एक्स्प्लोर

BLOG : 'कृती'शील प्रबोधनकार' : 'सप्तखंजेरीवादक' सत्यपाल महाराज

>> उमेश अलोणे, अकोला

सत्यपाल महाराज... उभ्या आणि आडव्या महाराष्ट्रात हे नाव न ऐकलेला माणूस विरळाच... सत्यपाल महाराज गेल्या साडेचार दशकांपासून आपल्या सात खंजेऱ्यांतून महाराष्ट्राची वैचारीक 'मशागत' करीत आहेत. महाराष्ट्राभर छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, शाहू-फूले-आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगेबाबांच्या विचारांची पेरणी करीत सत्यपाल महाराजांनी हे सर्व महापुरूष महाराष्ट्राला नव्यानं सांगितले आहेत. या सर्व महापुरूषांचा वैचारीक, कृतीशील 'वारसदार'  म्हणजे सत्यपाल महाराज... आज याच वैचारीक वारसदाराचा 'वाढदिवस'. महाराष्ट्राचं हे वैचारिक 'वादळ' आज 66 वर्षांचं झालं आहे.

सत्यपाल महाराज म्हणजे विचार, आदर्शवाद प्रत्यक्षात जपणारा 'महाराज'. म्हणूनच महाराष्ट्रातील सर्व वैचारिक कार्यकर्त्यांसमोर 'आधी केले, मग सांगितले' असा 'कृतीशील आदर्शवाद' सत्यपाल महाराज घालून देतात. त्यामूळे अलिकडे 'महाराज' या शब्दावर काहीसं अविश्वासाचं मळभ दाटून आलेलं असतांना सत्यपाल महाराज 'अस्सल' आणि 'बावन्नकशी' महाराज वाटतात. त्यांच्यातील वैचारिक कार्यकर्त्याचा पाया मजबूत करण्याचं मोठं काम त्यांची आई 'सुशीला' यांनी केलं. हिच 'माय सुशिला' मागच्या वर्षी 21 फेब्रूवारी 2020 ला जगाचा निरोप घेत अनंताच्या प्रवासाला निघून गेली. याही परिस्थितीत सत्यपाल महाराजांनी एक 'आदर्श' जगासमोर ठेवला होता. असा आदर्श प्रत्यक्ष समाजासमोर ठेवणं जगातील कोणत्याही संवेदनशील, मातृभक्त पोरासाठी कठीण असाच. मात्र, सत्यपाल महाराजांनी तो आपल्या कृतीतून सहज समाजासमोर ठेवला होता. काय झालं होतं त्या दिवशी, थोडं 'फ्लॅशबॅक'मध्ये जाऊयात... 

21 फेब्रूवारी 2020... रात्री सातच्या सुमारासची वेळ... वर्धा जिल्ह्यातील तरोडा गावातील किर्तनाचा  मंडप नागरिकांच्या गर्दीनं अगदी फूलून गेलेला. सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांच्या खंजेरीतून आज कोणता सामाजिक जागर होणार?, याची उत्सुकता किर्तनासाठी आलेल्या आबालवृद्धांना होती. महाराजही किर्तनासाठी व्यासपीठावर जाण्यासाठी सज्ज होते. तितक्यात सत्यपाल महाराजांचा फोन वाजला. पलिकडून सांगण्यात आलं, 'आई गेली'...

फोन ठेवताच सत्यपाल महाराजांनी गच्च डोळे मिटलेत. आईच्या आठवणींनी त्यांचा बांध फुटला. आपल्या किर्तनातून समाजाला हसवणारे, अंतर्मूख करणारे सत्यपाल महाराज यावेळी मात्र धाय मोकलून रडत होते. कारण, त्यांच्या आयुष्याला वळण आणि संस्काराची सावली देणारा 'आई' नावाचा वटवृक्ष उन्मळून पडला होता. एकीकडे किर्तनासाठी जमलेली अफाट गर्दी आणि दुसरीकडे आई गेल्याचं आभाळभर दु:ख. अनेकांनी महाराजांना किर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला. ही सत्यपाल महाराजांची कसोटी पाहणारा क्षण होता. महाराजांसोबतचे सर्वच नि:शब्द होते. त्या ठिकाणी स्मशान शांतता पसरली होती.

मात्र, त्याचक्षणी सत्यपाल महाराजांनी स्वत:ला सावरलं. "मी किर्तन रद्द करणार नाही. मी किर्तन करूनच अकोटला जाणार. आईला किर्तनातूनच श्रद्धांजली देणार. आईनंच मला समाजसेवेचे संस्कार आणि वारसा दिला". सत्यपाल महाराजांच्या या वैचारिक निग्रहाचं उपस्थितांना मोठं नवल वाटलं अन अभिमानही वाटला. सत्यपाल महाराजांवर बालपणापासून आई सुशीलानं संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार बिंबवलेत. आई सुशीलानं तरूणपणात अनेकदा गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची किर्तनं ऐकलीत. तेच विचार तिनं सत्यपालमध्ये पेरलेत. 

गाडगेबाबांच्या आयुष्यात आलेला एक प्रसंग आज सत्यपाल महाराजांच्या आयुष्यातही आला होता. एका किर्तनाच्यावेळी गाडगेबाबांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती त्यांना कळली. मात्र, त्यांनी मुलाचा मृत्यूचं दु:ख बाजूला ठेवत किर्तनाला सुरूवात केली. त्यांनी किर्तनाची सुरूवातच "असे मेले कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी", असं म्हणत समाजप्रबोधनाचा जागर केला.

सत्यपाल महाराजांच्या आयुष्यातही त्यांच्या वैचारीक दैवताच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगासारखाच प्रसंग दुर्दैवानं आला होता. तरोड्यात लोकांनी खच्चून भरलेलं मैदान सत्यपालच्या सात खंजेऱ्यांनी निनादून गेलं. "माय-बापहो!, म्हातारपणात माय-बापाची आबाळ नका होऊ देऊ. त्यायच्या मूळंच तूमचा जगात मान हाय. चारी धामाचं सुख माय-बापाच्या सेवेत हाय. बापहो!, कोणत्याही माय-बापाले वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नका". किर्तनात अनेकदा सत्यपाल महाराजांचा हूंदका अनेकदा दाटून आला. किर्तनाच्या शेवटी सत्यपाल महाराजांनी आपल्या स्वर्गीय आईला अभिवादन केलं. 

पुढे आणखी मोठी कसोटी होती. सत्यपाल महाराजांच्या आईचं देहदान करायचा निर्णय झालेला होता. सहा तासांच्या आत देहदान करणं वैद्यकीय कारणांनी आवश्यक होतं. अन तेव्हढ्या वेळात सत्यपाल महाराजांना अकोटला पोहोचणं शक्य नव्हतं. अखेर महाराजांच्या अनुपस्थितीतच आईचं अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आलं. सत्यपाल महाराजांच्या आयुष्यातलं 'सुशीला' नावाचं सतत धगधगतं असणारं अग्नीकूंड वयाच्या 93 व्या वर्षी शांत झालं होतं. ज्या आईच्या ममतेच्या पदराखाली आयुष्याची 65 वर्ष काढलीत, त्याच आईचं अंत्यदर्शन महाराजांना घेता आलं नाही. मात्र, 'आई' नावाच्या विद्यापीठाच्या आदर्श संस्कारांनी सत्यपाल महाराजांना एव्हढ्या कसोटीच्या प्रसंगात आपला आदर्शवाद प्रत्यक्षात उतरविण्याची ताकद दिली.

सत्यपाल महाराजांचं पुर्ण नाव सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर. अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातलं सिरसोली हे त्यांचं गाव. घरी अठराविश्व दारिद्र्य असतांना विश्वनाथ आणि आई सुशीलानं विचारांची मोठी श्रीमंती या दांपत्यानं आपल्या लेकरांना दिली. खंजेरी घेण्याची ऐपत नसलेल्या सुशीलाबाईनं फुटलेल्या मडक्यावर कागदं चिकटवत छोट्या सत्यपालला खंजेरी बनवून दिली. पुढे याच सत्यपालनं विचार, संस्कारांच्या विचारांचा 'गजर' आणि 'जागर' आपल्या सात खंजिऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात केला. आपल्या किर्तनातील 'सत्यवाणी'तून सत्यपाल महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा, दारूबंदी, अनिष्ट रूढींवर कठोर प्रहार केलेत. आपल्याला दुसरे स्पर्धक नको म्हणून प्रस्थापित नवोदितांना व्यासपीठ मिळू देत नाहीत. मात्र, आपल्या विचारांचा वारसा जपणाऱ्या 'सप्तखंजेरी' कीर्तन 'परंपरे'त चाळीस-पन्नास कीर्तनकारांची वैचारिक अधिष्ठान असलेली एक नवी पिढी जाणिवपूर्वक तयार केली. 

कधीकाळी फक्त दैववादाची पेरणी करणाऱ्या किर्तनाला त्यांनी सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांची पेरणी करणारं माध्यम बनवलं. ते विचार स्वत:ही आचरणात आणलेत. त्यामूळेच किर्तन क्षेत्रातील 'सिलेब्रिटी' असणारे सत्यपाल महाराज आजही स्वत:चा खर्च भागविण्यासाठी आजही कपडे विकतात. सहा वर्षांपूर्वी आपल्या पत्नीचंही देहदान सत्यपाल महाराजांनी करीत आपण कृतिशील आदर्शवादी असल्याचं समाजाला दाखवून दिलं होतं.आई जिवंत असतांनाच तिच्या नावानं 'माय सुशीला' नावानं अँबुलंस सुरू करणारा, स्वखर्चातून सिरसोली या आपल्या गावात आईच्या नावाचं प्रवेशद्वार उभारणारा हा मुलगा. 

आदर्शवाद' सांगणं अतिशय सोप्प अन सरळ.... मात्र, तो स्वतः जगणं, पाळणं अन त्याची अंमलबजावणी करणं तेवढंच कठीण... म्हणूनच विचारांची दिशा स्पष्ट अन प्रांजळ असणार्‍या सत्यपाल महााजांचं वेगळेपण म्हणूनच कृतिशील आदर्शवादाची शिकवण देणार ठरलंय. महाराजांचा हा कृतिशील आदर्शवाद हा एका चांगल्या विचारांची नांदी ठरणारं आहे.

अलिकडे कीर्तनं ही 'इव्हेंट' झालीत. तर कीर्तनकार 'सेलेब्रिटी' झालेत. अगदी वर्ष-वर्ष 'बुक' झालेले कीर्तनकार स्वत:च्या 'बिझी' असण्याचं सदैव मार्केटींग करीत असतात. अशा 'सेलेब्रिटी' महाराजांची 'फी'सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ते आणि आयोजकांच्या 'बजेट' पलिकडे असते. मात्र, सत्यपाल महाराज या पठडीत न बसणारा महाराज. त्यांनी आपल्या कीर्तनाचा कधीच 'चंदा' जमा करणारा 'धंदा' होऊ दिला नाही. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर-कर्मवीर भाऊराव पाटील-गाडगेबाबा-तुकडोजी महाराजांचा विचार पुढे नेला. त्यांनी कीर्तनाला समाज परिवर्तनाच्या कृतीशील विचारांचं अधिष्ठान दिलं. फक्त प्रवासखर्चाला लागणारे पैसे आकारून ते त्यातूनही उरलेला पैसा कीर्तनाच्या वेळी पुस्तकं, गरिब महिलांना साड्या वाटून समाजालाच परत करतात. अनेक गरजूंना मदत करतात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सत्यपाल महाराज स्वत:चा खर्च कसा भागवितात?. तर ते आजही गावात अंडरवियर, बनियान विकून, कपडे शिवून स्वत:चा खर्च भागवतात. सध्याच्या 'बाजारू' काळात असा 'कृती'शील महाराज म्हणजे जणू वाळवंटात फुललेली हिरवळच म्हणावी लागेल. एका शायराचे शब्द सत्यपाल महाराजांना अगदी चपखल लागू पडतात. तो म्हणतो की, 

खुलूस और प्यार के मोती लुटाता चलता है
वो शख्स जो सबको गले से लगाके चलता है
हम उसके कद का अंदाजा करे भी तो कैसे
वो आसमाँ है, मगर सर झुका के चलता है....

कोरोना आणि 'लॉकडाऊन'मूळे संपूर्ण मानवजीवनाचं चक्र थांबलं आहे. कोरोनामूळे माणुसकीच्या व्याख्या बदलल्या आहेत. संवेदनेचे झरे खोल गेलेल्या काळातही सत्यपाल महाराजांच्या मानवसेवा आणि वैचारिक प्रबोधनाचा धबधबा मात्र अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी कोरोनामूळे सैरभैर झालेल्या लोकांसाठी अनेक उपक्रम राबवलेत. त्यांना आपुलकीनं सुखाचे दोन घास भरवलेत. ही मदत करतांना त्यांनी ना कधी त्याचा गवगवा केला. ना त्याचे फोटो काढलेत. बरं होईल!, सध्या कोरोनामूळे धार्मिक कार्यक्रम, कीर्तनं असं सारं काही बंद आहे. मात्र, याही परिस्थितीत महाराजांच्या सप्तखंजेऱ्या त्याच तडफेनं गेल्या वर्षभर प्रबोधनाचा आवाज देत निनादत राहिल्यात. महाराजांनी गेले वर्षभर 'ऑनलाईन' कीर्तनांच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती केली. लोकांना सोशल डिस्टंसिंग, आयसोलेशन, सॅनिटाइजर वापर यासंदर्भात वारंवार जागृत करीत राहिले. सत्तरीकडे मार्गक्रमण करीत असलेला हा 'कार्यकर्ता' कोरोना काळात तसाच बरसत राहिला अगदी त्याच्या कीर्तनांतल्या सात खंजेऱ्यांसारखा... 

महाराज!, अलिकडचा काळ समाजासाठीचा 'संक्रमन काळ'. अलिकडच्या काळातील काही घटनांनी समाजमन पार ढवळून गेलेलं. अशा परिस्थितीमूळं सारं आकाशच अंधारून गेलं असं वातावरण आहे. मात्र, तूमच्यासारखे या अंधाऱ्या वाटेवर प्रकाश पेरणारे काही दुवे समाजात आहेत. त्यामूळेच आजही समाजात सकारात्मक विचार, चांगुलपणा टिकून आहे. विचारांचा वारसा जपणारे सत्यपाल महाराज हे नाव अलिकडच्या काळातील 'गल्लाभरू' महाराजांच्या गर्दीत आजही तेजानं अन अभिमानानं आपलं स्वत्व टिकवून आहेत. 'माय सुशीला'च्या संघर्ष, विचार आणि संस्कारांना शतश: नमन!. अन तूमच्या कृतिशील आदर्शवादासही मानाचा मुजरा अन सलाम..... महाराज!, तुमच्या सप्तखंजेऱ्यांतून विचारांचा 'गजर' अन 'जागर' असाच निनादू द्या...  वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या या सप्तखंजेऱ्यांच्या 'सत्यवाणी'ला 'एबीपी माझा' परिवाराकडून आभाळभर शुभेच्छा...

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली,  बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली,  बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget