान 29 एप्रिलला बेळगावातून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतील, यावेळी भाजप मेगारॅली काढणार आहे. यानंतर पंतप्रधान एकापाठोपाठ एक 15 सभा घेणार आहेत.
कर्नाटक निवडणुकीत यावेळी काय नवीन?
कर्नाटक निवडणुकीत प्रथमच घरबसल्या मतदानाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ट्रान्सजेंडरसाठी पोल आयकॉन बनवण्याचा निर्णयही कर्नाटक निवडणुकीत पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी निवडणुकीत प्रथमच हॅकथॉनचेही आयोजन करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
